Saturday, March 10, 2007

तेजस्विनी-५

"देसाई, आपल्या मतदार संघात जिल्हा परिषदेसाठी ३ जागा आहेत. त्यातली एक सिट महिलांसाठी राखीव करण्यात आलेली आहे. इतर दोन जागा मोकळ्या आहेत, राखीव जागेचे काय करायचं ?" संतोषभाऊंनी देसाईंना खुर्चीत टेकत नाहीत तोच सरळ प्रश्न केला."भराडे बाईंखेरीज आपण आणखी कोणाला उभे करू शकणार भाऊ ?" देसाईंनी प्रतिप्रश्न केला."का ? भराडे बाईच का ?" संतोषभाऊंनी सुरेखाताईंबरोबर झालेले संभाषण अजून पर्यंत कोणालाच सांगितलेले नव्हते. त्यांना फक्त आपल्या जवळच्या सल्लागार मंडळींचा अंदाज घ्यायचा होता."आजच्या परिस्थितीत विरोधकांसाठी त्याच योग्य उमेदवार आहेत, राजकारणाचा अनुभवपण आहे व पाटलांच्या गोटातून आलेल्या असल्याने त्यांची सगळी अंडी पिल्ली जाणतात." देसाईंनी एका दमात भराडे बाईंची राजकीय वाटचाल सांगितली."पण बाई तोंडाच्या फाटक्या आहेत."......"भाऊ, थोडे फार दुर्गुण प्रत्येकात असतातच. त्यांच्या दुर्गुणांचा झाला तर फायदाच होणार आहे आपल्याला.""त्यांच्या ऐवजी दुसऱ्या नांवाचा विचार करायचा झाल्यास ?" भाऊंनी खडा टाकला."एकतर सद्य परिस्थितीत आपल्याकडे म्हणावा तसा ताकदवान उमेदवार नाही; दुसरे म्हणजे बाईंऐवजी दुसरा उमेदवार दिल्यास बाईंचा उपद्रव ऐन निवडणूकीत होईल" देसाई पटकन बोलले."बघूया काय करायचे ते, इतर दोन उमेदवारांवर पण विचार करावाच लागणार आहे तेव्हाचं ह्या जागेबद्दलही विचार करू" संतोषभाऊ बोलले.*************************************सुनील पाटलाने हेडमास्तरांवर सोपवलेले काम करण्याची तशी इच्छा मास्तरांची नव्हती, पण नानासाहेब पाटलांच्या कृपेने मास्तरांना लायकी नसताना हे पद मिळाल्याचे ते स्वत: जाणून होते. मोहिनी इंगळे त्यांची कोणी लागत नव्हती; तीच्या भवितव्याचा विचार करण्याऐवजी स्वत:च्या भविष्याची मास्तरांना जास्त काळजी होती. म्हाताऱ्या आईला तालुक्यातल्या दवाखान्यातली चांगली उपचार पद्धती ते तालुक्याच्या शाळेचे हेडमास्तर होते म्हणूनच मिळतेय हेही त्यांना व्यवस्थित कळत होते. असेही दोन शिक्षक शाळा सोडून गेल्याने जागा रिकाम्या होत्या त्या भरून काढायच्याच होत्या. ह्या निमित्ताने शाळेवर, पोरांवर व सुनील पाटलावर उपकार करण्याची संधी त्यांना आयती मिळाली होती ती हातची घालवण्याइतके ते मूर्ख नव्हते. पाडळस्याची प्राथमिक शाळा तालुक्याच्याच शाळेशी जोडलेली होती. उत्तरपत्रिका तपासण्यापासून ते पगार भत्त्यांपर्यंतची सगळीच कामे तालुक्यावरून संमती आल्याखेरीज पुढे सरकत नसत. मोहिनी इंगळेने डिएड ची पदविका घेतलेली होती. फक्त प्रार्थमीक वर्गांवर शिकवण्याचा तिला अनुभव होता. पुढील शिक्षण व प्रशिक्षण घेण्यास तिने लेखी नकार दिला होता व फक्त प्रार्थमीक शाळेची शिक्षिका म्हणून काम करण्याची इच्छा तिने स्पष्ट केलेली होती. ज्या दोन जागा रिकाम्या होत्या त्या माध्यमिक शिक्षकांच्या होत्या. हेडमास्तर हा ताप कसा दूर करायचा ह्या विवंचनेत आता पडले ! आपल्या स्टाफचे व्यवस्थित सहकार्य मिळाल्या खेरीज ह्या झंझटीतून सुटका नसल्याचे त्यांना कळून चुकले.
"स्टाफ मीटिंग ठेवलीय मास्तरांनी " विलासने कागद पुढे करताच विषय काय आहे ते न बघताच सुरेखा ताईंनी सही केली."कसली मीटिंग आहे ?" पिटी चे महाजन सर, जे भूगोलही शिकवत, पण ज्यांचा दोन्ही विषयांशी दूरान्वयेही संबंध नव्हता त्यांनी विचारले. महाजन सरांना सट्ट्याचे आकडे खुणावत असल्याचे त्यांच्या तोंडावरून स्पष्ट दिसत होते."मला तर लवकर जायचे आहे." त्यांनी आधीच घोषणा केली...."रोजच्या सारखेच ना ?" वैद्य बुवा पचकले."बुवा, तुम्ही सत्यनारायणाच्या पुजा सांगत बसा, मी आकडे लावत राहीन. पैसा आपल्या सगळ्यांचा वीक पॉंईंट आहे" महाजनांनी त्यांना सुनावले."महाजन, मला सट्ट्याचे आकडे लावता येतील... पण तुम्हाला पुजा सांगता येईल का ?""वा वैद्य बुवा.... वाकील व्हायचे ते चुकून शिक्षक झालात" अंतुर्लीकर बाई बोलल्या. सुरेखा ताई फक्त गंमत बघत होत्या. महाजन व वैद्य बुवांची जुगलबंदी रोजचीच असे. शिक्षक असूनही दोघे अडाण्यासारखे भांडत.हेडमास्तरांनी शाळेत मोकळ्या असलेल्या जागांवरून भले मोठे भाषण ठोकले त्यात सरकारचा पाणउतारा करत असल्याचेही त्यांनी दाखवून दिले. हळूच "एक बदलीचा अर्ज आलेला आहे तेव्हा आपला सर्वांचा विचार काय आहे ते कळावे म्हणून आपल्याला थांबवून घ्यावे लागले" अशी मखलाशी केली."मास्तर, जी काय कागदपत्रे सह्या करायचीत ती उद्या केली तर चालतील का ?" महाजन सरांनी मनगटावरील घडाळ्यात बघत विचारले. हेडमास्तरांनी संमतिदर्शक मान हालवून पूर्ण होण्याच्या आतच महाजन सर खुर्ची मागे सरकवून उभे राहिले."मोहिनी इंगळेंचे स्वागत आम्ही करूच मास्तर; पण त्यासाठी इतका मोठा फार्स करायची आवश्यकत: नाही" महाजन उद्गारले. मास्तरांनी वासलेला आ मिटायच्या आतच सरळ दाराकडे जात असलेल्या महाजनांना इतर सगळेच गोंधळात पडल्यासारखे बघत होते.
"आपल्या गांवात कोण किती वेळा पादतो हेही लपून राहणार नाही." मास्तर तोंडाचा आ मिटता मिटता बोलले."श्शी.... काय तर्रीच काय" वैद्य बुवांनी सोवळेपणाचा आव आणत नाकासमोर हात हालवला.शाळेच्या शिक्षकांची मीटिंग म्हणजे थिल्लरपणा असल्याचे स्पष्ट मत सुरेखा ताईंचे होते."विलास, अजून चहा आहे का ?" समोरच्या ताटलीतली उरलेली दोन मारी बिस्कटे तोंडात खुपसत गाजरे बाईंनी विचारले."तर मंडळी, आपले काय मत आहे ?" हेडमास्तरांनी सगळे काही इतरांना नीट समजले असावेच ह्या आवेशात विचारले."जागा भरल्या गेल्या पाहिजेत पण शिक्षक कुठून आणायचे ?" सुरेखा ताईंनी विचारले."पाडळस्याहून एक बदलीचा अर्ज आलेला आहे" मास्तरांनी उगीचच हातातल्या कागदांवर नजर फिरवत म्हटले."पण पाडळस्याची शाळा प्रार्थमीक आहे मास्तर; आपल्याकडे माध्यमिक शिक्षकांच्या जागा मोकळ्या आहेत." सुरेखा ताई पटकन बोलल्या."त्यात काय मोठे; आपल्यातल्या एखाद्या प्रार्थमीक शिक्षकाला माध्यमिक वर्गावर बदलून घ्यायचे व मोकळ्या जागेवर प्रार्थमिक शिक्षकाची नेमणूक करायची." मास्तर बोलले."कोणाला बढती द्यायची ?" सुरेखा ताईंनी सरळ विचारले."आपल्यापैकी जो ज्येष्ठ असेल त्याला" वैद्यबुवांनी वादाला तोंड फोडले.पुढे झालेल्या रणधुमाळीत सुरेखा ताईंना जराही स्वारस्य नव्हते. विलासने परत आणलेल्या चहाचे घोट घेत त्या पदासाठी सुरू झालेला तमाशा बघत राहिल्या. अखेरीस वैद्य बुवांनी सरशी मारली. २५५ रुपयांच्या मासिक बढतीच्या बदली त्यांनी स्टाफला महिन्यातून एकवेळा दुपारचा नाश्ता घासाघीस करून, कबूल करीत बढती विकत घेतली. १२५ रुपयांचा नाश्ता मासिक भीसीच्या दिवशी द्यायचे नक्की होताच बैठक संपल्याचे जाहीर करण्यात आले व सुरेखा ताईंनी सुस्कारा सोडला. वैशु वाट बघत पायरीवर बसली असेल ह्या विचारांनी त्यांचा जीव कासावीस झालेला होता.हेडमास्तरांनी मात्र एका दगडांत पाच पक्षी मारले होते......शाळेचे व पोरांचे भले होणार असल्याचा आव आणत, सुनील पाटलाचे काम केले होते, वैद्य बुवांना खूश करण्याचे साधले तर होतेच वर मोहिनी इंगळेवर इंप्रेशन मारता येणार होते. सुनील पाटलाकडून भाजीपाला व दुधाचा रतीब वाढवून मिळाला असता तो वेगळाच.********************************"बाईंचे मत विचारात घ्यावे लागणार भाऊ " शेळके मास्तरांनी दिलेल्या शेऱ्यावर विचारे साहेबांनीही संमतिदर्शक 'हो' जोडला."भराडे बाईंना विचारण्यापूर्वी तुम्हा सर्वांचे मत अजमावावे म्हणून बोलावले मास्तर; एकदा त्यांच्या नावाचा विचार होतोय हे त्यांना कळले की विषय संपल्यातच जमा होईल." संतोषभाऊ बोलले. "त्यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार दिल्यास ?" त्यांनी दोघांकडे बघत विचारले."तर भराडे बाई आपल्या सगळ्यांना भरडून काढतील" स्वत:च्या पांचट विनोदावर खुदखूदत विचारे बोलले.संतोषभाऊंसमोरचा पेच वाढत होता. त्यांच्या मनातून भराडे बाईंना उमेदवारी द्यायची नव्हती पण राजाभाऊ सोडल्यास इतरांची सुरेखाताईंच्या नावावर संमती मिळण्याचे लक्षण दिसत नव्हते.वासुभाऊ व फिरकेंनीही त्यांना भराडे बाईंचेच नांव सुचवलेले होते. राजाभाऊंशी सुरेखाताईंबद्दल बोलण्याच्या पूर्वीचं आपण ही मते मागवायला हवी होती असे त्यांना राहून राहून वाटायला लागले. ह्या परिस्थितीत आपण घोडचूक केली तर नाही ह्या विचारांत ते गढून गेले.इंटरकॉम वर 'राजाभाऊंच्या कॉलेजला फोन लावून त्यांना सायंकाळी घरी बोलावणे पाठवा'असा निरोप द्यायला त्यांनी स्वत:च्या स्वीय सहाय्यकाला सांगितले. राजाभाऊंना निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देऊन काय मार्ग काढता येईल हेच आता त्यांना बघावे लागणार होते.********************************"सुनील औंदाच्या झेडपीच्या निवडणुकांसाठी सुहासरावांना अध्यक्षपदाचा उमेदवार करायचं म्हंतोय मी" नानांनी सुनील पाटलाला सांगितले. सुनीलची चुळबूळ सुरू होती."पन बाई माणसाला अध्यक्षीण बन्वायच हाय न्हवं यंदा ?" उगीचच फाटा फोडत त्याने विचारले."न्हाय, प्रत्येक दोन वेळा पुरूष माणूस अध्यक्ष झाला की मागून बाई माणूस व्हनार दाजी" रमेशने मेहुण्याची बाजू राखली."माजी काय बी हरकत न्हाई दाजी" सुनील लगेच बोलला. "पण माज्या मित्रांपैकी हाईत उमेदवारीसाठी एक दोग...... तवा एखादी सिट त्यांनाबी द्या की दाजी...." सुनीलने लकडा लावला.नानांनी ही अपेक्षा केली होतीच. "तुज्या मेव्हणीला म्हनावं उबी र्हा की निवडणूकीला" रमेश मध्ये तोंड खुपसत बोलला."रमेश, घरच्या बाई माणसाला घरातच राहू दे" सुनीलने ताडकन सुनावले."आक्शी म्या म्हटल; त्या घरच्या कुठं हाईत ? पाटील खानदानच्या बाहेरच्याच हाईत की !" रमेशने स्वत:च्या मेहुण्या कडे तिरपा कटाक्ष सोडत म्हटले.सुहासची नजर सुनीलच्या मेहुणीवर असल्याचे त्याला चांगलेच ठाऊक होते. सुहास अध्यक्ष व सुनीलची मेहुणी सभासद झाल्यास हे सुत जुळू शकेल हाच विचार त्याच्या डोक्यांत होता."काय करायचं त्ये आमी पाहून घेऊ, सुहासला अध्यक्षपदासाठी उभं करायचं इतकंच सांगतूय आता." नानासाहेबांच्या फर्मानासमोर कुणाचे काही चालत नसे.नानासाहेब पाटील घराबाहेर पडताच सुनीलने रमेशचा आई बहिणीवरून उद्धार करीत त्याची गळचंडीच पकडली. "हरामखोरा, बहिणीच्या घरी राहतोस वर इकडेच हागुरडी करतोस मा****........"दोघांच्यात चांगलीच जुंपली. सुहासने दोघांना सावरण्याचा प्रयत्न करण्याच्या आधीच रमेशने चांगल्या दोन चार कानफडात खाऊन घेतल्या होत्या."वैनी, तुमच्या ह्या भ**ला सांगून ठेवा, माह्या रस्त्यात हागुरडी केली तर गांवात ठेवणार न्हाय" सुनील सरळ मोठ्या भावजयेवर भडकून बोलला.सुहासला निमित्त मिळाले व त्याने फाडकन सुनीलच्या मुस्काडात मारली.....पाटील वाड्यावर मग चांगलीच जुंपली. दोघांच्या बायका, मेहुणे, मेहुण्या सगळेच रणकंदनात उतरले. एकमेकांच्या घराण्यांचा उद्धार होत होता. एकमेकांच्या लफड्यांचा भांडेफोड होत होता.......अखेरीस नेहमीसारखा तासभर गावगोंधळ घातल्यावर हळूहळू पाटील बंधू शांत झाले.बघ्यांची व घरातल्या नोकरवर्गाची करमणूक संपुष्टात आली. नानासाहेब पाटलांना ह्यातला एक शब्द कळवण्याची हिंमत कोणाच्यातच नव्हती.भांडण चालू असताना सुनीलने मोठ्या भावाला धमकी दिलेली होती. "मोहिनी इंगळेला सिट न्हाय मिळाली तर बगून घीन"मोहिनी इंगळे "विकास आघाडी" पक्षाच्या अधिकृत महिला उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याचा गौप्यस्फोट थोड्याच वेळांत गावभर झाला.....चर्चेला उधाण आले........

No comments: