Saturday, March 10, 2007

तेजस्विनी~१

खूप वर्षांपूर्वी एक कथा वाचण्यात आली होते. कथेचे नांव, लेखकाचे नांव आता साफ विसरून गेलोय पण गावात वाढल्याने त्या कथेचा विषय चांगलाच लक्षात राहिला. ग्रामीण भागातल्या राजकारणाचा विषय पुस्तकात होता. मनोगतावर आल्यावर ह्या विषयावर काहीतरी लिहावेसे सतत वाटत होते, महाराष्ट्रात स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. ह्या पार्श्वभूमीवरील लेखन आजवर मनोगतावर झालेले नसल्याने आज ही कथा येथे देत आहे. कथा खूप मोठी आहे कारण विषयही तितकाच मोठा आहे.
जिल्हा पंचायत व ग्राम पंचायत ह्या दोन वेगवेगळ्या स्वायत्त संस्था आहेत. ज्या गावांची लोकसंख्या मर्यादित असते तेथे ग्रामपंचायती मार्फत कामे केली जातात. पण जनसंख्येची मर्यादा ओलांडल्यावर तिला जिल्हा पंचायतीचा दर्जा प्राप्त होतो. एका जिल्ह्यात बरेच तालुके असतात. प्रत्येक तालुक्यात गांवे समाविष्ट केलेली असतात. प्रत्येक गांवातून वस्त्या, पाडे इत्यादी उपविभाग पाडले जातात. छोट्या गावांत सरपंच व/वा पोलिस पाटील कारभार बघतो तर थोड्या मोठ्या गांवात ग्रामपंचायती मार्फत कारभार केला जातो. येथे टर्मिनॉलॉजीची (व्याख्येची) सरमिसळ होऊ नये म्हणून हा खुलासा करणे भाग पडत आहे. कथा वाचताना कुठेही व्याख्येची सरमिसळ माझ्या चुकीने झाली असल्यास किंवा वाचक स्वतः: गोंधळल्यास ही टीप जरूर वाचावी...... सर्व खुलासे प्रतिसाद देण्यापूर्वी होतील.
सरकारने स्थापीत केलेल्या सर्व स्वायत्त संस्थांचा शक्य तितका अभ्यास करून ही कथा लिहिली आहे..... कुठे त्रुटी आढळल्यास माझे ज्ञान वृद्धिंगत करणारे प्रतिसाद अवश्य द्यावेत. ह्या संदर्भात इतर मनोगतींचा काही अभ्यास असल्यास जरूर नमूद करावा जेणे करून वाचकांसाठी नेमक्या माहितीचा प्रसार होईल.
ह्या कथेची कल्पना नक्कीच त्या पुस्तकावरून मिळाली. गेले काही महिने ह्यावर लिखाण सुरू होते. कथा ज्या पुस्तकातल्या विषयावर आधारित आहे, त्याचे नांव - लेखकाचे नांव हे आठवत नसल्याने त्याचा उल्लेख करता येत नाही त्याबद्दल खेद आहे परंतु विषयाची कल्पना सोडल्यास बाकी सर्व मेहनत माझी आहे ह्याची खात्री बाळगा.
कथा आवडली तर त्याचे श्रेय त्या अनामिक लेखकाला नक्की द्या....... न आवडल्यास मी कुठेतरी कमी पडलोय असे समजा.
~धन्यवाद~

***************************************
मृगाचा पाऊस आर्द्रात प्रवेश करण्याच्या बेतात असतानाच पेरण्यांना सुरुवात होणार होती.ह्या वर्षी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार होत्या. आषाढातल्या एकादशीची जसा वारकरी आतुरतेने वाट पाहत असतो, अगदी तश्याच ह्या निवडणुकांची गावात वाट पाहिली जायची.राजाभाऊ जाधवांना ह्या निवडणुकांशी काही देणे घेणे नव्हतेच असे नाही, पण अगदी टोळक्यांत बसून त्यावर चर्चा करण्या इतपत रसही नव्हता. नाही म्हणायला त्यांच्या मावसं काकांच्या, नानासाहेब पाटलांच्या गळ्यात दरवेळे सारखीच अध्यक्ष पदाची माळ पडणार की नाही ह्या बाबत मात्र त्यांना शंका होती.
नानासाहेबांच्या रक्तातच राजकारण होते. येनकेन प्रकारेण गेल्या २५ वर्षांपासून नानांनी अध्यक्षपदाच्या खुर्चीवरची मांड सैल पडू दिलेली नव्हती. नानांचा दरारा व वचक गांवात भल्याभल्यांना ठाऊक होता.त्यांच्या वरताण त्यांची दोन्ही मुले होती. 'बाप सें बेटा सवाई' ह्या म्हणीचे उदाहरण देण्यासाठी त्यांचा उपयोग केला जावा इतकी त्यांची ख्याती होती. गांवात भावकीची भांडणे सोडवायला त्यांना बोलावणे गेल्यास दोन्ही पक्ष पस्तावलेच समजायचे ! जमिनीच्या तुकड्यावर कोणा शेतकऱ्याने सावकाराकडून कर्ज घेतल्यास त्याने निमूटपणे व्याज व मुद्दल दिलेलेच बरे... कारण सावकार तर दूरच राहायचा; पाटीलच तो शेतीचा तुकडा सावकाराकडून पडेल किंमतींत उचलून घशांत घालायचे. तक्रार करायची सोयच नव्हती ! जो कोणी पाटील वाड्याकडे वाकड्या नजरेने बघेल त्याची कंबक्तीच भरली समजायची ! नानांची दोन्ही पोरे त्याच्या घरावरून गाढवाचा नांगर फिरवायला कमी करणार नव्हती... वरून घरच्या आया बायांची इज्जत वाड्याच्या वेशीवर टांगली गेली असती ते वेगळेच.
नानासाहेब पाटलांचा मोठा सुहास लांडग्याच्या जातीचा होता.... स्वतःची मुले मोठी असूनही चांगलाच रगेल होता.त्याच्या समोर घरातल्या मोलकरणीही वावरायला टाळततर धाकटा सुनील कोल्ह्याच्या जातीचा होता. बायको बरोबर मेहुणीलाही त्याने घरात आणलेली होती. लग्नच त्या अटीवर केले असे गांवातले लोकं कुजबुजतं !हे सर्व कमी की काय तर त्यात भर होती ती त्यांच्या चमच्यांची.... गांवातली काही तरणी पोरे सुनील व सुहासला पाठिंबा देण्याच्या नांवाखाली चांगलीच वाह्यातपणा करीत. सुहासच्या बायकोच्या भावाची, रमेशची त्याला जोड होतीच. अर्थात गांव तेथे उकिरडा असणारच म्हणत जाणती मंडळी ह्या प्रकारांकडे काणाडोळा करीत.यंदा नानासाहेब पाटील स्वतः: निवडणूक लढवण्याच्या मन:स्थितीत नव्हते. विधानसभेच्या तिकिटासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मोठ्या मुलाला, सुहासला परिषदेचा अध्यक्ष बनवायचा त्यांचा मनसुबा होता.
राजाभाऊ जाधवांना ह्या सर्व प्रकारांशी वैयक्तिक देणे घेणे काहीच नसले तरी लॉ कॉलेजला प्रोफेसर असलेल्या राजाभाऊंना नानांच्या व त्यांच्या मुलांच्या प्रत्येक वर्तणुकीची किळस येई.स्वतः सुशिक्षित, त्यात पत्नी सुविद्य शिक्षिका असल्याने त्यांच्या संस्कारक्षम मनाला कित्येक गोष्टी पटत नसत. सुरुवातीला त्यांनी नानांना समजवण्याचा व्यर्थ प्रयत्न केला मग विरोध करण्याचा पण त्यामुळे स्वतःचेच नुकसान होते हे कळल्याने त्यांनी गप्पच बसणे पसंत केले होते.राजाभाऊंच्या पत्नी सुरेखालाही नानासाहेबांच्या घराशी नाते जोडून ठेवणेही वैचारिकपणे विसंगत वाटे. एका शिक्षिकेत असणारे सारे गुण सुरेखाताईंमध्ये होते. मुलांच्या मानसिकतेची त्यांना जाण तर होतीच, पण त्यांना तळमळीने शिकवण्याची वृत्तीही त्यांनी अंगिकारलेली होती. लहानग्या वैशाली बरोबर तिघांचा संसार सुखात होता. जोड देण्यास राजाभाऊंची आई सोबतीला होतीच.****************************'जिल्हा सहकारी दूध फेडरेशन संघा'चे संचालक संतोषभाऊ चौधरी नानासाहेब पाटलांचे कट्टर विरोधक. नानांच्या "विकास आघाडी" ह्या पक्षाच्या विरोधातला त्यांचा "जनजागृती" पक्ष चांगलाच संघर्ष देत असे. समितीच्या अध्यक्षाच्या पदास आपण कसे पात्र आहोत हे ते आपल्या समर्थकांकरवी गावकऱ्यां पर्यंत व्यवस्थित पोहचवत होते. ह्यावेळी नानासाहेब पटलांना धूळ चारण्याचा ठाम निर्धार संतोषभाऊंनी केलेला होता.संतोषभाऊंनी वाणिज्य पदवी घेतल्यावर पुढे व्यवस्थापनात पदवी घेण्यानिमित्ताने परदेशवारी केली होती. वडिलांचे आधिपत्य असलेल्या दूध फेडरेशन संघावर स्वतः:चा ठसा निर्माण करून बिनविरोध वर्चस्व प्रस्थापित केले होते. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांचे ब्रीद वाक्य असे. गावात फक्त राजकारण न करता समाजकारणही रुजवण्यात त्यांचा मोठा हिस्सा होता. राजाभाऊ जाधव प्रोफेसर असलेल्या महाविद्यालयाचे संस्थापक संतोष भाऊच होते. राजकीय सत्तेत प्रवेश मिळाल्याखेरीज मनाजोगता विकास साध्य करता येणार नाही हे त्यांना चांगलेच ठाऊक होते व म्हणूनच नानासाहेब पाटलांची राजकीय सद्दी संपवावीच लागणार हे ते जाणून होते.राजकारण किंवा समाजकारणात सार्वजनिक चारित्र्य स्वच्छ ठेवावेच लागणार अन्यथा त्याचा परिणाम वैयक्तिक, तसेच पुढे जाऊन सामाजिक जीवनावर होईल ह्याची कल्पना त्यांना होतीच. छोट्या गांवात कुठलीही कुलंगडी लपून राहणार नाहीत तेव्हा त्या वाटेला जायचेच नाही अशी पक्की खूणगाठ त्यांनी बांधून ठेवलेली होती.स्वतःच्या आसपास महिला कार्यकर्त्यांचा घोळका असला तरी त्याबरोबर तितकेच पुरूष कार्यकर्ते असायलाच हवेत हा दंडक त्यांनी पाळलेला होता.बऱ्यापैकी शिकलेली खानदानी घरातली बायको, लॉ कॉलेजला शेवटच्या वर्षात शिकत असलेली कन्या व चौदावीत शिकणारा व 'बिझीनेस मॅनेजमेंटला' प्रवेश मिळण्याची स्वप्ने बघणारा मुलगा हा त्यांचा संसारिक पसारा होता. आजोबा, आजी, आई, वडील, दूरची विधवा आत्या, नोकर गडी तसेच आला-गेला, पै- पाहुणा अशा बयाच मंडळींचा राबता असलेले त्यांचे घर होते. घरची श्रीमंती व शेती वाडी घरात कसलीही कमतरता भासू देत नव्हती. लक्ष्मी बरोबर सरस्वतीनेही वरदहस्त ठेवलेला असल्याने संतोष भाऊंचे नांव सार्थकी लागलेले होते.मिठ्ठास वाणी, समोरच्या व्यक्तीचे संभाषण पूर्ण झाल्याशिवाय न बोलण्याची सवय, आग्रही व मनमिळाऊ स्वभाव असे कित्येक गुण संतोषभाऊंनी प्रयत्नपूर्वक आत्मसात केले होते. व्यवस्थापनात घेतलेली पदवी आचरणात आणण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे होते. राजाभाऊ जाधवांवर त्यांचा खास लोभ होता. प्रियाचे लाडके शिक्षक, चांगला शिकलेला गुणी माणूस व गरीब परंतू स्वकष्टावर वर आलेल्या ह्या प्राध्यापकाबद्दल त्यांना नितांत आदर होता. राजाभाऊंचाही संतोषभाऊंवर खास लोभ होता. इतर सर्व गावकरी त्यांचा संतोषभाऊ नावाने उल्लेख करीत, एकटे राजाभाऊ त्यांना "सर" म्हणत.जमीन अस्मानाचा फरक असलेले हे गांवातले दोन मोठे राजकारणी एकमेकांना पुरते जोखून होते. व म्हणूनच की काय त्यांचे समर्थकही कधी आपापसांत लढत नसत. दोघांच्याही मनांत एकमेकांबद्दल सुप्त अढी होती, तरीही वरकरणी त्यांची समोरासमोर कधी जुंपली नाही. गांवातले वातावरण तणावमुक्त ह्या मुळेच राहिलेले होते.यंदाच्या निवडणुकांमध्ये चित्र वेगळे असेल व नानासाहेब पाटील व संतोषभाऊ चौधरी एकमेकांसमोर उभे ठाकणार असे लोकं कुजबुजायला लागले होते.

तेजस्विनी-२

स्वर्गीय राजीव गांधींनी राजकारणात सुरू केलेल्या स्थानीय स्वराज्य संस्थांत महिला आरक्षण पद्धतीचा फायदा ह्या वेळी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत स्त्रियांना देण्यात येणार असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा जी.आर. परिषदेच्या सचिव साहेबांच्या टेबलावर पडला आणि परिषदेच्या समितीवर जणू काही वीजच पडली !
"च्यामारी आता बाया समितीच्या अध्यक्षा व्हनार की काय रं गड्या ?" पाटलांच्या पोराच्या, सुहासच्या तोंडातून हे वाक्य पडताच सचिवांच्या कार्यालयातल्या कारकुनाने फक्त मान हालवली.सुहासच्या बथ्थड डोक्यात तो हो बोलतोय की नाही ते शिरलेच नाही."**ला तुझ्या, तोंडानं सांग की रं व्हय म्हनतोय की न्हाय त्ये""साहेबांना विचारून उद्या कळवतो" कारकून मोकाशीने उत्तर दिले."**च्या, मग मुंडी कश्यापायी हालवतूस ?" सुहासचा जळफळाट होत होता.न जाणो हे दिवटं उद्या परिषदेचा अध्यक्ष झालं तर डोक्यावर मिऱ्या वाटेल म्हणून मोकाशी गप्प बसला."नानासाहेबांनीबी ह्यो कसलं लचांड तुमच्या मागे लावलंय, अध्यक्ष बनवायचं ?" सुहासचा मेहुणा, रमेश सावली सारखा त्याच्या बरोबर राही. अगदी तमाशाच्या फडातल्या नायकिणीशी ओळख करायच्या वेळीही तो मागे राहत नसे."त्यांस्नी विधानसभेवर जायच हाय आता, गांवात आपलं राज्य आलं पाहिजे रमेश""जाऊ द्या हो सुहास राव, कश्यापायी नाराज व्हताय, असा रूल आला तरीबी बायकोला पुढं करून आपणच राज्य चालवायचं की त्या लालू प्रसाद सारखं " खुसखुशीत हसत फेगडे म्हणाले. यावल तालुक्यातले फेगडे कुटुंबीय वर्षांपासून नानांना अध्यक्षपदाच्या निवडणुकांत तालुक्यातल्या समितीची मते मिळवून देत."आपल्या समाजातल्या बायका डोईवरचा पदर खाली पडू द्येत न्हाईत तर अध्यक्षीण कश्या बनतील" सुहासला काळजी आपल्या खुर्चीची लागलेली होती. बोलता बोलता तो खुर्चीवरून उठला त्याच्या पाठोपाठ त्याचे दोघे चमचे लगबगीने उठले.मोकाशी ऐकल्या न ऐकल्या सारखे करीत डोकं एका रजिस्टरांत खुपसून बसला होता."मोकाश्या, ते मोरीच्या बांधकामाचे टेंडर कधी पास करतुयस ?""आता आचार संहिता लागू झाली सुहासराव, टेंडर बारगळलं !""**ला ह्या संहितेच्या, ह्या ***च्याला कधीचा बोंबलतोय, टेंडर पास कर म्हणून" सुहासचा चेहरा लालबुंद झालेला होता. "**व्या टेंडर हातातलं गेलं तर तुला दावतो पाटलाचा हिसका" "भ"ची बाराखडी उगाळत सुहास खोलीच्या बाहेर पडायला वळला तोच त्याची नजर दारांत उभ्या असलेल्या संतोषभाऊंवर पडली. एक क्षण काय बोलावे ते त्याला सुचेना. कसंबसं 'कसे आहात' असा प्रश्न टाकत तो चमच्यांसह तेथून सटकला. संतोषभाऊंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य का उमटले त्याचाच त्याला प्रश्न पडला होता.
"राजपुत्राचा आज श्लोक पठणाचा वार होता का मोकाशी ?" सुहास गेल्या दिशेला बघत त्यांनी हसत हसत मोकाशींना विचारले."जाऊ द्या हो संतोषभाऊ आम्हाला हे रोजचेच आहे. कार्यालयात बाई माणूस कर्मचारी असूनही ह्यांची ही असली भाषा ऐकून घ्यावी लागते. आता तुम्हीच काय करता येईल तर पाहा ""अहो, असे नाराज नका होऊ मोकाशी, हे कुत्रं जास्त भुंकू नाही शकणार आता."" काय सांगू संतोष भाऊ.... आता तेहतीस टक्के जागांवर महिलांना आरक्षण द्यायचा निर्णय सरकारचा, मिरची लागली ह्यांना..... त्यात भरडले आम्ही जातोय" मोकाशींच्या तोंडून खरे कारण बाहेर पडले."मरू द्या, मोकाशी आमच्या वसतिगृहाच्या परवानगीचे पत्र पोहचले. त्याबद्दल व्यक्तिशः: धन्यवाद देण्यासाठी आलोय मी खासं" लॉ कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी गाव-तालुक्यातून मुली येत. त्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून संतोषभाऊंनी वसतिगृहाच्या कच्च्या आराखड्यासह परवानगी मागणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते. त्यात मोकाशींनी त्यांना खूप मदत केली होती."काय हे संतोषभाऊ, अहो साधा फोन केला असतात तरी चाललं असते, आपण उगीच तसदी घेतलीत" मोकाशीच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव तरळले."असं कसं चालेल, मग आमच्या पुढच्या कामाच्या वेळी तुम्हाला वाटेल 'बघा, संतोषभाऊ मोठी माणसं झालीत, आता भेटायलाही येत न्हाईत." हसत हसत खुर्चीवरून उठत ते म्हणाले."भाऊ, बसा नं, चहा मागवतो" मोकाशी लगबगीने उठले."नको, त्यापेक्षा तुम्हीच कधी बंगल्यावर या सकाळच्याला, चहा नाश्ता जोडीनच घेऊ....." म्हणत ते दाराकडे वळले. "महिला आरक्षणाच काय म्हणालात तुम्ही मोकाशी ?" सहज खडा टाकावा तसे संतोषभाऊ बोलले."ह्या वेळेचे नक्की माहीत नाही" मोकाशी खाजगीत बोलल्यासारखे बोलले. "पण तेहतीस टक्के जागांवर महिला उमेदवार येणार हे नक्कीच, तसा जी आर काढलाय जिल्हाधिकायांनी. अध्यक्षांच्या पदासाठी काय करायचे त्याबद्दल मीटिंग आहे जळगांवला, तेथेच गेलेत आमचे साहेब""बरंय, स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटेल आता, व पाटलांची वाचा त्यांच्या ताब्यात राहील." हसत हसत ते बाहेर पडले तेव्हा 'किती साधा माणूस आहे' हा विचार मोकाशींच्या डोक्यात आला.******************सुरेखाताईंना दारांत उभे असलेले बघून राजाभाऊ जाधवांना आश्चर्य वाटले. स्कूटर स्टॅंडवर लावत त्यांनी विचारले, "काय हो, काय झालं ?""आल्या आल्या बंगल्यावर पाठवा, चहा व रात्रीचे जेवण आम्ही बंगल्यावरच घेऊ असा निरोप धाडलाय संतोषभाऊंनी" "बरं, हात पाय धुऊन जरा फ्रेश होऊन मग जातो... तोवर तुम्ही चहा पाजा घोटभर आम्हाला" राजाभाऊ घरांत शिरत बोलले."अहो, उशीर होईल नं" "आता अंमळ दहा मीनीट उशीरानंच आलो असतो तर?" ह्या राजाभाऊंच्या प्रश्नाला त्यांच्या कडे उत्तर नव्हते.बंगल्यावर वासूभाऊ, इंदूताई भराडे, शेळके गुरुजी, देसाई साहेब, प्रा. फिरके वगैरे मंडळी बघून राजाभाऊ बुचकळ्यांत पडले. वेगळेच काही तरी प्रकरण दिसतेय हा विचार मनांत आणत व सर्वांना यथायोग्य अभिवादन करीत ते एका खुर्चीत बसले.सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळल्यात हे बघून जरा ओशाळल्यागत होत ते म्हणाले "उशीर झाल्याबद्दल माफी मागतो, सर" "त्यात काय माफी मागता राजाभाऊ, सगळे आत्ताच आलेत." ह्या संतोषभाऊंच्या वाक्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. घसा खाकरतं त्यांनी राजाभाऊंकडे बघत बैठकीला सुरुवात केली.....
"आज झेड पी च्या कार्यालयातल्या मोकाशीची भेट घेण्यास गेलो होतो......" त्यांनी महिला आरक्षण विधेयकाचा विषय सर्वांसमोर मांडला. राजाभाऊंना महिला आरक्षण विधेयकाबद्दल बरेच काही माहीत होते. लॉ कॉलेजचे प्राध्यापक असल्याने तो त्यांचा शिकवण्याचा विषयही होता. संतोषभाऊंचा आपल्यावर लोभ आहे ह्याची जाण त्यांना होती पण ह्या राजकीय निवडणुकांच्या बैठकीत आपले नेमके स्थान कोणते ह्याबद्दल त्यांना अंदाज येत नव्हता.
"कसला विचार करताय राजाभाऊ ?" सरांच्या बोलण्याने एकदम ते भानावर आले."मला ह्या विधेयका बद्दल पूर्णं माहिती आहे. सध्या सरकारने फक्त सदस्यांसाठी हे विधायक लागू केले आहे परंतू येत्या पाचं वर्षांत समितीच्या कार्यकारणीवरही ते लागू होईल असा आम्हा विश्लेषकांचा अंदाज आहे." राजाभाऊ शांतपणे बोलत होते, संतोषभाऊंची कौतुकाने भरलेली नजर आता त्यांना सवयीची झालेली होती."हो, मोकाशीही तेच बोलत होते. ह्यावेळी तेहतीस टक्के जागा महिलांसाठी राखीव म्हणून ठेवण्यात येणार आहेत. मात्र त्यांना कार्यकारणी सदस्य किंवा अध्यक्षपदाबद्दल काहीही कल्पना नाही.""साहजिक आहे... कारण, सरकारने तसे स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. ह्या वर्षी हे विधेयक कदाचित प्रयोगाखातीर आणण्यात येईल असा आमचा होरा आहे." राजाभाऊंनी नेमकी परिस्थिती सांगितली. "ह्या विधेयकाला मिळणारा प्रतिसाद व त्याचे येणारे रिझर्ल्ट्स ह्यावरच बाकी सर्व अवलंबून आहे. अत्यंत घाईघाईत हे विधेयक सरकारने सभागृहासमोर मांडून गेल्या अधिवेशनात पास करून घेतले आहे." राजाभाऊंना आपल्याला ह्या बैठकीत का बोलावण्यात आले असावे ह्याचा हळूहळू अंदाज येत होता.
"संतोषभाऊ असे घडले तर आपणांस समितीच्या अध्यक्षपदासाठी उभे राहावे की नाही हे ठरवावे लागणार आहे." देसाई साहेब म्हणाले. देसाई हे जिल्ह्यातले प्रथम आय ए एस अधिकारी होते. मराठी आय ए एस बरेच होऊन गेले पण जळगावांतले आय ए एस म्हणून देसाईंचे नांव सर्वप्रथम होते. संतोषभाऊ चौधरींच्या कारकीर्तीद त्यांनी मिळवलेल्या माणसांपैकी देसाईंचा नंबर बराच वरचा होता. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून जळगाव जिल्हा दूध फेडरेशन संघाचे सुकाणू त्यांनी सांभाळले होते."असे कसे म्हणता देसायी साहेब ? आता भाऊंना कोण विरोध करतूय त्येच पाह्याचय मलाबी " इंदूताई भराडे आक्रमकतेबद्दल व शीघ्रकोपी पणाबद्दल तालुक्यात प्रसिद्ध होत्या. पण हाडाची कार्यकर्ती, मेहनती व झोपडपट्टी वासीयांची कैवारी म्हणूनही त्या प्रसिद्ध होत्या. इंदूताई मूळच्या "विकास आघाडी" पक्षातल्या पण सुहासची मर्जी फिरल्याने त्यांना पक्ष बदलावा लागला होता. इंदूताई म्हणत, 'त्या मेल्याची नजर वाईट आहे' तर सुहासचे चमचे म्हणत, 'सुहासचे मन भरले होते' त्यांनी पक्ष सोडल्यानंतर दोघेही एकमेकांसमोर कधीही आले नव्हते म्हणून सत्य गुलदस्त्यातच होते.
"इंदूताई, प्रश्न विरोधाचा न्हाई, सरकारच्या निर्णयाचा हाय" शेळके मास्तर भीत भीत बोलले. "बरोबर आहे मास्तर, सरकारचा निर्णय बंधनकारक तर आहेच पण तो आपण सर्वांनी योग्य वेळी स्वीकारल्यास विरोधकांवर व्यवस्थित बाजी मारता येईल." संतोषभाऊंनी मध्यस्थी केली. "आजचे मरण उद्यावर ढकलण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा डोळसपणे स्वीकार करावा म्हणून ही खास समर्थकांची बैठक मी बोलावली आहे. मंडळी, आपण जो विचार कराल तो येथे उस्फुर्तपणे मांडा त्यातून काही उपाय निश्चित निघेल असे मला वाटते." संतोषभाऊंनी त्यांचे मनोगत मांडले.बऱ्याचं चर्चाचर्वणानंतर व जर तर च्या कहाण्यांना अनेक फाटे फोडत जेवणाची वेळ जवळ आल्यावर चर्चा संपुष्टात आली.
मालती वहिनींच्या हातच्या सामिष भोजनाचा व प्रियाशी सध्याच्या कायदेविषयक चर्चेचा आनंद घेत राजाभाऊंनी जेवण उरकले. वहिनींचा व इतर सर्वांचा निरोप घेऊन ते दरवाज्यापर्यंत पोहचलेच होते इतक्यात "राजाभाऊ उद्या कार्यालयात भेटा" असा आग्रहवजा आदेश संतोषभाऊंनी त्यांना दिला. "हो सर नक्की" इतकेच बोलत व जिभेवरची बडीशोपेची चव चाखत त्यांनी सरांचा निरोप घेतला.

तेजस्विनी-३

"त्यात ठरवायचं काय ? संतोषभाऊंनीच अध्यक्षपदासाठी प्रयत्न करावा. देसाई दरवेळी उगीचच पिल्लू सोडतात" सुरेखाताईंचे मत कपडे बदलता बदलता राजाभाऊ शांतपणे ऐकत होते."नाही, ते जर परिषदांच्या निवडणुकांना उभे राहिले तर नक्कीच निवडून येतील पण सरकारच्या अधिनियमामुळे त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले किंवा मिळाले नाही तर तो त्यांचा अपमान होईल." राजाभाऊ उत्तरले." तुमचे उगीच काहीही, त्यात काय इतका मोठा अपमान होणार ? असले तर पद स्वीकारावे, नाही तर दुसऱ्या पदाकडे वळावे माणसाने....." सुरेखाताई व राजाभाऊंचा संवाद सुरू होता.राजाभाऊ कधीही पत्नीला 'तुला काय कळतंय' ह्या अर्थाने हिणवत नसत. स्वतः:ची मते तिने मांडावीत ह्यासाठी ते आग्रही असत."मग त्यापेक्षा दुसऱ्या पदाकडेच सुरुवातीपासून का लक्ष देऊ नये ?' राजाभाऊंच्या प्रश्नाचे उत्तर सुरेखाताईंकडे नव्हते." जाऊ द्या, मला झोप येतेय...." असं बोलत, त्या वैशालीला कुशीत घेऊन झोपण्याची तयारी करू लागल्या."मग त्यापेक्षा दुसऱ्या पदाकडेच सुरुवातीपासून का लक्ष देऊ नये ?' ह्या आपल्याच वाक्यावर राजाभाऊ विचार करू लागले. विधानसभेच्या निवडणुकांत नानासाहेब पाटलांच्या विरोधात संतोषभाऊ उभे राहिल्यास काय होऊ शकेल ह्याचा विचार करता करता त्यांना झोपेने घेरले.***********************"काय मास्तरीण बाई, आमचं पोरगं धडं शिकत हाय की न्हाय शाळेत ?" सुनील पाटलाचा आवाज सुरेखा ताईंनी ओळखला व 'दैनिक लोकशाही' मधून डोकं वर काढून त्यांनी सुनील पाटलाकडे रोखून पाहिले."काकी कशा आहेत ?" त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न केला."आता तुमी घराला यावा काकीची चौकशी करायला. पोराची चौकशी करण्यासाठी आलू आमी इथं" पाटलाच डोकं ठिकाणावर येत नव्हत. समोरची मास्तरीण आपली भावजय आहे हेही तो विसरला होता."शिक्षणाचा व पाटलांचा संबंध असतो का कधी ? ह्या इयत्तेत पास झाला तर तुमच्या ऐवजी, मी पेढे वाटीन.. बरं भाऊजी !" सुरेखा ताईंना ह्या प्रकारांची चांगली सवय झालेली होती. इतक्या सहजा सहजी त्या पाटलाशी बोलण्यात हरल्या नसत्या."पाटलांना शिकून कुठल्या शाळेत नोकरी करायची हाय का ? जमीन अन शेती बघायला फुरसत न्हाय आमच्या कड तिथं खर्डेघाशी कोन करील?" पाटील फुकाचा रुबाब दाखवत बोलला."मग पोराला शाळेतून घरी न्यायला आलात, असं सांगा की भाऊजी; विलास..... साहेबांना मुख्याध्यापकांकडे घेऊन जा, म्हणावं पिंटूचे वडील आले आहेत त्याचे नांव कमी करायला..... भाऊजी, तुम्ही ह्याच्या बरोबर जा" सुनील पाटलाचं तोंड जोडा मारल्यागत झालेले पाहून टीचर्स रूम मध्ये बसलेल्या सगळ्या शिक्षकांना आतून आनंदच झाला."तसं काय बी न्हाय वैनीबाय, आमी आपलं चौकशी करायला आलो व्हतो पोराची; तुमास्नी उगीचच राग आला" सारवासारव करायच्या मूड मध्ये पाटील बोलले."आता हो भाऊजी, वैनी कधी रागावेल का लहान दिरावर ? चौकशी झाली असली तर जाऊ म्हणते, गणिताचा तास घ्यायचा आहे वर्गात." सुरेखा ताईंनी सुनील पाटलाला स्वतः:च्या जागेची ओळख करून दिली."आयला, वैनीताई लई गरम माथ्याच्या हैत की तुमच्या" एक चमचा सुनीलला टीचर्स रूमच्या बाहेर आल्या आल्या बोलला."लई माज चढलाय ह्यांना, त्यो संतोषभाऊ जवळचा वाटतो आमच्या पेक्षा, ईलच कधी काम सांगायले घरी तवा बघीन सालीला""काय मास्तुरे, बरं हाय ना?", मुख्याध्यापकांच्या खोलीत सरळ शिरत सुनील बोलला."या, पाटील, आज कशी आम्हा गरीबाची आठवण आली ?" हेडमास्तर दीनवाणे पणाने बोलले."आमच्या वळखीच्या एक बाई हाईत पाडळस्याच्या प्राथमिक शाळेत, त्यांन्सी इथं ट्रान्स्फर करून घ्या मास्तर""आस्स व्हयं, काय नांव म्हणलात बाईंचं ?" हेडमास्तरांनी विचारले."मोहिनी इंगळे नांव हाय, इथल्याच हैत, यायला जायला अक्षी तरास होतो बाई माणसाला म्हणून आलो होतो खास ""बरयं, जरा तहसीलदार कचेरीत ही सांगा, म्हणजे ट्रान्स्फर चं काम लौकर हुईल" मास्तरांनी सुचवले. मास्तरांना माहीत होते, ह्या मोहिनी इंगळेंची बऱ्याच जणांनी शिफारस केली होती. नानासाहेब पाटलांच दिवटंही तीच्या मागे लागलंय म्हणजे काही तरी वेगळंच प्रकरण असणार. मास्तरांनी लगेच पाडळस्याची फाइल मागवली.***************************राजाभाऊ कॉलेजातली लेक्चर्स सुरू असतानाच, मोकळ्या वेळेत संतोष चौधरींना भेटायला गेले. त्यांचे कार्यालय कॉलेज पासून जवळच असल्याने फारसा प्रयास पडणार नव्हता. दोनच क्षणांत संतोषभाऊंनी त्यांना स्वतः:च्या दालनात बोलावले."काय घेणार ? चहा की काही थंड ?" बसत नाही तोच त्यांनी प्रश्न विचारला."चहा चालेल" राजाभाऊंनी बऱ्याच वेळा येथे येण्याचे केले असल्याने त्यांना सरांच्या पद्धती चांगल्याच ठाऊक होत्या." कालच्या बैठकीत तसा निर्णय काहीच घेता आलेला नाही, प्रत्येकाचे मत स्वतंत्र्यपणे ऐकणे चांगले म्हणून मी सर्वांनाच एक एकटे भेटायला बोलावले आहे." संतोषभाऊंनी प्रस्तावना केली."बरोबर आहे सर..... माझ्या मते आपण सरळ विधानसभेच्या जागेसाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहावे." राजाभाऊंनी मुद्द्यालाच हात घातला.मेजावर पडलेल्या पेपर वेट फिरवत संतोषभाऊ विचार करून म्हणाले, "मग झेड पीच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवार तयार करावा लागेल.""देसाईंना विचारले तर ?" "नको नको; त्यांच्यावर दूध महासंघाची बरीच जबाबदारी आहे. त्यावर आधिपत्य ठेवणे भाग असल्याने त्यांना मी हालवू शकत नाही. मला तुमच्याबद्दलही विचार करायचा नाही; कारण राजकारण हे तुमचे क्षेत्र नाही राजाभाऊ, वाईट वाटू देऊ नका""नाही सर..... तो विचार तर मी स्वप्नातही करणार नाही" राजाभाऊ गडबडून म्हणाले."राजाभाऊ तुम्ही व देसाई माझे कायदे विषयक सल्लागार म्हणून जवळ आहात त्यातच मला समाधान जास्त आहे." संतोष भाऊ स्वगत बोलल्यागत बोलले."आपल्या जवळच्या वर्तुळात बरीच मंडळी आहेत सर; वासूभाऊ, फिरके, शेळके मास्तर, विचारे साहेब, भराडे बाई....." राजाभाऊ पटापट नांव घेत होते."भराडे बाई म्हणजे तोफखाना आहे.... काही वेळा राजकारणात इतके उतावीळ होऊन चालत नाही, पण त्यांना समजावण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. ह्या वेळीच जर महिला उमेदवार दिला तर आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीसाठी तो प्लस पॉंईंट ठरेल""प्रियाला विचारून बघा नं सर" राजाभाऊ सहज बोलले. "प्रिया पेक्षा वहिनींचा विचार मी करत होतो" पटकन संतोषभाऊंच्या तोंडातून वाक्य पडलं."बापरे, सुरेखाला कसे जमेल ? नाही नाही, नको सर....." राजाभाऊ घाईघाईत बोलले."राजाभाऊ, निवडणुकीला उभे राहिले म्हणजे निवडून आलेच असे नाही..... व निवडून आले म्हणजे पोस्ट मिळाली असे नाही.... विधानसभांच्या निवडणुकांच्या आधी झेड पी च्या निवडणुका आहेत. आपल्याला स्वबळावर कितपत निवडणुका लढवता येतील हे झेड पीच्या निवडणुकांतून कळेल."राजाभाऊंना सरांनी सांगितलेला शब्द न शब्द पटत होता पण सुरेखाचे नांव झेड पी च्या निवडणुकांसाठी येऊ शकेल ह्याचा स्वप्नातही त्यांनी विचार केलेला नव्हता."राजाभाऊ, शांत पणे विचार करा. मला पूर्णं कल्पना आहे की राजकारण घाणेरडे असते. पण चिखलात सगळी बेडकीच नसतात तर कमळेही उगवतातच ना !""......!" राजाभाऊ निःशब्द होते."वहिनी शिकलेल्या आहेत, शिक्षिका आहेत, स्त्रियांच्या समस्यांची जाण त्यांना आहे. तालुक्यातले प्रश्न त्यांना ठाऊक आहेत व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यात राजकारणी व्यक्तीला लागणारा तडफदारपणा आहे......" संतोषभाऊंनी नेमक्या शब्दांत केलेले तंतोतंत वर्णन ऐकून राजाभाऊ निरुत्तर होत होते."राजाभाऊ, आपण सुशिक्षितांनी काठावर उभे राहून गंमत किती काळ पाहायची ? वर आपणच सिस्टिमला दोष देतो पण जोवर सुशिक्षित मंडळी सक्रिय राजकारणांत उतरणार नाहीत तोवर पाटलांसारख्या व्यक्तींचे घाणेरडे चाळे आपल्याला सहन करावे लागतील.""सर, मी तिला सांगितले तरी ती ह्या बाबतीत माझे ऐकणार नाही" राजाभाऊंनी शेवटचा प्रयास करून पाहिला."मान्य !...मी सांगून पाहतो, मग त्या नक्कीच तयार होतील. आज आपल्याकडेच सायंकाळचा चहा घेऊया, म्हणजे निवांत गप्पाही मारता येतील. वहिनींना सांगा, चहाबरोबर माझी आवडती भजीही तयार ठेवा !"

तेजस्विनी-४

"संतोषभाऊ, मोकाशी म्हणून कोणा गृहस्थांचा फोन आहे""द्या त्यांना लाइन " मोघम संतोषभाऊंनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाला सांगितले."नमस्कार भाऊ.... मी मोकाशी बोलतोय""बोला मोकाशी, काय सेवा करू आपली ?""काय भाऊ, लाजवता पामराला, मीच आपली सेवा करण्यास फोन केला..... जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आलेला आहे, ह्यावेळी परिषदेच्या ३३% जागा महिलांसाठी राखीव आहेत पण अध्यक्षपद दोन निवडणुकांनंतर महिलांना मिळावे अशी शिफारस केलेली आहे" मोकाशीने एका दमांत बातमी सांगितली."मोकाशी, ३३% म्हणजे किती जागा होतील नक्की ?" उगीचच काहीतरी विचारायचे म्हणून संतोषभाऊ म्हणाले."१६ जागा होतात साहेब- एकूण ४७ जागा आहेत पण.....""कळलं, ह्या निवडणूकीपासूनच सुरुवात होणार मग अध्यक्षपद महिलेला की पुरुषाला देणार मोकाशी ?"" भाऊ, यंदा निवडणुका झाल्यावर झेड पी मेंबर जे नक्की करतील त्यानुसार अध्यक्षपद दिले जाईल. आता सर्व काही मेंबर्सवर अवलंबून असेल." मोकाशींनी रिपोर्ट दिला."बरयं, मी कचेरीत येऊन भेटतो तुम्हाला उद्याच" भाऊंनी निरोपाचे वाक्य उच्चारले.बरं एव्हढेच म्हणत मोकाशीनेही संभाषण तोडले.******************"सुहासराव जरा डोस्क ठिकाणावर आना अन आमी काय सांगतूय ते ऐकून घ्या" नानांच्या समोर बसलेल्या सुहास पाटलाला फर्मान सुटले तसा तो गोंधळला."व्हयं दाजी" अस तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो समंजसपणाचा आव आणून नानासाहेबांसमोर उभा राहिला."ह्या निवडणुकांमधी १६ जागा बायकांसाठी रिजर्व ठेवल्यात सरकारानं, आता जरा बाई माणसाशी वागताना, बोलताना तोंडातली लाळ आवरत चला. न्हायतर आमी तिथं विधानसभेची तयारी करीत राहू अन इथं तुमी बायकांच्या मागे लागून हातची सत्ता गमावाल" नानांचा आवाज करडा होत चालला होता.सुहास मान खाली घालून उभा होता. त्याला आपल्या बापाचा स्वभाव चांगलाच माहीत होता. वयाने मोठी झाली असली तरी दोन्ही दिवटी नानांसमोर नजर उचलायची हिंमत करीत नसत."त्या मोकाश्याला शिव्या घालताना मागे तो चौधरी उभा आहे ह्याचे भान होते का तुम्हाला?" नानांचा आवाज चढत होता. "अशा रितीने सार्वजनिक ठिकाणी डोस्कं फिरवून घेतलं तर ऐन निवडणूकीच्या काळात जनतेची दुश्मनी ओढवून घ्याल. आता विधानसभेच्या निवडणुका होई पर्यंत थोबाडावर लगाम लावायला शिका" नानांनी हजेरी घ्यायला सुरुवात केली अन त्याच वेळेला सुनीलने प्रवेश केला."या... इंगळे बाईंच्या कामासाठी गेला होतात वाटत ?""........." आपल्या बापाला घरबसल्या गावातल्या गोष्टी कश्या कळतात ह्याचेच दोघांना आश्चर्य वाटायला लागले."दोघांनाही जतावून सांगतोय, निवडणुकांच्या काळात काही भानगडी गावांत कराल तर गावकऱ्यांसमोर तंगड तोडीन मी..... तुमच्या बरोबर फिरणाऱ्या लोकांनाही सांगून ठेवा, ह्या काळातल्या कुठल्याही भानगडीत मी तुम्हा लोकांना मदत करणार न्हाई.""व्हयं दाजी !" हजेरी द्यावी तसे दोघे एक सुरात बोलले." सुनीलराव, उद्यापास्न दादा बरोबर फिरायचं. ह्याच टाळकं जिकडे सरकेल तिकडेच त्याला आमची आठवण करून द्यायचे काम तुमचे. त्या चौधरीच्या बरोबर कोण कोण फिरतो, त्याचे रिपोर्ट हवेत मला रोज च्या रोज" नानासाहेब राजकारणातले बारकावे जाणून होते, दोघा पोरांनी आपल्या कडून काहीतरी शिकावे अशीच त्यांची सतत इच्छा होती."दाजी, जाधवांकडची मंडळी त्याच्या माग पुढं फिरत असत्यात" सुनीलने चुगली केली"व्हयं, राजाभाऊला शिक्षणाचा अभिमान चढलाय, त्याला तो चौधरी फूस देतोय. त्यात बायको शिकलेली असली म्हंजी घराची शाळा व्हनारच" नानांचा राजाभाऊंबद्दलचा राग उफाळून आला."चुलत्याने घरभेदी पणा न्हाय करायचा तर कुणी करायचा ?" नानासाहेब पाटलाच्या तोंडावरून तो आतल्या आत जळत असल्याचे कळत होतं. "मला लई शानपना शिकवत होता येता जाता, आता चौधरीला शानपना शिकव म्हणावं""नाना, एक गुन्हा माफ करा... त्याला जिंदगीभरचा धडा शिकवतू" सुहासचे टाळके कधीच त्याच्या ताब्यात राहत नसे."गाढवीच्या तुला कोणत्या भाषेत सांगू आता ? विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत काही लफडी न्हाई पायजेत.... जावा आता" दोघांनी पडत्या फळाची आज्ञा झेलली.*************"भज्यांची तयारी झाली आहे" सुरेखा ताई पदराला हात पुसत बाहेर येत म्हणाल्या तेव्हा राजाभाऊ कसलेसे पुस्तक वाचत होते."छान, आता अवतार ठीक कराल ?" हळूच त्यांनी विचारले तश्या सुरेखाताई खळखळून हसल्या."हो, मला माहीत आहे, पण करणार काय राजपुत्राशी लग्न थोडी केलेय.... नोकरांकडून सर्व करवून घ्यायला ? आपलं आपल्यालाच करणे भाग आहे" त्या गमतीने म्हणाल्या."कळतात बरं आम्हालाही असली बोलणी, आता स्वयंपाकीण बाईच आणतो आपल्या दिमतीला" राजाभाऊ खोट्या रागाने बोलले."आईंना हल्ली झेपवत नाही वैशालीला सांभाळायला.... ती रोज अंगणातून थेट रस्त्यावर धावते...." सुरेखाताईंचे वाक्य संपण्याच्या आतच दूध फेडरेशनची पांढरी ऍम्बेसेडर दारात उभी राहिली तश्या त्या लगबगीने कपडे बदलायला आत गेल्या.राजाभाऊ उठून दाराकडे जात असतानाच संतोषभाऊ व वहिनी आत आल्या. मालती वहिनींना पाहून राजाभाऊंनी आनंद मिश्रीत आश्चर्याने त्यांचे स्वागत केले, "वहिनी आज अगदी आश्चर्याचा धक्काच दिलात की....." दोघांनाही घेऊन ते बैठकीच्या खोलीत आले- बसा म्हणेस्तोवर वहिनी चक्क आतल्या खोलीकडे वळल्याचे पाहून त्यांना अजूनच अचंबा वाटला."तुम्ही कल्पना दिली असेलच सुरेखावहिनींना ?" संतोषभाऊ लाकडी खुर्चीवर बसता बसता बोलले"नाही, मी म्हटलं आपणच सांगावं तिला सगळं काही" थोड्याच वेळांत दोघी बाहेर आल्या. मालती वहिनी वैशालीला मांडीवर घेऊन तिचे कोडकौतुक करीत होत्या. हसत हसत इकडच्या तिकडच्या गप्पा, शाळेतले विविध प्रसंगावरून हास्य विनोद सुरू झाले."सुरेखा वहिनी, शाळेच्या मुख्याध्यापिका होण्यासाठी काय पात्रता असावी लागते बरे?" हळूच संतोषभाऊंनी विचारले."नको बाई ती कटकट कोण मागे लावून घेईल ?" पटकन त्या बोलल्या."अहो, तुमच्या साठी नाही म्हणत ते....नुसती चौकशी करताहेत" राजाभाऊंनी सिक्सर ठोकली तसा हास्याचा धबधबा उसळला....तर सुरेखाताई चक्क लाजल्या."नाही पण राजाभाऊ, मी चौकशी त्यांच्यासाठीच करतोय. !" हसत हसत संतोषभाऊ बोलले. गप्पांच्या ओघात सुनील पाटील शाळेत आल्याचा किस्सा सुरेखा ताईंनी सर्वांना ऐकवला."सुरेखा वहिनी आता तुम्हीच पाटलांची तोंड बंद करू शकाल. झेड.पीच्या निवडणुका जवळ येताहेत. आम्हाला निवडणूकीच्या प्रचाराला मदत कराल ना ?" संतोषभाऊ राजाभाऊंना डोळे मिचकावत बोलले ते सुरेखाताईंच्या लक्षातच आलेले नव्हते."मी कसली कपाळ मदत करणार तुम्हाला, तुमच्या राजाभाऊं इतकी शिकलेली थोडीच आहे !" सुरेखाताईंनी वचपा काढला तसे सगळे परत हास्यात बुडले."मी मात्र गंमत करीत नाही आहे, निवडणूक प्रचारातच नव्हे तर प्रत्यक्ष परिषदेच्या सभासद म्हणून आपण निवडणूकीला उभे राहण्यास काहीच हरकत नाही.""इश्श, वैशु व शाळेची नोकरी सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात, तीथं परिषद काय सांभाळणार डोंबल ?" ठेवणीतली प्रतिक्रिया देत त्या म्हणाल्या."त्यात कठीण ते काय आहे ? इतर स्त्रियाही स्वतः:चे संसार सांभाळून करतातच ना सर्व काही !" संतोषभाऊ हळूहळू विषयावर येत होते हे राजाभाऊंना कळून चुकले."आम्ही सर्वसामान्यांच्या पोरी भाऊ, आम्हाला हे कुठे झेपणार ?""राजाभाऊंसारखा जीवनसाथी असूनही तू असं म्हणावं म्हणजे कमालच आहे सुरेखा....,आमच्याकडे उठत्याबसत्यांचा राबता असतो सतत, प्रियाचा व प्रियांकचा अभ्यास, त्यांच्या खाण्यापिण्याचे नवनवीन चोचले, त्यातच सतत खणखणारे फोन, आत्यांचे आजारपण सर्व काही करायला लागते!.... अगं तुझ्या छोट्या घरकुलात मावशी तर मदत करतातच ना ? घर व नोकरी सांभाळल्यामुळे तुला जाण आहे स्त्रियांच्या प्रश्नांची; मग तूच आपल्या प्रश्नांना वाचा नाही फोडली; तर कोण फोडणार ? " मालती वहिनींनी नवऱ्याची री ओढली.विषय हळूहळू नेमक्या मुद्द्यावर आणण्यात संतोषभाऊंचे कसब वाखाणण्याजोगे होते. "वहिनी, आपणांस नाही वाटत, जे आपल्या आजूबाजूला घडत आहे त्यासाठी अजाणता आपण स्वतः:ही कारणीभूत आहोत? असल्या व्यक्ती ज्यांची चपराशी बनण्याची लायकी नाही ते परिषदेचाच नव्हे तर एखाद्या राज्याचाही कारभार हाकताहेत " संतोषभाऊंनी सरळ सरळ आव्हानात्मक भाषण ठोकायला सुरुवात केली..."आपण काय करू शकणार त्यासाठी ?" राजाभाऊंनी गाडी पुढे जावी म्हणून हळूच पिन मारली."राजाभाऊ आपण शिकली सवरलेली मंडळी राजकारण म्हणजे जणुकाही गजकरण किंवा महारोग असावा त्याप्रमाणे त्यापासून लांब राहतो. निवडणुका लढवणे तर सोडा; काही अहंमन्य पांढरपेशे मतदानाचा दिवस आळसात झोपा काढून घालवतात. मग नंतर 'सरकार काय झोपा काढते की काय' असल्या प्रतिक्रिया वर्तमानपत्रांतून किंवा एखाद्या संकेतस्थळावरून देतात !"सगळेच गंभीरतेने ऐकत होते."आपल्या पैकी प्रत्येकाला वाटतेच की, कुठेतरी काहीतरी चुकते आहे. बऱ्याच जणांना नेमके काय चुकते आहे त्याची जाण आहे. काही जण ते इतरांना समजावण्याचा प्रयत्न करतात. फार थोडे त्या विरुद्ध लढा द्यायचा प्रयत्न करतात पण अगदी बोटावर मोजण्याइतकेच अण्णा हजारेंसारखे सतत आंदोलन छेडून ह्या विरुद्ध जनमत तयार करतात..... आपण फक्त थोर व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो व त्यांची नावे सकाळ सायंकाळ आळवतो पण आपल्यातले किती जण त्यांच्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करतात ?" संतोषभाऊ आळीपाळीने तिघांकडे बघत बोलत होते. हाडाच्या शिक्षक असलेल्या राजाभाऊंना व सुरेखाताईंना त्यांचे वाक्य न वाक्य पटत होते."वहिनी, राजाभाऊंच्यात मनमिळाऊपणा आहे पण ते फार सरळ आहेत स्वभावाने.... त्यांच्यात हजरजवाबी पणा किंवा ती तडफ नाही जी एका राजकारणी माणसाला आवश्यक आहे..... ते माझे अत्यंत जवळचे व उत्कृष्ट सल्लागार म्हणूनच मी त्यांच्याकडे पाहतो. पण तुम्हाला स्त्रियांच्या प्रश्नांची जाण आहेच.....तुम्ही सरकारी नोकरी केली आहे तिथल्या प्रश्नांची जाण आहे.....शिक्षण हे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे क्षेत्र तुम्ही अगदी खालच्या तळाला अनुभवलेले आहे. सडेतोड उत्तर देण्याची क्षमता आपल्यात आहे पण वाचाळपणा नाही हा राजकारणी माणसातला सर्वात मोठा गुण तुमच्या जवळ आहे..... आपल्या पूर्ण तालुक्यातल्या कुठल्याही राजकारणी स्त्रीला आपला हेवा वाटेल असे व्यक्तिमत्त्व आपल्याकडे आहे म्हणून तुमच्याकडून माझ्या पक्षाची सेवा करवून घ्यायला मी आलो आहे. माझा तसा आग्रह समजा व माझ्या आग्रहाचा मान ठेवा.......""बापरे, भाऊजी तुम्ही तर मला पार हवेत तरंगायला लावलं, इश्श त्यात इतकी काय गळ घालता, तुम्ही हुकूम द्या, मी निवडणूक लढवायला तयार आहे......" सुरेखाताई भारावलेल्या शब्दांत बोलल्या.संतोषभाऊंनी राजाभाऊंकडे विजयी मुद्रेने डोळे मिचकावत बघितले.

तेजस्विनी-५

"देसाई, आपल्या मतदार संघात जिल्हा परिषदेसाठी ३ जागा आहेत. त्यातली एक सिट महिलांसाठी राखीव करण्यात आलेली आहे. इतर दोन जागा मोकळ्या आहेत, राखीव जागेचे काय करायचं ?" संतोषभाऊंनी देसाईंना खुर्चीत टेकत नाहीत तोच सरळ प्रश्न केला."भराडे बाईंखेरीज आपण आणखी कोणाला उभे करू शकणार भाऊ ?" देसाईंनी प्रतिप्रश्न केला."का ? भराडे बाईच का ?" संतोषभाऊंनी सुरेखाताईंबरोबर झालेले संभाषण अजून पर्यंत कोणालाच सांगितलेले नव्हते. त्यांना फक्त आपल्या जवळच्या सल्लागार मंडळींचा अंदाज घ्यायचा होता."आजच्या परिस्थितीत विरोधकांसाठी त्याच योग्य उमेदवार आहेत, राजकारणाचा अनुभवपण आहे व पाटलांच्या गोटातून आलेल्या असल्याने त्यांची सगळी अंडी पिल्ली जाणतात." देसाईंनी एका दमात भराडे बाईंची राजकीय वाटचाल सांगितली."पण बाई तोंडाच्या फाटक्या आहेत."......"भाऊ, थोडे फार दुर्गुण प्रत्येकात असतातच. त्यांच्या दुर्गुणांचा झाला तर फायदाच होणार आहे आपल्याला.""त्यांच्या ऐवजी दुसऱ्या नांवाचा विचार करायचा झाल्यास ?" भाऊंनी खडा टाकला."एकतर सद्य परिस्थितीत आपल्याकडे म्हणावा तसा ताकदवान उमेदवार नाही; दुसरे म्हणजे बाईंऐवजी दुसरा उमेदवार दिल्यास बाईंचा उपद्रव ऐन निवडणूकीत होईल" देसाई पटकन बोलले."बघूया काय करायचे ते, इतर दोन उमेदवारांवर पण विचार करावाच लागणार आहे तेव्हाचं ह्या जागेबद्दलही विचार करू" संतोषभाऊ बोलले.*************************************सुनील पाटलाने हेडमास्तरांवर सोपवलेले काम करण्याची तशी इच्छा मास्तरांची नव्हती, पण नानासाहेब पाटलांच्या कृपेने मास्तरांना लायकी नसताना हे पद मिळाल्याचे ते स्वत: जाणून होते. मोहिनी इंगळे त्यांची कोणी लागत नव्हती; तीच्या भवितव्याचा विचार करण्याऐवजी स्वत:च्या भविष्याची मास्तरांना जास्त काळजी होती. म्हाताऱ्या आईला तालुक्यातल्या दवाखान्यातली चांगली उपचार पद्धती ते तालुक्याच्या शाळेचे हेडमास्तर होते म्हणूनच मिळतेय हेही त्यांना व्यवस्थित कळत होते. असेही दोन शिक्षक शाळा सोडून गेल्याने जागा रिकाम्या होत्या त्या भरून काढायच्याच होत्या. ह्या निमित्ताने शाळेवर, पोरांवर व सुनील पाटलावर उपकार करण्याची संधी त्यांना आयती मिळाली होती ती हातची घालवण्याइतके ते मूर्ख नव्हते. पाडळस्याची प्राथमिक शाळा तालुक्याच्याच शाळेशी जोडलेली होती. उत्तरपत्रिका तपासण्यापासून ते पगार भत्त्यांपर्यंतची सगळीच कामे तालुक्यावरून संमती आल्याखेरीज पुढे सरकत नसत. मोहिनी इंगळेने डिएड ची पदविका घेतलेली होती. फक्त प्रार्थमीक वर्गांवर शिकवण्याचा तिला अनुभव होता. पुढील शिक्षण व प्रशिक्षण घेण्यास तिने लेखी नकार दिला होता व फक्त प्रार्थमीक शाळेची शिक्षिका म्हणून काम करण्याची इच्छा तिने स्पष्ट केलेली होती. ज्या दोन जागा रिकाम्या होत्या त्या माध्यमिक शिक्षकांच्या होत्या. हेडमास्तर हा ताप कसा दूर करायचा ह्या विवंचनेत आता पडले ! आपल्या स्टाफचे व्यवस्थित सहकार्य मिळाल्या खेरीज ह्या झंझटीतून सुटका नसल्याचे त्यांना कळून चुकले.
"स्टाफ मीटिंग ठेवलीय मास्तरांनी " विलासने कागद पुढे करताच विषय काय आहे ते न बघताच सुरेखा ताईंनी सही केली."कसली मीटिंग आहे ?" पिटी चे महाजन सर, जे भूगोलही शिकवत, पण ज्यांचा दोन्ही विषयांशी दूरान्वयेही संबंध नव्हता त्यांनी विचारले. महाजन सरांना सट्ट्याचे आकडे खुणावत असल्याचे त्यांच्या तोंडावरून स्पष्ट दिसत होते."मला तर लवकर जायचे आहे." त्यांनी आधीच घोषणा केली...."रोजच्या सारखेच ना ?" वैद्य बुवा पचकले."बुवा, तुम्ही सत्यनारायणाच्या पुजा सांगत बसा, मी आकडे लावत राहीन. पैसा आपल्या सगळ्यांचा वीक पॉंईंट आहे" महाजनांनी त्यांना सुनावले."महाजन, मला सट्ट्याचे आकडे लावता येतील... पण तुम्हाला पुजा सांगता येईल का ?""वा वैद्य बुवा.... वाकील व्हायचे ते चुकून शिक्षक झालात" अंतुर्लीकर बाई बोलल्या. सुरेखा ताई फक्त गंमत बघत होत्या. महाजन व वैद्य बुवांची जुगलबंदी रोजचीच असे. शिक्षक असूनही दोघे अडाण्यासारखे भांडत.हेडमास्तरांनी शाळेत मोकळ्या असलेल्या जागांवरून भले मोठे भाषण ठोकले त्यात सरकारचा पाणउतारा करत असल्याचेही त्यांनी दाखवून दिले. हळूच "एक बदलीचा अर्ज आलेला आहे तेव्हा आपला सर्वांचा विचार काय आहे ते कळावे म्हणून आपल्याला थांबवून घ्यावे लागले" अशी मखलाशी केली."मास्तर, जी काय कागदपत्रे सह्या करायचीत ती उद्या केली तर चालतील का ?" महाजन सरांनी मनगटावरील घडाळ्यात बघत विचारले. हेडमास्तरांनी संमतिदर्शक मान हालवून पूर्ण होण्याच्या आतच महाजन सर खुर्ची मागे सरकवून उभे राहिले."मोहिनी इंगळेंचे स्वागत आम्ही करूच मास्तर; पण त्यासाठी इतका मोठा फार्स करायची आवश्यकत: नाही" महाजन उद्गारले. मास्तरांनी वासलेला आ मिटायच्या आतच सरळ दाराकडे जात असलेल्या महाजनांना इतर सगळेच गोंधळात पडल्यासारखे बघत होते.
"आपल्या गांवात कोण किती वेळा पादतो हेही लपून राहणार नाही." मास्तर तोंडाचा आ मिटता मिटता बोलले."श्शी.... काय तर्रीच काय" वैद्य बुवांनी सोवळेपणाचा आव आणत नाकासमोर हात हालवला.शाळेच्या शिक्षकांची मीटिंग म्हणजे थिल्लरपणा असल्याचे स्पष्ट मत सुरेखा ताईंचे होते."विलास, अजून चहा आहे का ?" समोरच्या ताटलीतली उरलेली दोन मारी बिस्कटे तोंडात खुपसत गाजरे बाईंनी विचारले."तर मंडळी, आपले काय मत आहे ?" हेडमास्तरांनी सगळे काही इतरांना नीट समजले असावेच ह्या आवेशात विचारले."जागा भरल्या गेल्या पाहिजेत पण शिक्षक कुठून आणायचे ?" सुरेखा ताईंनी विचारले."पाडळस्याहून एक बदलीचा अर्ज आलेला आहे" मास्तरांनी उगीचच हातातल्या कागदांवर नजर फिरवत म्हटले."पण पाडळस्याची शाळा प्रार्थमीक आहे मास्तर; आपल्याकडे माध्यमिक शिक्षकांच्या जागा मोकळ्या आहेत." सुरेखा ताई पटकन बोलल्या."त्यात काय मोठे; आपल्यातल्या एखाद्या प्रार्थमीक शिक्षकाला माध्यमिक वर्गावर बदलून घ्यायचे व मोकळ्या जागेवर प्रार्थमिक शिक्षकाची नेमणूक करायची." मास्तर बोलले."कोणाला बढती द्यायची ?" सुरेखा ताईंनी सरळ विचारले."आपल्यापैकी जो ज्येष्ठ असेल त्याला" वैद्यबुवांनी वादाला तोंड फोडले.पुढे झालेल्या रणधुमाळीत सुरेखा ताईंना जराही स्वारस्य नव्हते. विलासने परत आणलेल्या चहाचे घोट घेत त्या पदासाठी सुरू झालेला तमाशा बघत राहिल्या. अखेरीस वैद्य बुवांनी सरशी मारली. २५५ रुपयांच्या मासिक बढतीच्या बदली त्यांनी स्टाफला महिन्यातून एकवेळा दुपारचा नाश्ता घासाघीस करून, कबूल करीत बढती विकत घेतली. १२५ रुपयांचा नाश्ता मासिक भीसीच्या दिवशी द्यायचे नक्की होताच बैठक संपल्याचे जाहीर करण्यात आले व सुरेखा ताईंनी सुस्कारा सोडला. वैशु वाट बघत पायरीवर बसली असेल ह्या विचारांनी त्यांचा जीव कासावीस झालेला होता.हेडमास्तरांनी मात्र एका दगडांत पाच पक्षी मारले होते......शाळेचे व पोरांचे भले होणार असल्याचा आव आणत, सुनील पाटलाचे काम केले होते, वैद्य बुवांना खूश करण्याचे साधले तर होतेच वर मोहिनी इंगळेवर इंप्रेशन मारता येणार होते. सुनील पाटलाकडून भाजीपाला व दुधाचा रतीब वाढवून मिळाला असता तो वेगळाच.********************************"बाईंचे मत विचारात घ्यावे लागणार भाऊ " शेळके मास्तरांनी दिलेल्या शेऱ्यावर विचारे साहेबांनीही संमतिदर्शक 'हो' जोडला."भराडे बाईंना विचारण्यापूर्वी तुम्हा सर्वांचे मत अजमावावे म्हणून बोलावले मास्तर; एकदा त्यांच्या नावाचा विचार होतोय हे त्यांना कळले की विषय संपल्यातच जमा होईल." संतोषभाऊ बोलले. "त्यांच्या ऐवजी दुसरा उमेदवार दिल्यास ?" त्यांनी दोघांकडे बघत विचारले."तर भराडे बाई आपल्या सगळ्यांना भरडून काढतील" स्वत:च्या पांचट विनोदावर खुदखूदत विचारे बोलले.संतोषभाऊंसमोरचा पेच वाढत होता. त्यांच्या मनातून भराडे बाईंना उमेदवारी द्यायची नव्हती पण राजाभाऊ सोडल्यास इतरांची सुरेखाताईंच्या नावावर संमती मिळण्याचे लक्षण दिसत नव्हते.वासुभाऊ व फिरकेंनीही त्यांना भराडे बाईंचेच नांव सुचवलेले होते. राजाभाऊंशी सुरेखाताईंबद्दल बोलण्याच्या पूर्वीचं आपण ही मते मागवायला हवी होती असे त्यांना राहून राहून वाटायला लागले. ह्या परिस्थितीत आपण घोडचूक केली तर नाही ह्या विचारांत ते गढून गेले.इंटरकॉम वर 'राजाभाऊंच्या कॉलेजला फोन लावून त्यांना सायंकाळी घरी बोलावणे पाठवा'असा निरोप द्यायला त्यांनी स्वत:च्या स्वीय सहाय्यकाला सांगितले. राजाभाऊंना निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती देऊन काय मार्ग काढता येईल हेच आता त्यांना बघावे लागणार होते.********************************"सुनील औंदाच्या झेडपीच्या निवडणुकांसाठी सुहासरावांना अध्यक्षपदाचा उमेदवार करायचं म्हंतोय मी" नानांनी सुनील पाटलाला सांगितले. सुनीलची चुळबूळ सुरू होती."पन बाई माणसाला अध्यक्षीण बन्वायच हाय न्हवं यंदा ?" उगीचच फाटा फोडत त्याने विचारले."न्हाय, प्रत्येक दोन वेळा पुरूष माणूस अध्यक्ष झाला की मागून बाई माणूस व्हनार दाजी" रमेशने मेहुण्याची बाजू राखली."माजी काय बी हरकत न्हाई दाजी" सुनील लगेच बोलला. "पण माज्या मित्रांपैकी हाईत उमेदवारीसाठी एक दोग...... तवा एखादी सिट त्यांनाबी द्या की दाजी...." सुनीलने लकडा लावला.नानांनी ही अपेक्षा केली होतीच. "तुज्या मेव्हणीला म्हनावं उबी र्हा की निवडणूकीला" रमेश मध्ये तोंड खुपसत बोलला."रमेश, घरच्या बाई माणसाला घरातच राहू दे" सुनीलने ताडकन सुनावले."आक्शी म्या म्हटल; त्या घरच्या कुठं हाईत ? पाटील खानदानच्या बाहेरच्याच हाईत की !" रमेशने स्वत:च्या मेहुण्या कडे तिरपा कटाक्ष सोडत म्हटले.सुहासची नजर सुनीलच्या मेहुणीवर असल्याचे त्याला चांगलेच ठाऊक होते. सुहास अध्यक्ष व सुनीलची मेहुणी सभासद झाल्यास हे सुत जुळू शकेल हाच विचार त्याच्या डोक्यांत होता."काय करायचं त्ये आमी पाहून घेऊ, सुहासला अध्यक्षपदासाठी उभं करायचं इतकंच सांगतूय आता." नानासाहेबांच्या फर्मानासमोर कुणाचे काही चालत नसे.नानासाहेब पाटील घराबाहेर पडताच सुनीलने रमेशचा आई बहिणीवरून उद्धार करीत त्याची गळचंडीच पकडली. "हरामखोरा, बहिणीच्या घरी राहतोस वर इकडेच हागुरडी करतोस मा****........"दोघांच्यात चांगलीच जुंपली. सुहासने दोघांना सावरण्याचा प्रयत्न करण्याच्या आधीच रमेशने चांगल्या दोन चार कानफडात खाऊन घेतल्या होत्या."वैनी, तुमच्या ह्या भ**ला सांगून ठेवा, माह्या रस्त्यात हागुरडी केली तर गांवात ठेवणार न्हाय" सुनील सरळ मोठ्या भावजयेवर भडकून बोलला.सुहासला निमित्त मिळाले व त्याने फाडकन सुनीलच्या मुस्काडात मारली.....पाटील वाड्यावर मग चांगलीच जुंपली. दोघांच्या बायका, मेहुणे, मेहुण्या सगळेच रणकंदनात उतरले. एकमेकांच्या घराण्यांचा उद्धार होत होता. एकमेकांच्या लफड्यांचा भांडेफोड होत होता.......अखेरीस नेहमीसारखा तासभर गावगोंधळ घातल्यावर हळूहळू पाटील बंधू शांत झाले.बघ्यांची व घरातल्या नोकरवर्गाची करमणूक संपुष्टात आली. नानासाहेब पाटलांना ह्यातला एक शब्द कळवण्याची हिंमत कोणाच्यातच नव्हती.भांडण चालू असताना सुनीलने मोठ्या भावाला धमकी दिलेली होती. "मोहिनी इंगळेला सिट न्हाय मिळाली तर बगून घीन"मोहिनी इंगळे "विकास आघाडी" पक्षाच्या अधिकृत महिला उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याचा गौप्यस्फोट थोड्याच वेळांत गावभर झाला.....चर्चेला उधाण आले........

तेजस्विनी-६

दुपारची निवांत वेळ होती. अट्रावल नावाच्या त्या छोट्याश्या गांवातल्या लोकांची जेवणे आटोपून ते आपापल्या उद्योगांत मग्न होते.काही रिकामटेकडी मंडळी लिंबाच्या पारावर बसून एकमेकांच्या निंदा नालस्त्या करण्यात मग्न होती.बायका मंडळी आवरा आवरी करून वामकुक्षी घेण्याच्या तयारीला लागलेल्या होत्या.दूरवरच्या शाळेतून मुलांनी म्हटलेल्या पाढ्यांचा आवाजही जड वाटत होता.
एक बेवडा भर दुपारी हातातली रिकामी बाटली दाही दिशांना गदे सारखी फिरवत स्वत:चा तोल सावरत जात होता. विज्या बेवड्याला अख्खे गांव ओळखे.... चोवीस तास, तीनशे पासस्ठ दिवस तो ह्याच अवस्थेत होता. जो कोणी दारू पाजेल त्याला आपला जन्मदाता म्हणायचीही त्याची तयारी होती. आपल्या बेवडे पणावर त्याला गर्व होता. जेव्हा जेव्हा फुकटाची दारू ढोसायला मिळाली की ती पिऊन "चावडी" वर स्वत:च्या पिण्याचा ढिंढोरा पिटत बसे.
पारावरच्या मंडळींत फुसफूस सुरू झाली. सगळे जण आपापले संभाषण सोडून विज्याची फुकटची करमणूक बघत राहिले."काय रं रांडेच्या, हांसतूस व्हय मले ?" विज्याने पारासमोरच्या मातीत बसकण मारत व मानं घडाळ्याच्या काट्यासारखी फिरवत विचारले. तो नेमका कुणाला बोलला हे न कळल्याने अजूनच खसखस पिकली."भ*व्या मालकाच्या माणसाला हासतो व्हय ? मालकाले समजलं तर धिंड काढलं नागडं करून तूही " बोलताना चंद्या लोखंडे कडे हात करून तो बोलला."मायला तुह्या विज्या, शेण खायांचं सोडून, टाकतोस कोनापायी ?" चंद्याने कावतं विचारले."मालक बोलले, चंद्या भ*वा आहे चौधरीचा, त्याच्यावर नजर ठीव म्हनून " विज्याने दिवसा तारे तोडले."मग मालक कुणाचा भ*वा आहे? तुज्या मायचा का ?" चंद्या तापत चालला होता."जावं देरे चंद्या, हा फुकाची ढोसून लफडं वाढवायला आलाय " गण्या भोळे मातीत पचकन थुंकत बोलला."गण्या तुह्या भैनीला तर मालकानं उभ्या ****** " पुढची वाक्ये ऐकणाऱ्यांचे कानही तापत होते.
गण्या व चंद्याने विज्याची धू धू धुलाई केली. अख्खे अट्रावल जमा झाले होते. शेवटी सरपंच स्वत: मध्ये पडले तेव्हा कुठे विज्याला श्वास घेता आला.दुपारी चहा पिण्याच्या सुमाराला अट्रावलात चार जिपड्या एकापाठोपाठ येऊन थांबल्या. कोंबलेली माणसे हातात लाठ्या काठ्या घेऊन बाहेर पडली ती सरळ लिंबाच्या पाराकडेच गेली. हातात रिव्हॉल्व्हर नाचवत सर्वात पुढे होता सुहास पाटील - तर पाठोपाठ त्याचा मेहुणा रमेश. हाताशी येईल त्याला काठ्यांनी बदडत त्यांनी पार धुऊन काढला व मोर्चा गावकऱ्यांच्या घराकडे वळवला. घराघरातून नासधूस करीत, बाया बापड्यांना व लहान मुलांना पायाने कुथाडीत तर म्हाताऱ्या कोताऱ्यांना ढकलत पाटलांची माणसं गावभर नासधूस करू लागली. समोर येईल त्याला लाठीचा किंवा लाथेचा प्रसाद, मिळतं होता. सुनील पाटलावरचा सकाळचा सगळा राग अट्रावलकरांवर निघत होता.भारताला स्वातंत्र्य मिळून उणीपुरी ५० वर्षे होऊन गेलेली होती पण सरंजामशाही इथून जायचं नांव घेत नव्हती.कण्हतं पडलेलं अट्रावल गांव सुहास पाटलाच्या खिजगणतीतही नव्हतं.*********************संतोषभाऊ चौधरींच्या कानावर ही बातमी आली तेव्हा ते घरीच राजाभाऊंची वाट पाहतं होते. फोन वरच त्यांनी पटापट फर्मान सोडायला सुरुवात केली. आपल्या सगळ्या समर्थकांना त्यांना बोलावून घेतले. शेळके मास्तरांना अन्नपूर्णा खानावळीत परस्पर जायला सांगून २५०/३०० जणांसाठी जेवण तयार करून अट्रावलला पोहचवण्याची व्यवस्था करायला सांगितली.दोन दुचाकी स्वारांना पार्वती मेडिकल स्टोअर्स मधून आवश्यक ती प्रथमोपचाराची सामुग्री व काही वेदनाशामक औषधे आणण्यास पिटाळले. राजाभाऊ आत आल्या आल्या, हा काय गोंधळ चालू आहे ते त्यांना न कळल्याने त्यांनी मालती वहिनींकडे प्रश्नार्थक मुद्रेने बघितले तेव्हा वहिनींनी त्यांना अट्रावलवर गुंडांचा हल्ला झाल्याचे सांगितले.इतक्यात देसाई दूध महासंघाची एस्टीम व डॉ. काळेंना घेऊन आले. प्रियांकला राजाभाऊंनी घरी पाठवले, सुरेखाताई नुकत्याच शाळेतून येऊन टेकल्या होत्या त्या तश्याच प्रियांक बरोबर बंगल्यावर पोहचल्या. लगबगीने भाऊंनी सगळ्यांना बरोबर चलण्याचा इशारा केला. संतोषभाऊ एस्टीम स्वत: चालवायला बसले सोबत मालती वहिनी, देसाई, डॉ.काळे व वयोवृद्ध विसूभाऊंना घेऊन इतरांची सोय त्यांनी तीन जीप गाड्यांत केली.फौजदार बोरसेंची जीप अर्ध्या वाटेवर भेटताच सर्व लवाजमा अट्रावलकडे रवाना झाला. अट्रावल २० की.मी.चा दगड मागे पडला तेव्हा झुंजूमुंजू झालेले होते.****************************************************नानासाहेब पाटलांनी कपाळावर हात मारून घेतला. नको त्या वेळेस सुहास पाटलाने लचांड उभे केले होते. पक्षश्रेष्ठी कुठल्याही परिस्थितीत झाला प्रकार खपवून घेणार नाहीत ही गोष्ट ते जाणून होते. त्यांनी तातडीने जळगांवला फोन लावला. रावसाहेबच त्यांना ह्या प्रकारणातून तारतील ही त्यांची खात्री होती.रावसाहेब गाजरे त्यांचे सख्खे मामा. बहिणीच्या मुलांवर, नाना, दिघू, प्रदीप त्यांचे अतोनात प्रेम होते. दिघू म्हणजे नानांच्या खालचा भाऊ संन्यास घेऊन परागंदा झाला. प्रदीप दुबईला गेला तो परतून आलाच नाही. तेथेच त्याने कसलातरी व्यवसाय सुरू केला. एका केरळी ख्रिस्ती मुलीशी लग्न केल्याचे निमित्त करून नानांनी त्याच्याशी संबंध तोडले व त्याला वाळीत टाकले.आपोआपच वडिलोपार्जित सगळी मिळकत नानांची झाली.राजाभाऊ जाधवांच्या वडिलांची आई रावसाहेबांची दुसरी बहीण. राजाभाऊंच्या आजोबांशी तिचे लग्न झाल्यावर जाधव कुटुंबीयाचे जमिनींच्या वादावरून गाजरेंशी वाजले तेव्हा पासून गाजरे कुटुंबीयांनी जाधव कुटुंबाशी उभे वैर धरले. नानासाहेबांचे वडील सज्जन म्हणून त्यांनी वैर जरी नाही धरले तरी फक्त लग्न किंवा मर्तिक प्रसंगीच जाण्या इतके संबंध ठेवले.
रावसाहेब गाजरे "विकास आघाडी" चे मोठे प्रस्थ होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पक्षाचा जिल्ह्यातला आधारस्थंभ रावसाहेबांच्या वाड-वडिलांपासून चालत होता. सध्या वयोमानामुळे सक्रिय नसले तरी जिल्ह्यात पक्षाचे सर्वेसर्वा तेच होते. त्यांचा मुलगा, राजेंद्र्कडे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद होते.सुहासने अट्रावल वर केलेल्या हल्ल्याची तक्रार करण्यास सुरुवातीला अट्रावलकर तयार नव्हते. सरपंचांनी अजिजीने अट्रावलकरांना भानगडींपासून दूर राहण्याचे आवाहन केले परंतू ते ठरले नानासाहेब पाटलांच्या गोटातले.....चंद्या किंवा गण्या सारख्या तरुण रक्तात दादागिरी व अन्याया विरुद्ध दाद मागण्याची वृत्ती असल्यानेच फौजदार बोरसेंनी सुहास पटलाविरुद्ध प्रथमच लेखी तक्रार नोंदवली.तक्रारीत गुंडांच्या साहाय्याने गावावर सशस्त्र हल्ला केल्याचे नमूद करण्यात आल्याने तक्रार गंभीर स्वरूपाची होती.प्रथमच नानासाहेब पाटलांच्या अन्याया विरुद्ध पोलिसात तक्रार करायला कोणी धजावले होते.पाटलांच्या दैवचक्राच्या उतरंडीची सुरुवात झालेली होती.**************************************महत्त्वाच्या विषयावरील चर्चेस, दूध महासंघाच्या कार्यालयातील चौथ्या मजल्यावरील बैठक कक्षांत, मंडळींना पाचारण करण्यात आलेले होते. वासूभाऊ, विचारे, शेळके मास्तर, फिरके, देसाई, भराडे बाई, सुरेखा ताई, राजाभाऊ तसेच "जन जागृती" पक्षाच्या शाखांचे १९ पदाधिकारी, स्वत: संतोषभाऊ व त्यांचे स्वीय सहाय्यक, दूध महासंघाचा एक मराठी लघुलेखक व कारकून मिळून ३२ सदस्य बैठकीला उपस्थित होते.सर्वप्रथम अट्रावल वर झालेल्या हल्ल्यानंतर पक्षातर्फे करण्यात आलेल्या मदती बद्दल देसाई साहेबांनी थोडक्यात म्हणजे चांगली अर्धा तास माहिती दिली. माहिती देत असताना त्यांनी योग्य वाक्यांवर जोर देत तर कुठे हळवे पणाने बोलत घडलेली घटना विस्तृतपणे सांगितल्याने जी मंडळी अट्रावलच्या मदत कार्यांत हजर नव्हती, त्यांच्यासाठी तो 'आखो देखा हाल' च होता.
अट्रावलच्या मदत कार्याचा पूर्णं खर्च दूध महासंघाने उचलल्याचे त्याच दिवशीच्या वर्तमानपत्रांत जाहिरातींद्वारे आम जनतेला कळवण्यात आलेले होते. संतोषभाऊ चौधरींनी सुहास पाटलाची कुठेही नांव न घेता केलेली जिल्हाभर निंदा ह्याचेच ते द्योतक होते. पंचक्रोशीतल्या जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींमध्ये शिरकाव करण्यासाठी 'जन जागृती' पक्षासाठी 'अट्रावलचे मदतकार्य' हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरलेला होता.ह्यानंतर मतदारसंघातल्या ३ व तालुक्याशी जोडल्या गेलेल्या जिल्हा पंचायतींच्या ८ जागांसंदर्भात तसेच ग्रामपंचायतीच्या जागांसंदर्भात निर्णय घ्यायचा असल्याने आजची बैठक बोलावली असल्याचे सांगत देसाईंनी वयोवृद्ध वासूभाऊंना मार्गदर्शनापार चार शब्द सांगण्याची विनंती केली.
वासूभाऊंचे भाषण म्हणजे कार्यकर्त्यांशी थेट संवादच असे. आलेल्या शाखा पदाधिकाऱ्यांची नांवे घेत, त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचा उल्लेख करीत, ते शब्दांनी त्यांना शाबासकी देत होते. कुठे हळूच केलेल्या चुकांबद्दल हलकेच कानपिळणी होत होती. अत्यंत खेळीमेळीचे वातावरण निर्माण करीत त्यांनी देसाईंच्या भाषणांतला होता नव्हता तो रटाळपणा काढून टाकला. भाषणाच्या शेवटी वासूभाऊंनी भराडे बाईंवर खास स्तुतिसुमने उधळली. अट्रावलला केल्या गेलेल्या मदत कार्यांत भराडे बाईंनी अक्षरश: घराघरातून स्त्रियांना वेचून काढत बोलते केले होते. महिलांच्या दु:खांचा कढ कमी करण्यास त्यांच्या शब्दांनी बरीच मदत केलेली होती. वासूभाऊ भाषण संपवून खाली बसले ते टाळ्यांच्या गजरातच.....सुरेखाताईंच्या डोळ्यांचे कोपरे कुठेतरी पाणावल्याचे त्यांना जाणवलेही नव्हते.अचानक काहीतरी आठवल्याने ते तसेच ताडकन उभे राहिले.भाषणाला सुरुवात करीत असलेल्या संतोषभाऊंना हाताच्या इशाऱ्याने थांबवत, "ह्या सर्व धावपळीत आपल्या पक्षांत एका मुलीचे स्वागत करायचे राहून गेले..... " सुरेखा ताईंकडे निर्देश करीत ते म्हणाले."अट्रावलच्या घटनेत तन्मयतेने ती काम करीत असल्याचे पाहून, आपल्या पक्षाला एक चांगली कार्यकर्ती मिळाल्याचे समाधान वाटले. लवकरच पक्षाची आघाडी सांभाळ हा आशीर्वाद मी तिला देऊ इच्छितो. हल्ली वयोमानामुळे विसरायला होते म्हणून तिचा उल्लेख करणे अनवधानाने राहून गेले".वासूभाऊ परत खाली बसेपर्यंत सुरेखा ताईंचे डोळे चांगलेच पाणावले होते व सगळ्यांच्याच ते लक्षांत आले. बसल्या जागेवरून उठत त्या वासूभाऊ बसलेल्या खुर्चीकडे गेल्या व वाकून त्यांना नमस्कार करीत त्यांच्या आशीर्वादाचा शालीनतेने स्वीकार केला. परत झालेला टाळ्यांचा कडकडाट त्या स्वत:च्या खुर्चीवर बसेपर्यंत होत होता.
अचानक घेतलेल्या ह्या वळणाने संतोषभाऊंना एक नवीनच उभारी मिळाली. "मित्रहो, यंदाच्या निवडणुकांमध्ये महिला उमेदवार म्हणून आपल्या पक्षातर्फे कोणाला उभे करावे हा मला पडलेला पेच आपल्या ह्या दोन महिला कार्यकर्त्यांनी चुटकी सरशी सोडवल्याबद्दल मी त्यांना व्यक्तिश: धन्यवाद देतो." संतोषभाऊंच्या भाषणावर नेहमीच वासूभाऊंची पडलेली छाप दिसून येई. वासूभाऊंना आपले राजकीय गुरू मानणारे संतोषभाऊ त्यांच्याच लकबीने भाषण करीत.एक क्षण सगळे एकदम स्तब्ध झाले.....मग आपापसांत कुजबूज सुरू झाली...संतोषभाऊ पुढे काही बोलण्याच्या पूर्वीच जवळपास गोंधळाला सुरुवात झाली. प्रत्येक जण डाव्या उजव्या हाताशी बसलेल्या कार्यकर्त्याशी बोलण्यात गुंतला......"शांतता राखा, कृपया शांतता राखा....." देसाईंच्या खणखणीत आवाजाने सगळे शांत झाले. खुद्द देसाई गोंधळात पडलेले होते पण बैठकीवरचे नियंत्रण ताब्यात ठेवणे त्यांना व्यवस्थित जमत असे."भाऊ काय सांगत आहेत ते नीटं समजावून घेतल्याशिवाय कृपया आपापसांत चर्चा करू नये अशी मी कार्यकर्त्यांना विनंती करतो." देसाईंनी जणू काही भाऊंना पुढे बोलण्याचा इशाराच केला.
"माझ्या हाती असलेल्या माहितीनुसार 'अट्रावल' चे मतदार क्षेत्र महिलांसाठी राखीव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. अट्रावलची आजची परिस्थिती व दूध महासंघाने व भराडे बाईंनी अट्रावलात केलेले कार्य पाहता अट्रावलची जिल्हा पंचायतीची जागा विनासायास भराडे बाई आपल्या पक्षासाठी खेचून आणू शकतील." संतोषभाऊंनी उपस्थितांवर नजर फिरवीत केलेले भाष्य जवळ जवळ सगळ्यांनाच मान्य झाले.समोरच्या मेजावर हात थोपटत बहुतेकांनी त्याला मान्यता दिली."पण भाऊ, मी तर तालुक्याची मग अट्रावलांतून मला निवडणूक लढवता येईल ?" भराडे बाईंनी शंका काढली."का ? जर दिल्लीत राहणारी महिला कर्नाटकातून लोकसभेला उभी राहू शकते तर पंचायतींना वेगळा नियम का असावा ?"...."........" सगळेच निःशब्द होते."तरीही मी तहसील कार्यालयातल्या सचिवांना किंवा त्यांच्या स्वीय सहाय्यक मोकाशींना विचारून नियमांची खातरजमा करून घेईन." ह्या वाक्याने उरल्या सुरल्या शंका नष्ट झाल्या.....पुढची कार्यवाही सुरू होण्याच्या आतच कार्यकर्त्यांनी भराडे बाईंचे अभिनंदन करावयास सुरुवात केली.

तेजस्विनी-७

या सुनील राव, या" तहसीलदार तुते तोंडभरून हसत म्हणाले."काय तुते, समदं काही ठीकं आहे ना ?" सुनील पाटलाने सलगीने विचारले. सुनील पाटलाची भाषा, काम निघालं की, कधी मग्रुरीची नसे. स्वत:ची कामे तो धुर्तपणे करून घेई."अक्शी गोंधळ झालाय छोटे मालक, पण नाना सांभाळून घेतीलच" तहसीलदारावर नानासाहेबांचे बरेच उपकार होते. ढापलेल्या शेत जमिनींचे उतारे तलाठ्या मार्फत आपल्या नांवावर करताना नानासाहेब सगळ्यांना त्यांचा हिस्सा नियमीतपणे देत."सुहास रावां बद्दल बोलताय व्हय ?" सुनीलने सहज विचारावे तसे विचारले, "त्यान्सी लई घाई होते कामं उरकायची.... तिच्यात तो रमेश भरीला पाडतो, आता हुईल त्ये बगायचं इत्कच हातात हाय न्हवं""विरोधकान्सी आयतं कोलीतच दिलय हातांत, न्हव का ?" तुते शब्द झेलत म्हणाला."दादांची जमानत झाली त्येच नसिब म्हणायच " त्याच्या ह्या वाक्यावर सुनील पाटलाने फक्त मान हालवली.
"आज इकडे कुणीकडे छोटे मालक ?" तुतेने त्याला गप्प बसलेला पाहून विचारले."हेडमास्तर काही बोलले का ?" पाटलाने अंदाज काढायच्या सुरांत विचारले."कस्ल व्हो ?" तुते डांबरट माणूस होता, त्याला सुनील पाटलाच्या तोंडून मोहिनी इंगळेच्या कामाबद्दल ऐकायचे होते."इंगळे बाईंच्या बदलीच काई बोलले न्हाई का हेडमास्तर तुमास्नी ?" सुनील पाटलाने आवाजात करडेपणा आणत विचारले."छोटे मालक, माफी मागतो पण डोस्क्याचा पार भुगा झालाय. मी इसरूनच गेल्तो बगा"तुतेने मखलाशी केली."आता बदाम पाठवतो घरला, म्हंजी चांगलं ध्यानांत राहतील आमची कामं तुमास्नी" पाटील बोलला."तसं काय बी न्हाई मालक, जी आर आलाय जिल्हाधिकारी हापीसातन, सगळ्या बदल्या थांबीवल्यात साहेबांनी" तुतेने वाईट बातमी सांगितली.
"मग कस करायचं ? " सुनील पाटलाला मोहिनीला तालुक्याच्या गांवी आणायचेच होते."झेड पी हापीसातला सचिव हाय, रातच्याला बोलवू का त्याला हायवेवरल्या हाटेलात?" तुतेच्या तोंडातून लाळ टपकायला लागली."तो काय उजेड पाडणार हाय ?" पाटलाला कामाच्या माणसालाच खाऊ/ पिऊ घालायचे होते."बदली अर्ज मागच्या महिन्यात संमत झाला असं दाखवावं लागल मालक " तुतेने खाजगी आवाजात सांगितले."मग घोडं कुठ अडलय ?""आता बाई मानसा कडून त्यो सचिव खाईल काय आन पिईल काय मालक ?" तुतेने खरी अडचण सांगितली."कळलं, रातच्याला बोलवा त्याला पण आदूगरच सांगून ठेवतोय, काम झालं म्हंजी झालंच पाहिजे अन बातमी बाहेर जायला न्हाई पायजेल""बस का मालक ? आजवर कदी केलाय का म्या असला गुना ?" तुतेचा रात्रीचा बकरा कापला गेला होता.
हायवेवरच्या ढाब्याची जमीन नानासाहेबांचीच होती. फक्त दारू बाहेरून न्यावी लागणार होती. मोहिनी साठी काहीही करायला पाटील तयार होता व डांबरट तुतेला सर्व प्रकारांची व्यवस्थित कल्पना होती.
रातच्याला वस्तीला बाहेर असल्याचा निरोप बायकोला सुनील पाटलाने कळवला तेव्हा सायंकाळ उलटत आलेली होती. रात्री झेडपी ऑफिसातला सचिव व तहसीलदार तुते बरोबर ढाब्यावर त्याने अख्खी कोंबडी व बाटली रिचवली.सचिवाने २ हजाराच्या बदल्यात तसा अर्ज दाखल करून घ्यायला मंजुरी दिली. पाटलाने शंभराच्या दहा कोऱ्या नोटा त्याच्या हातावर टिकवल्या."बाकी काम झाल्यावर " सुनील पाटील गुरगुरला."मालक माज काय ?" तुतेने हावरटासारखे विचारले."त्या जयपालच्या केस मंदी मागच्या मैन्यात रतीब वाढिवला न्हाय कारे तुह्या ?" पाटील कावत बोलला."असं काय करता मालक, तुमी फेकलेल्या तुकड्यावर जगतो आमी गरीब मानसं, थोडं अधिक द्यावं की मालकांनी" तुते आधाशीपणाने बोलला."काम जाल्यावर भेट" म्हणतं पाटलाने रजा घेतली.
स्वत:च्या ड्रायव्हरला त्या दोघांबरोबर रिक्शाने पाठवून सुनील पाटील एकटा सुमो घेऊन पाडळस्याला निघाला. आज पाडळस्यालाच वस्तीला राहा असा निरोप त्याने मोहिनी इंगळेला पाठवलेला होताच. मोहिनीच्या आठवणीनेच तो मोहरून गेला.*******************************रावसाहेब गाजरेंसमोर जिल्ह्याचे डीसीपी हेगडे साहेब सोफ्यात आरामात बसले होते. एका पायावर दुसरा पाय टाकून मागे रेलून बसलेल्या हेगडेंनी जिल्ह्यातली पोस्टिंग गेली ४ वर्षे व्यवस्थित मॅनेज केलेली होती. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींकडेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राबता असतो म्हणून त्यांना नाराज न करणे हेच हेगडे साहेबांचे ईप्सित होते.दुसरीकडे नानासाहेब पाटील व राजेंद्र गाजरे तर एका खुर्चीवर जामिनावर सुटलेला सुहास पाटील होता. विषय अर्थातच अट्रावल प्रकरणाचा होता. आतापर्यंत चर्चा जवळपास संपतच आलेली होती.
"फौजदार बोरसेंना सांगून फाइल आजच मागवतो रावसाहेब" हेगडे बोलले."नुस्ती फाइल नको हेगडे, साक्षीदारांची नांवेबी पायजेल" राजेंद्र बोलला."ती फाइल मध्येच मिळतील" हेगडे आश्वस्त पणे म्हणाले."तो चौधरी गेला होता बोरसेंला घीऊन, त्याने बोरसेला पढवून ठेवलेला असेल" नानासाहेब बोलले."असू द्यात की, बोरसे माझ्या हुकुमाबाहेर नाही..... जास्त काही करायला गेला तर जिल्ह्याच्या ठिकाणी घेतो त्याला"हेगडे उठत उठत बोलले. "आता सांभाळावं पाटील साहेब, हा जामीन सुरू असेपर्यंत कुठली एन.सी ही यायला नको तुमच्या बद्दल" निघता निघता त्यांनी सुहासला सुनावले.
हेगडेचे लहानपण महाराष्ट्रातच गेले होते. तरुण पणी कॉलेजात धिंगाणा घालणारा युवक म्हणून तो प्रसिद्ध होता. अकोल्याहून जेमतेम बीएची पदवी घेऊन एमपीएससीची परीक्षा देऊन त्याने पोलिस दलांत प्रवेश केला तेव्हा 'वाया गेलेलं हे कार्टं त्याच लायकीच होतं' असच त्याला ओळखणाऱ्यांचे मत झाले. सर्व्हिस मध्ये कामाऐवजी मध्यस्थी करवून देणारा अधिकारी म्हणून त्याने नांव कमावले. सोबत बरीच निनावी मिळकत कमावली. स्वत:वर कठिण प्रसंग आल्यास वरिष्ठांकडे सहपत्नी जाण्यास हा गृहस्थ कचरत नसे.
रावसाहेबांनी व राजेंद्राने सुहास पाटलावर आलेला प्रसंग लीलया परतवून लावला. पक्षाच्या बैठकीत हा प्रश्न उभा राहताच त्यांनी इतर पक्षश्रेष्ठींच्या पोरांच्या कुलंगड्यांची यादीच सादर केली व पक्षातल्या विरोधकांची तोंडे आपोआपच बंद झाली. सुहास पाटलाची ग्राम पंचायतीच्या निवडणूकीला उभे राहण्याची शक्यता मात्र मावळली. कारण पक्षश्रेष्ठीच नव्हे, तर स्वत: राजेंद्रही 'यावल' तालुक्यातल्या पंचायतीची मते सुहास पाटलाला मिळणार का ह्या बद्दल साशंक होता. त्याऐवजी सुनीलला निवडणुकींचा उमेदवार म्हणून पुढे ढकलायचे नक्की करण्यात आले तेव्हा सुनील झेडपी सचिव व तहसीलदाराबरोबर सौदा करण्यासाठी ढाब्यावर बसला असल्याचे त्यांना माहीत नव्हते.नानासाहेब पाटलांनी घरी परतेपर्यंत गाडीत सुहास वर चांगलेच तोंडसुख घेऊन त्याला साफ अर्धमेला करून टाकलेला होता. रमेश तर हल्ली नानासाहेबांच्या आजूबाजूनेही फिरकत नसे.**********************"हेगडेंनी स्वत:चे वजन वापरून केस दाबली भाऊ " देसाईंनी संतोषभाऊंना आल्या आल्याच रिपोर्ट दिला."मला माहीत होते हे घडणार, पण सुहासला आता कमीत कमी निवडणुका होईपर्यंत शांत बसणे भाग आहे. " संतोषभाऊ बोलले."सुहास पाटलाच्या ऐवजी सुनीलला उभे करणार असल्याचे ऐकले भाऊ," देसाई बोलले."मग तर प्रॉब्लेम वाढलाय, कारण सुहास पाटलाबद्दल लोकांचे मत खराब आहे पण सुनील पाटलाने कमीत कमी नांव खराब करवून घेतलेले नाही" संतोषभाऊ जरा काळजीने बोलले."मोहिनी इंगळे प्रकरण बाहेर काढलं तर ?""त्याने फारसा फरक पडणार नाही देसाई, आजकाल टीव्ही वरच्या मालिका बघून लोकांची मन:स्थितीही तसलीच होत चालली आहे. उलट काहींना त्यात मोठेपणा वाटतो.""तिची इथल्या शांळेत बदली करवून, तिलाच महिला उमेदवार म्हणून उभी करणार असल्याचे ऐकून आहे." देसाई बोलले."सुनील पाटलांची भानगडीची बाई दिसायला कशी दिसते, ते बघायला गर्दी जमेल पण लोकं तिला मत मात्र देतील की नाही ह्यात शंका आहे. सुरेखा वहिनींना मात्र आपल्या सहकारणी बरोबर लढत द्यावी लागेल.""एकूण १६ जागांवर आरक्षण आहे. त्यापैकी आपल्या तालुक्यात ४ जागा आहेत भाऊ, इतर दोन जागांचे काय करायचे ?""किरण चौधरींची जागा त्यांच्या पत्नीला द्यावी कारण त्यांचे निंभोरा व आसपासच्या भागातले काम उत्कृष्टंच आहे. सावद्याला माळी वहिनींना बरीच मंडळी ओळखतात. आपल्या विभागातल्या राखीव जागांची काळजी नाही असे सध्या तरी वाटतेय"
इतक्यात वासुभाऊ आल्याचा निरोप स्वीय सहाय्यकाने दिला, "त्यांना आंत पाठवा...." म्हणेपर्यंत वासुभाऊ दरवाज्यात उभे असलेले त्यांनी पाहिले."मी कच्ची यादी आणली आहे भाऊ, जरा नजरे खालून घालावी." ते आल्या आल्या म्हणाले."बरं झालं; मी तुम्हाला आजच कच्ची यादी तयार करायला मदत करा म्हणून सांगणार होतो." भाऊ हसतं हसतं बोलले.पहिली चार नावे तालुक्यांतल्या महिला राखीव उमेदवारांची होती.चारही जागांवर संतोषभाऊंच्या मनांतलेच उमेदवार होते...सुरेखाताईंचे नांव पक्षाने पक्के केले होते.......