Saturday, March 10, 2007

तेजस्विनी~१

खूप वर्षांपूर्वी एक कथा वाचण्यात आली होते. कथेचे नांव, लेखकाचे नांव आता साफ विसरून गेलोय पण गावात वाढल्याने त्या कथेचा विषय चांगलाच लक्षात राहिला. ग्रामीण भागातल्या राजकारणाचा विषय पुस्तकात होता. मनोगतावर आल्यावर ह्या विषयावर काहीतरी लिहावेसे सतत वाटत होते, महाराष्ट्रात स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. ह्या पार्श्वभूमीवरील लेखन आजवर मनोगतावर झालेले नसल्याने आज ही कथा येथे देत आहे. कथा खूप मोठी आहे कारण विषयही तितकाच मोठा आहे.
जिल्हा पंचायत व ग्राम पंचायत ह्या दोन वेगवेगळ्या स्वायत्त संस्था आहेत. ज्या गावांची लोकसंख्या मर्यादित असते तेथे ग्रामपंचायती मार्फत कामे केली जातात. पण जनसंख्येची मर्यादा ओलांडल्यावर तिला जिल्हा पंचायतीचा दर्जा प्राप्त होतो. एका जिल्ह्यात बरेच तालुके असतात. प्रत्येक तालुक्यात गांवे समाविष्ट केलेली असतात. प्रत्येक गांवातून वस्त्या, पाडे इत्यादी उपविभाग पाडले जातात. छोट्या गावांत सरपंच व/वा पोलिस पाटील कारभार बघतो तर थोड्या मोठ्या गांवात ग्रामपंचायती मार्फत कारभार केला जातो. येथे टर्मिनॉलॉजीची (व्याख्येची) सरमिसळ होऊ नये म्हणून हा खुलासा करणे भाग पडत आहे. कथा वाचताना कुठेही व्याख्येची सरमिसळ माझ्या चुकीने झाली असल्यास किंवा वाचक स्वतः: गोंधळल्यास ही टीप जरूर वाचावी...... सर्व खुलासे प्रतिसाद देण्यापूर्वी होतील.
सरकारने स्थापीत केलेल्या सर्व स्वायत्त संस्थांचा शक्य तितका अभ्यास करून ही कथा लिहिली आहे..... कुठे त्रुटी आढळल्यास माझे ज्ञान वृद्धिंगत करणारे प्रतिसाद अवश्य द्यावेत. ह्या संदर्भात इतर मनोगतींचा काही अभ्यास असल्यास जरूर नमूद करावा जेणे करून वाचकांसाठी नेमक्या माहितीचा प्रसार होईल.
ह्या कथेची कल्पना नक्कीच त्या पुस्तकावरून मिळाली. गेले काही महिने ह्यावर लिखाण सुरू होते. कथा ज्या पुस्तकातल्या विषयावर आधारित आहे, त्याचे नांव - लेखकाचे नांव हे आठवत नसल्याने त्याचा उल्लेख करता येत नाही त्याबद्दल खेद आहे परंतु विषयाची कल्पना सोडल्यास बाकी सर्व मेहनत माझी आहे ह्याची खात्री बाळगा.
कथा आवडली तर त्याचे श्रेय त्या अनामिक लेखकाला नक्की द्या....... न आवडल्यास मी कुठेतरी कमी पडलोय असे समजा.
~धन्यवाद~

***************************************
मृगाचा पाऊस आर्द्रात प्रवेश करण्याच्या बेतात असतानाच पेरण्यांना सुरुवात होणार होती.ह्या वर्षी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार होत्या. आषाढातल्या एकादशीची जसा वारकरी आतुरतेने वाट पाहत असतो, अगदी तश्याच ह्या निवडणुकांची गावात वाट पाहिली जायची.राजाभाऊ जाधवांना ह्या निवडणुकांशी काही देणे घेणे नव्हतेच असे नाही, पण अगदी टोळक्यांत बसून त्यावर चर्चा करण्या इतपत रसही नव्हता. नाही म्हणायला त्यांच्या मावसं काकांच्या, नानासाहेब पाटलांच्या गळ्यात दरवेळे सारखीच अध्यक्ष पदाची माळ पडणार की नाही ह्या बाबत मात्र त्यांना शंका होती.
नानासाहेबांच्या रक्तातच राजकारण होते. येनकेन प्रकारेण गेल्या २५ वर्षांपासून नानांनी अध्यक्षपदाच्या खुर्चीवरची मांड सैल पडू दिलेली नव्हती. नानांचा दरारा व वचक गांवात भल्याभल्यांना ठाऊक होता.त्यांच्या वरताण त्यांची दोन्ही मुले होती. 'बाप सें बेटा सवाई' ह्या म्हणीचे उदाहरण देण्यासाठी त्यांचा उपयोग केला जावा इतकी त्यांची ख्याती होती. गांवात भावकीची भांडणे सोडवायला त्यांना बोलावणे गेल्यास दोन्ही पक्ष पस्तावलेच समजायचे ! जमिनीच्या तुकड्यावर कोणा शेतकऱ्याने सावकाराकडून कर्ज घेतल्यास त्याने निमूटपणे व्याज व मुद्दल दिलेलेच बरे... कारण सावकार तर दूरच राहायचा; पाटीलच तो शेतीचा तुकडा सावकाराकडून पडेल किंमतींत उचलून घशांत घालायचे. तक्रार करायची सोयच नव्हती ! जो कोणी पाटील वाड्याकडे वाकड्या नजरेने बघेल त्याची कंबक्तीच भरली समजायची ! नानांची दोन्ही पोरे त्याच्या घरावरून गाढवाचा नांगर फिरवायला कमी करणार नव्हती... वरून घरच्या आया बायांची इज्जत वाड्याच्या वेशीवर टांगली गेली असती ते वेगळेच.
नानासाहेब पाटलांचा मोठा सुहास लांडग्याच्या जातीचा होता.... स्वतःची मुले मोठी असूनही चांगलाच रगेल होता.त्याच्या समोर घरातल्या मोलकरणीही वावरायला टाळततर धाकटा सुनील कोल्ह्याच्या जातीचा होता. बायको बरोबर मेहुणीलाही त्याने घरात आणलेली होती. लग्नच त्या अटीवर केले असे गांवातले लोकं कुजबुजतं !हे सर्व कमी की काय तर त्यात भर होती ती त्यांच्या चमच्यांची.... गांवातली काही तरणी पोरे सुनील व सुहासला पाठिंबा देण्याच्या नांवाखाली चांगलीच वाह्यातपणा करीत. सुहासच्या बायकोच्या भावाची, रमेशची त्याला जोड होतीच. अर्थात गांव तेथे उकिरडा असणारच म्हणत जाणती मंडळी ह्या प्रकारांकडे काणाडोळा करीत.यंदा नानासाहेब पाटील स्वतः: निवडणूक लढवण्याच्या मन:स्थितीत नव्हते. विधानसभेच्या तिकिटासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मोठ्या मुलाला, सुहासला परिषदेचा अध्यक्ष बनवायचा त्यांचा मनसुबा होता.
राजाभाऊ जाधवांना ह्या सर्व प्रकारांशी वैयक्तिक देणे घेणे काहीच नसले तरी लॉ कॉलेजला प्रोफेसर असलेल्या राजाभाऊंना नानांच्या व त्यांच्या मुलांच्या प्रत्येक वर्तणुकीची किळस येई.स्वतः सुशिक्षित, त्यात पत्नी सुविद्य शिक्षिका असल्याने त्यांच्या संस्कारक्षम मनाला कित्येक गोष्टी पटत नसत. सुरुवातीला त्यांनी नानांना समजवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला मग विरोध करण्याचा पण त्यामुळे स्वतःचेच नुकसान होते हे कळल्याने त्यांनी गप्पच बसणे पसंत केले होते.राजाभाऊंच्या पत्नी सुरेखालाही नानासाहेबांच्या घराशी नाते जोडून ठेवणेही वैचारिकपणे विसंगत वाटे. एका शिक्षिकेत असणारे सारे गुण सुरेखाताईंमध्ये होते. मुलांच्या मानसिकतेची त्यांना जाण तर होतीच, पण त्यांना तळमळीने शिकवण्याची वृत्तीही त्यांनी अंगिकारलेली होती. लहानग्या वैशाली बरोबर तिघांचा संसार सुखात होता. जोड देण्यास राजाभाऊंची आई सोबतीला होतीच.****************************'जिल्हा सहकारी दूध फेडरेशन संघा'चे संचालक संतोषभाऊ चौधरी नानासाहेब पाटलांचे कट्टर विरोधक. नानांच्या "विकास आघाडी" ह्या पक्षाच्या विरोधातला त्यांचा "जनजागृती" पक्ष चांगलाच संघर्ष देत असे. समितीच्या अध्यक्षाच्या पदास आपण कसे पात्र आहोत हे ते आपल्या समर्थकांकरवी गावकऱ्यां पर्यंत व्यवस्थित पोहचवत होते. ह्यावेळी नानासाहेब पटलांना धूळ चारण्याचा ठाम निर्धार संतोषभाऊंनी केलेला होता.संतोषभाऊंनी वाणिज्य पदवी घेतल्यावर पुढे व्यवस्थापनात पदवी घेण्यानिमित्ताने परदेशवारी केली होती. वडिलांचे आधिपत्य असलेल्या दूध फेडरेशन संघावर स्वतः:चा ठसा निर्माण करून बिनविरोध वर्चस्व प्रस्थापित केले होते. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांचे ब्रीद वाक्य असे. गावात फक्त राजकारण न करता समाजकारणही रुजवण्यात त्यांचा मोठा हिस्सा होता. राजाभाऊ जाधव प्रोफेसर असलेल्या महाविद्यालयाचे संस्थापक संतोष भाऊच होते. राजकीय सत्तेत प्रवेश मिळाल्याखेरीज मनाजोगता विकास साध्य करता येणार नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक होते व म्हणूनच नानासाहेब पाटलांची राजकीय सद्दी संपवावीच लागणार हे ते जाणून होते.राजकारण किंवा समाजकारणात सार्वजनिक चारित्र्य स्वच्छ ठेवावेच लागणार अन्यथा त्याचा परिणाम वैयक्तिक, तसेच पुढे जाऊन सामाजिक जीवनावर होईल ह्याची कल्पना त्यांना होतीच. छोट्या गांवात कुठलीही कुलंगडी लपून राहणार नाहीत तेव्हा त्या वाटेला जायचेच नाही अशी पक्की खूणगाठ त्यांनी बांधून ठेवलेली होती.स्वतःच्या आसपास महिला कार्यकर्त्यांचा घोळका असला तरी त्याबरोबर तितकेच पुरूष कार्यकर्ते असायलाच हवेत हा दंडक त्यांनी पाळलेला होता.बऱ्यापैकी शिकलेली खानदानी घरातली बायको, लॉ कॉलेजला शेवटच्या वर्षात शिकत असलेली कन्या व चौदावीत शिकणारा व 'बिझीनेस मॅनेजमेंटला' प्रवेश मिळण्याची स्वप्ने बघणारा मुलगा हा त्यांचा संसारिक पसारा होता. आजोबा, आजी, आई, वडील, दूरची विधवा आत्या, नोकर गडी तसेच आला-गेला, पै- पाहुणा अशा बयाच मंडळींचा राबता असलेले त्यांचे घर होते. घरची श्रीमंती व शेती वाडी घरात कसलीही कमतरता भासू देत नव्हती. लक्ष्मी बरोबर सरस्वतीनेही वरदहस्त ठेवलेला असल्याने संतोष भाऊंचे नांव सार्थकी लागलेले होते.मिठ्ठास वाणी, समोरच्या व्यक्तीचे संभाषण पूर्ण झाल्याशिवाय न बोलण्याची सवय, आग्रही व मनमिळाऊ स्वभाव असे कित्येक गुण संतोषभाऊंनी प्रयत्नपूर्वक आत्मसात केले होते. व्यवस्थापनात घेतलेली पदवी आचरणात आणण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे होते. राजाभाऊ जाधवांवर त्यांचा खास लोभ होता. प्रियाचे लाडके शिक्षक, चांगला शिकलेला गुणी माणूस व गरीब परंतू स्वकष्टावर वर आलेल्या ह्या प्राध्यापकाबद्दल त्यांना नितांत आदर होता. राजाभाऊंचाही संतोषभाऊंवर खास लोभ होता. इतर सर्व गावकरी त्यांचा संतोषभाऊ नावाने उल्लेख करीत, एकटे राजाभाऊ त्यांना "सर" म्हणत.जमीन अस्मानाचा फरक असलेले हे गांवातले दोन मोठे राजकारणी एकमेकांना पुरते जोखून होते. व म्हणूनच की काय त्यांचे समर्थकही कधी आपापसांत लढत नसत. दोघांच्याही मनांत एकमेकांबद्दल सुप्त अढी होती, तरीही वरकरणी त्यांची समोरासमोर कधी जुंपली नाही. गांवातले वातावरण तणावमुक्त ह्या मुळेच राहिलेले होते.यंदाच्या निवडणुकांमध्ये चित्र वेगळे असेल व नानासाहेब पाटील व संतोषभाऊ चौधरी एकमेकांसमोर उभे ठाकणार असे लोकं कुजबुजायला लागले होते.

No comments: