Saturday, March 10, 2007

तेजस्विनी-६

दुपारची निवांत वेळ होती. अट्रावल नावाच्या त्या छोट्याश्या गांवातल्या लोकांची जेवणे आटोपून ते आपापल्या उद्योगांत मग्न होते.काही रिकामटेकडी मंडळी लिंबाच्या पारावर बसून एकमेकांच्या निंदा नालस्त्या करण्यात मग्न होती.बायका मंडळी आवरा आवरी करून वामकुक्षी घेण्याच्या तयारीला लागलेल्या होत्या.दूरवरच्या शाळेतून मुलांनी म्हटलेल्या पाढ्यांचा आवाजही जड वाटत होता.
एक बेवडा भर दुपारी हातातली रिकामी बाटली दाही दिशांना गदे सारखी फिरवत स्वत:चा तोल सावरत जात होता. विज्या बेवड्याला अख्खे गांव ओळखे.... चोवीस तास, तीनशे पासस्ठ दिवस तो ह्याच अवस्थेत होता. जो कोणी दारू पाजेल त्याला आपला जन्मदाता म्हणायचीही त्याची तयारी होती. आपल्या बेवडे पणावर त्याला गर्व होता. जेव्हा जेव्हा फुकटाची दारू ढोसायला मिळाली की ती पिऊन "चावडी" वर स्वत:च्या पिण्याचा ढिंढोरा पिटत बसे.
पारावरच्या मंडळींत फुसफूस सुरू झाली. सगळे जण आपापले संभाषण सोडून विज्याची फुकटची करमणूक बघत राहिले."काय रं रांडेच्या, हांसतूस व्हय मले ?" विज्याने पारासमोरच्या मातीत बसकण मारत व मानं घडाळ्याच्या काट्यासारखी फिरवत विचारले. तो नेमका कुणाला बोलला हे न कळल्याने अजूनच खसखस पिकली."भ*व्या मालकाच्या माणसाला हासतो व्हय ? मालकाले समजलं तर धिंड काढलं नागडं करून तूही " बोलताना चंद्या लोखंडे कडे हात करून तो बोलला."मायला तुह्या विज्या, शेण खायांचं सोडून, टाकतोस कोनापायी ?" चंद्याने कावतं विचारले."मालक बोलले, चंद्या भ*वा आहे चौधरीचा, त्याच्यावर नजर ठीव म्हनून " विज्याने दिवसा तारे तोडले."मग मालक कुणाचा भ*वा आहे? तुज्या मायचा का ?" चंद्या तापत चालला होता."जावं देरे चंद्या, हा फुकाची ढोसून लफडं वाढवायला आलाय " गण्या भोळे मातीत पचकन थुंकत बोलला."गण्या तुह्या भैनीला तर मालकानं उभ्या ****** " पुढची वाक्ये ऐकणाऱ्यांचे कानही तापत होते.
गण्या व चंद्याने विज्याची धू धू धुलाई केली. अख्खे अट्रावल जमा झाले होते. शेवटी सरपंच स्वत: मध्ये पडले तेव्हा कुठे विज्याला श्वास घेता आला.दुपारी चहा पिण्याच्या सुमाराला अट्रावलात चार जिपड्या एकापाठोपाठ येऊन थांबल्या. कोंबलेली माणसे हातात लाठ्या काठ्या घेऊन बाहेर पडली ती सरळ लिंबाच्या पाराकडेच गेली. हातात रिव्हॉल्व्हर नाचवत सर्वात पुढे होता सुहास पाटील - तर पाठोपाठ त्याचा मेहुणा रमेश. हाताशी येईल त्याला काठ्यांनी बदडत त्यांनी पार धुऊन काढला व मोर्चा गावकऱ्यांच्या घराकडे वळवला. घराघरातून नासधूस करीत, बाया बापड्यांना व लहान मुलांना पायाने कुथाडीत तर म्हाताऱ्या कोताऱ्यांना ढकलत पाटलांची माणसं गावभर नासधूस करू लागली. समोर येईल त्याला लाठीचा किंवा लाथेचा प्रसाद, मिळतं होता. सुनील पाटलावरचा सकाळचा सगळा राग अट्रावलकरांवर निघत होता.भारताला स्वातंत्र्य मिळून उणीपुरी ५० वर्षे होऊन गेलेली होती पण सरंजामशाही इथून जायचं नांव घेत नव्हती.कण्हतं पडलेलं अट्रावल गांव सुहास पाटलाच्या खिजगणतीतही नव्हतं.*********************संतोषभाऊ चौधरींच्या कानावर ही बातमी आली तेव्हा ते घरीच राजाभाऊंची वाट पाहतं होते. फोन वरच त्यांनी पटापट फर्मान सोडायला सुरुवात केली. आपल्या सगळ्या समर्थकांना त्यांना बोलावून घेतले. शेळके मास्तरांना अन्नपूर्णा खानावळीत परस्पर जायला सांगून २५०/३०० जणांसाठी जेवण तयार करून अट्रावलला पोहचवण्याची व्यवस्था करायला सांगितली.दोन दुचाकी स्वारांना पार्वती मेडिकल स्टोअर्स मधून आवश्यक ती प्रथमोपचाराची सामुग्री व काही वेदनाशामक औषधे आणण्यास पिटाळले. राजाभाऊ आत आल्या आल्या, हा काय गोंधळ चालू आहे ते त्यांना न कळल्याने त्यांनी मालती वहिनींकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितले तेव्हा वहिनींनी त्यांना अट्रावलवर गुंडांचा हल्ला झाल्याचे सांगितले.इतक्यात देसाई दूध महासंघाची एस्टीम व डॉ. काळेंना घेऊन आले. प्रियांकला राजाभाऊंनी घरी पाठवले, सुरेखाताई नुकत्याच शाळेतून येऊन टेकल्या होत्या त्या तश्याच प्रियांक बरोबर बंगल्यावर पोहचल्या. लगबगीने भाऊंनी सगळ्यांना बरोबर चलण्याचा इशारा केला. संतोषभाऊ एस्टीम स्वत: चालवायला बसले सोबत मालती वहिनी, देसाई, डॉ.काळे व वयोवृद्ध विसूभाऊंना घेऊन इतरांची सोय त्यांनी तीन जीप गाड्यांत केली.फौजदार बोरसेंची जीप अर्ध्या वाटेवर भेटताच सर्व लवाजमा अट्रावलकडे रवाना झाला. अट्रावल २० की.मी.चा दगड मागे पडला तेव्हा झुंजूमुंजू झालेले होते.****************************************************नानासाहेब पाटलांनी कपाळावर हात मारून घेतला. नको त्या वेळेस सुहास पाटलाने लचांड उभे केले होते. पक्षश्रेष्ठी कुठल्याही परिस्थितीत झाला प्रकार खपवून घेणार नाहीत ही गोष्ट ते जाणून होते. त्यांनी तातडीने जळगांवला फोन लावला. रावसाहेबच त्यांना ह्या प्रकारणातून तारतील ही त्यांची खात्री होती.रावसाहेब गाजरे त्यांचे सख्खे मामा. बहिणीच्या मुलांवर, नाना, दिघू, प्रदीप त्यांचे अतोनात प्रेम होते. दिघू म्हणजे नानांच्या खालचा भाऊ संन्यास घेऊन परागंदा झाला. प्रदीप दुबईला गेला तो परतून आलाच नाही. तेथेच त्याने कसलातरी व्यवसाय सुरू केला. एका केरळी ख्रिस्ती मुलीशी लग्न केल्याचे निमित्त करून नानांनी त्याच्याशी संबंध तोडले व त्याला वाळीत टाकले.आपोआपच वडिलोपार्जित सगळी मिळकत नानांची झाली.राजाभाऊ जाधवांच्या वडिलांची आई रावसाहेबांची दुसरी बहीण. राजाभाऊंच्या आजोबांशी तिचे लग्न झाल्यावर जाधव कुटुंबीयाचे जमिनींच्या वादावरून गाजरेंशी वाजले तेव्हा पासून गाजरे कुटुंबीयांनी जाधव कुटुंबाशी उभे वैर धरले. नानासाहेबांचे वडील सज्जन म्हणून त्यांनी वैर जरी नाही धरले तरी फक्त लग्न किंवा मर्तिक प्रसंगीच जाण्या इतके संबंध ठेवले.
रावसाहेब गाजरे "विकास आघाडी" चे मोठे प्रस्थ होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पक्षाचा जिल्ह्यातला आधारस्थंभ रावसाहेबांच्या वाड-वडिलांपासून चालत होता. सध्या वयोमानामुळे सक्रिय नसले तरी जिल्ह्यात पक्षाचे सर्वेसर्वा तेच होते. त्यांचा मुलगा, राजेंद्र्कडे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद होते.सुहासने अट्रावल वर केलेल्या हल्ल्याची तक्रार करण्यास सुरुवातीला अट्रावलकर तयार नव्हते. सरपंचांनी अजिजीने अट्रावलकरांना भानगडींपासून दूर राहण्याचे आवाहन केले परंतू ते ठरले नानासाहेब पाटलांच्या गोटातले.....चंद्या किंवा गण्या सारख्या तरुण रक्तात दादागिरी व अन्याया विरुद्ध दाद मागण्याची वृत्ती असल्यानेच फौजदार बोरसेंनी सुहास पटलाविरुद्ध प्रथमच लेखी तक्रार नोंदवली.तक्रारीत गुंडांच्या साहाय्याने गावावर सशस्त्र हल्ला केल्याचे नमूद करण्यात आल्याने तक्रार गंभीर स्वरूपाची होती.प्रथमच नानासाहेब पाटलांच्या अन्याया विरुद्ध पोलिसात तक्रार करायला कोणी धजावले होते.पाटलांच्या दैवचक्राच्या उतरंडीची सुरुवात झालेली होती.**************************************महत्त्वाच्या विषयावरील चर्चेस, दूध महासंघाच्या कार्यालयातील चौथ्या मजल्यावरील बैठक कक्षांत, मंडळींना पाचारण करण्यात आलेले होते. वासूभाऊ, विचारे, शेळके मास्तर, फिरके, देसाई, भराडे बाई, सुरेखा ताई, राजाभाऊ तसेच "जन जागृती" पक्षाच्या शाखांचे १९ पदाधिकारी, स्वत: संतोषभाऊ व त्यांचे स्वीय सहाय्यक, दूध महासंघाचा एक मराठी लघुलेखक व कारकून मिळून ३२ सदस्य बैठकीला उपस्थित होते.सर्वप्रथम अट्रावल वर झालेल्या हल्ल्यानंतर पक्षातर्फे करण्यात आलेल्या मदती बद्दल देसाई साहेबांनी थोडक्यात म्हणजे चांगली अर्धा तास माहिती दिली. माहिती देत असताना त्यांनी योग्य वाक्यांवर जोर देत तर कुठे हळवे पणाने बोलत घडलेली घटना विस्तृतपणे सांगितल्याने जी मंडळी अट्रावलच्या मदत कार्यांत हजर नव्हती, त्यांच्यासाठी तो 'आखो देखा हाल' च होता.
अट्रावलच्या मदत कार्याचा पूर्णं खर्च दूध महासंघाने उचलल्याचे त्याच दिवशीच्या वर्तमानपत्रांत जाहिरातींद्वारे आम जनतेला कळवण्यात आलेले होते. संतोषभाऊ चौधरींनी सुहास पाटलाची कुठेही नांव न घेता केलेली जिल्हाभर निंदा ह्याचेच ते द्योतक होते. पंचक्रोशीतल्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींमध्ये शिरकाव करण्यासाठी 'जन जागृती' पक्षासाठी 'अट्रावलचे मदतकार्य' हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरलेला होता.ह्यानंतर मतदारसंघातल्या ३ व तालुक्याशी जोडल्या गेलेल्या जिल्हा पंचायतींच्या ८ जागांसंदर्भात तसेच ग्रामपंचायतीच्या जागांसंदर्भात निर्णय घ्यायचा असल्याने आजची बैठक बोलावली असल्याचे सांगत देसाईंनी वयोवृद्ध वासूभाऊंना मार्गदर्शनापार चार शब्द सांगण्याची विनंती केली.
वासूभाऊंचे भाषण म्हणजे कार्यकर्त्यांशी थेट संवादच असे. आलेल्या शाखा पदाधिकाऱ्यांची नांवे घेत, त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख करीत, ते शब्दांनी त्यांना शाबासकी देत होते. कुठे हळूच केलेल्या चुकांबद्दल हलकेच कानपिळणी होत होती. अत्यंत खेळीमेळीचे वातावरण निर्माण करीत त्यांनी देसाईंच्या भाषणांतला होता नव्हता तो रटाळपणा काढून टाकला. भाषणाच्या शेवटी वासूभाऊंनी भराडे बाईंवर खास स्तुतिसुमने उधळली. अट्रावलला केल्या गेलेल्या मदत कार्यांत भराडे बाईंनी अक्षरश: घराघरातून स्त्रियांना वेचून काढत बोलते केले होते. महिलांच्या दु:खांचा कढ कमी करण्यास त्यांच्या शब्दांनी बरीच मदत केलेली होती. वासूभाऊ भाषण संपवून खाली बसले ते टाळ्यांच्या गजरातच.....सुरेखाताईंच्या डोळ्यांचे कोपरे कुठेतरी पाणावल्याचे त्यांना जाणवलेही नव्हते.अचानक काहीतरी आठवल्याने ते तसेच ताडकन उभे राहिले.भाषणाला सुरुवात करीत असलेल्या संतोषभाऊंना हाताच्या इशाऱ्याने थांबवत, "ह्या सर्व धावपळीत आपल्या पक्षांत एका मुलीचे स्वागत करायचे राहून गेले..... " सुरेखा ताईंकडे निर्देश करीत ते म्हणाले."अट्रावलच्या घटनेत तन्मयतेने ती काम करीत असल्याचे पाहून, आपल्या पक्षाला एक चांगली कार्यकर्ती मिळाल्याचे समाधान वाटले. लवकरच पक्षाची आघाडी सांभाळ हा आशीर्वाद मी तिला देऊ इच्छितो. हल्ली वयोमानामुळे विसरायला होते म्हणून तिचा उल्लेख करणे अनवधानाने राहून गेले".वासूभाऊ परत खाली बसेपर्यंत सुरेखा ताईंचे डोळे चांगलेच पाणावले होते व सगळ्यांच्याच ते लक्षांत आले. बसल्या जागेवरून उठत त्या वासूभाऊ बसलेल्या खुर्चीकडे गेल्या व वाकून त्यांना नमस्कार करीत त्यांच्या आशीर्वादाचा शालीनतेने स्वीकार केला. परत झालेला टाळ्यांचा कडकडाट त्या स्वत:च्या खुर्चीवर बसेपर्यंत होत होता.
अचानक घेतलेल्या ह्या वळणाने संतोषभाऊंना एक नवीनच उभारी मिळाली. "मित्रहो, यंदाच्या निवडणुकांमध्ये महिला उमेदवार म्हणून आपल्या पक्षातर्फे कोणाला उभे करावे हा मला पडलेला पेच आपल्या ह्या दोन महिला कार्यकर्त्यांनी चुटकी सरशी सोडवल्याबद्दल मी त्यांना व्यक्तिश: धन्यवाद देतो." संतोषभाऊंच्या भाषणावर नेहमीच वासूभाऊंची पडलेली छाप दिसून येई. वासूभाऊंना आपले राजकीय गुरू मानणारे संतोषभाऊ त्यांच्याच लकबीने भाषण करीत.एक क्षण सगळे एकदम स्तब्ध झाले.....मग आपापसांत कुजबूज सुरू झाली...संतोषभाऊ पुढे काही बोलण्याच्या पूर्वीच जवळपास गोंधळाला सुरुवात झाली. प्रत्येक जण डाव्या उजव्या हाताशी बसलेल्या कार्यकर्त्याशी बोलण्यात गुंतला......"शांतता राखा, कृपया शांतता राखा....." देसाईंच्या खणखणीत आवाजाने सगळे शांत झाले. खुद्द देसाई गोंधळात पडलेले होते पण बैठकीवरचे नियंत्रण ताब्यात ठेवणे त्यांना व्यवस्थित जमत असे."भाऊ काय सांगत आहेत ते नीटं समजावून घेतल्याशिवाय कृपया आपापसांत चर्चा करू नये अशी मी कार्यकर्त्यांना विनंती करतो." देसाईंनी जणू काही भाऊंना पुढे बोलण्याचा इशाराच केला.
"माझ्या हाती असलेल्या माहितीनुसार 'अट्रावल' चे मतदार क्षेत्र महिलांसाठी राखीव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. अट्रावलची आजची परिस्थिती व दूध महासंघाने व भराडे बाईंनी अट्रावलात केलेले कार्य पाहता अट्रावलची जिल्हा पंचायतीची जागा विनासायास भराडे बाई आपल्या पक्षासाठी खेचून आणू शकतील." संतोषभाऊंनी उपस्थितांवर नजर फिरवीत केलेले भाष्य जवळ जवळ सगळ्यांनाच मान्य झाले.समोरच्या मेजावर हात थोपटत बहुतेकांनी त्याला मान्यता दिली."पण भाऊ, मी तर तालुक्याची मग अट्रावलांतून मला निवडणूक लढवता येईल ?" भराडे बाईंनी शंका काढली."का ? जर दिल्लीत राहणारी महिला कर्नाटकातून लोकसभेला उभी राहू शकते तर पंचायतींना वेगळा नियम का असावा ?"...."........" सगळेच निःशब्द होते."तरीही मी तहसील कार्यालयातल्या सचिवांना किंवा त्यांच्या स्वीय सहाय्यक मोकाशींना विचारून नियमांची खातरजमा करून घेईन." ह्या वाक्याने उरल्या सुरल्या शंका नष्ट झाल्या.....पुढची कार्यवाही सुरू होण्याच्या आतच कार्यकर्त्यांनी भराडे बाईंचे अभिनंदन करावयास सुरुवात केली.

No comments: