Saturday, March 10, 2007

तेजस्विनी-३

"त्यात ठरवायचं काय ? संतोषभाऊंनीच अध्यक्षपदासाठी प्रयत्न करावा. देसाई दरवेळी उगीचच पिल्लू सोडतात" सुरेखाताईंचे मत कपडे बदलता बदलता राजाभाऊ शांतपणे ऐकत होते."नाही, ते जर परिषदांच्या निवडणुकांना उभे राहिले तर नक्कीच निवडून येतील पण सरकारच्या अधिनियमामुळे त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले किंवा मिळाले नाही तर तो त्यांचा अपमान होईल." राजाभाऊ उत्तरले." तुमचे उगीच काहीही, त्यात काय इतका मोठा अपमान होणार ? असले तर पद स्वीकारावे, नाही तर दुसऱ्या पदाकडे वळावे माणसाने....." सुरेखाताई व राजाभाऊंचा संवाद सुरू होता.राजाभाऊ कधीही पत्नीला 'तुला काय कळतंय' ह्या अर्थाने हिणवत नसत. स्वतः:ची मते तिने मांडावीत ह्यासाठी ते आग्रही असत."मग त्यापेक्षा दुसऱ्या पदाकडेच सुरुवातीपासून का लक्ष देऊ नये ?' राजाभाऊंच्या प्रश्नाचे उत्तर सुरेखाताईंकडे नव्हते." जाऊ द्या, मला झोप येतेय...." असं बोलत, त्या वैशालीला कुशीत घेऊन झोपण्याची तयारी करू लागल्या."मग त्यापेक्षा दुसऱ्या पदाकडेच सुरुवातीपासून का लक्ष देऊ नये ?' ह्या आपल्याच वाक्यावर राजाभाऊ विचार करू लागले. विधानसभेच्या निवडणुकांत नानासाहेब पाटलांच्या विरोधात संतोषभाऊ उभे राहिल्यास काय होऊ शकेल ह्याचा विचार करता करता त्यांना झोपेने घेरले.***********************"काय मास्तरीण बाई, आमचं पोरगं धडं शिकत हाय की न्हाय शाळेत ?" सुनील पाटलाचा आवाज सुरेखा ताईंनी ओळखला व 'दैनिक लोकशाही' मधून डोकं वर काढून त्यांनी सुनील पाटलाकडे रोखून पाहिले."काकी कशा आहेत ?" त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी प्रतिप्रश्न केला."आता तुमी घराला यावा काकीची चौकशी करायला. पोराची चौकशी करण्यासाठी आलू आमी इथं" पाटलाच डोकं ठिकाणावर येत नव्हत. समोरची मास्तरीण आपली भावजय आहे हेही तो विसरला होता."शिक्षणाचा व पाटलांचा संबंध असतो का कधी ? ह्या इयत्तेत पास झाला तर तुमच्या ऐवजी, मी पेढे वाटीन.. बरं भाऊजी !" सुरेखा ताईंना ह्या प्रकारांची चांगली सवय झालेली होती. इतक्या सहजा सहजी त्या पाटलाशी बोलण्यात हरल्या नसत्या."पाटलांना शिकून कुठल्या शाळेत नोकरी करायची हाय का ? जमीन अन शेती बघायला फुरसत न्हाय आमच्या कड तिथं खर्डेघाशी कोन करील?" पाटील फुकाचा रुबाब दाखवत बोलला."मग पोराला शाळेतून घरी न्यायला आलात, असं सांगा की भाऊजी; विलास..... साहेबांना मुख्याध्यापकांकडे घेऊन जा, म्हणावं पिंटूचे वडील आले आहेत त्याचे नांव कमी करायला..... भाऊजी, तुम्ही ह्याच्या बरोबर जा" सुनील पाटलाचं तोंड जोडा मारल्यागत झालेले पाहून टीचर्स रूम मध्ये बसलेल्या सगळ्या शिक्षकांना आतून आनंदच झाला."तसं काय बी न्हाय वैनीबाय, आमी आपलं चौकशी करायला आलो व्हतो पोराची; तुमास्नी उगीचच राग आला" सारवासारव करायच्या मूड मध्ये पाटील बोलले."आता हो भाऊजी, वैनी कधी रागावेल का लहान दिरावर ? चौकशी झाली असली तर जाऊ म्हणते, गणिताचा तास घ्यायचा आहे वर्गात." सुरेखा ताईंनी सुनील पाटलाला स्वतः:च्या जागेची ओळख करून दिली."आयला, वैनीताई लई गरम माथ्याच्या हैत की तुमच्या" एक चमचा सुनीलला टीचर्स रूमच्या बाहेर आल्या आल्या बोलला."लई माज चढलाय ह्यांना, त्यो संतोषभाऊ जवळचा वाटतो आमच्या पेक्षा, ईलच कधी काम सांगायले घरी तवा बघीन सालीला""काय मास्तुरे, बरं हाय ना?", मुख्याध्यापकांच्या खोलीत सरळ शिरत सुनील बोलला."या, पाटील, आज कशी आम्हा गरीबाची आठवण आली ?" हेडमास्तर दीनवाणे पणाने बोलले."आमच्या वळखीच्या एक बाई हाईत पाडळस्याच्या प्राथमिक शाळेत, त्यांन्सी इथं ट्रान्स्फर करून घ्या मास्तर""आस्स व्हयं, काय नांव म्हणलात बाईंचं ?" हेडमास्तरांनी विचारले."मोहिनी इंगळे नांव हाय, इथल्याच हैत, यायला जायला अक्षी तरास होतो बाई माणसाला म्हणून आलो होतो खास ""बरयं, जरा तहसीलदार कचेरीत ही सांगा, म्हणजे ट्रान्स्फर चं काम लौकर हुईल" मास्तरांनी सुचवले. मास्तरांना माहीत होते, ह्या मोहिनी इंगळेंची बऱ्याच जणांनी शिफारस केली होती. नानासाहेब पाटलांच दिवटंही तीच्या मागे लागलंय म्हणजे काही तरी वेगळंच प्रकरण असणार. मास्तरांनी लगेच पाडळस्याची फाइल मागवली.***************************राजाभाऊ कॉलेजातली लेक्चर्स सुरू असतानाच, मोकळ्या वेळेत संतोष चौधरींना भेटायला गेले. त्यांचे कार्यालय कॉलेज पासून जवळच असल्याने फारसा प्रयास पडणार नव्हता. दोनच क्षणांत संतोषभाऊंनी त्यांना स्वतः:च्या दालनात बोलावले."काय घेणार ? चहा की काही थंड ?" बसत नाही तोच त्यांनी प्रश्न विचारला."चहा चालेल" राजाभाऊंनी बऱ्याच वेळा येथे येण्याचे केले असल्याने त्यांना सरांच्या पद्धती चांगल्याच ठाऊक होत्या." कालच्या बैठकीत तसा निर्णय काहीच घेता आलेला नाही, प्रत्येकाचे मत स्वतंत्र्यपणे ऐकणे चांगले म्हणून मी सर्वांनाच एक एकटे भेटायला बोलावले आहे." संतोषभाऊंनी प्रस्तावना केली."बरोबर आहे सर..... माझ्या मते आपण सरळ विधानसभेच्या जागेसाठी स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहावे." राजाभाऊंनी मुद्द्यालाच हात घातला.मेजावर पडलेल्या पेपर वेट फिरवत संतोषभाऊ विचार करून म्हणाले, "मग झेड पीच्या अध्यक्ष पदासाठी उमेदवार तयार करावा लागेल.""देसाईंना विचारले तर ?" "नको नको; त्यांच्यावर दूध महासंघाची बरीच जबाबदारी आहे. त्यावर आधिपत्य ठेवणे भाग असल्याने त्यांना मी हालवू शकत नाही. मला तुमच्याबद्दलही विचार करायचा नाही; कारण राजकारण हे तुमचे क्षेत्र नाही राजाभाऊ, वाईट वाटू देऊ नका""नाही सर..... तो विचार तर मी स्वप्नातही करणार नाही" राजाभाऊ गडबडून म्हणाले."राजाभाऊ तुम्ही व देसाई माझे कायदे विषयक सल्लागार म्हणून जवळ आहात त्यातच मला समाधान जास्त आहे." संतोष भाऊ स्वगत बोलल्यागत बोलले."आपल्या जवळच्या वर्तुळात बरीच मंडळी आहेत सर; वासूभाऊ, फिरके, शेळके मास्तर, विचारे साहेब, भराडे बाई....." राजाभाऊ पटापट नांव घेत होते."भराडे बाई म्हणजे तोफखाना आहे.... काही वेळा राजकारणात इतके उतावीळ होऊन चालत नाही, पण त्यांना समजावण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. ह्या वेळीच जर महिला उमेदवार दिला तर आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीसाठी तो प्लस पॉंईंट ठरेल""प्रियाला विचारून बघा नं सर" राजाभाऊ सहज बोलले. "प्रिया पेक्षा वहिनींचा विचार मी करत होतो" पटकन संतोषभाऊंच्या तोंडातून वाक्य पडलं."बापरे, सुरेखाला कसे जमेल ? नाही नाही, नको सर....." राजाभाऊ घाईघाईत बोलले."राजाभाऊ, निवडणुकीला उभे राहिले म्हणजे निवडून आलेच असे नाही..... व निवडून आले म्हणजे पोस्ट मिळाली असे नाही.... विधानसभांच्या निवडणुकांच्या आधी झेड पी च्या निवडणुका आहेत. आपल्याला स्वबळावर कितपत निवडणुका लढवता येतील हे झेड पीच्या निवडणुकांतून कळेल."राजाभाऊंना सरांनी सांगितलेला शब्द न शब्द पटत होता पण सुरेखाचे नांव झेड पी च्या निवडणुकांसाठी येऊ शकेल ह्याचा स्वप्नातही त्यांनी विचार केलेला नव्हता."राजाभाऊ, शांत पणे विचार करा. मला पूर्णं कल्पना आहे की राजकारण घाणेरडे असते. पण चिखलात सगळी बेडकीच नसतात तर कमळेही उगवतातच ना !""......!" राजाभाऊ निःशब्द होते."वहिनी शिकलेल्या आहेत, शिक्षिका आहेत, स्त्रियांच्या समस्यांची जाण त्यांना आहे. तालुक्यातले प्रश्न त्यांना ठाऊक आहेत व सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यात राजकारणी व्यक्तीला लागणारा तडफदारपणा आहे......" संतोषभाऊंनी नेमक्या शब्दांत केलेले तंतोतंत वर्णन ऐकून राजाभाऊ निरुत्तर होत होते."राजाभाऊ, आपण सुशिक्षितांनी काठावर उभे राहून गंमत किती काळ पाहायची ? वर आपणच सिस्टिमला दोष देतो पण जोवर सुशिक्षित मंडळी सक्रिय राजकारणांत उतरणार नाहीत तोवर पाटलांसारख्या व्यक्तींचे घाणेरडे चाळे आपल्याला सहन करावे लागतील.""सर, मी तिला सांगितले तरी ती ह्या बाबतीत माझे ऐकणार नाही" राजाभाऊंनी शेवटचा प्रयास करून पाहिला."मान्य !...मी सांगून पाहतो, मग त्या नक्कीच तयार होतील. आज आपल्याकडेच सायंकाळचा चहा घेऊया, म्हणजे निवांत गप्पाही मारता येतील. वहिनींना सांगा, चहाबरोबर माझी आवडती भजीही तयार ठेवा !"

No comments: