Saturday, March 10, 2007

तेजस्विनी-८

"अहो झेडपी मेंबर, अर्धा कप चहा मिळेल का ?" राजाभाऊंनी सुरेखाताईंना म्हटले.राजाभाऊंची रविवारच्या सकाळी आळसांत सुरू असलेली सगळी कामे व मध्येच सोडलेले चहाचे फर्मान त्यांना नवीन नव्हते.नवीन होते ते त्यांनी दिलेले संबोधन....लटक्या रागाने वर्तमान पत्रातून डोके काढून त्यांनी मानेला झटका दिला व म्हणाल्या,"झेडपी मेंबरची स्वयंपाकीण बाई आज रजेवर आहे, चहाचा भत्ता रोखीत घेऊन बाहेरूनच चहा प्यावा आज राजेसाहेबांनी."वैशाली अजून झोपलेलीच होती. आजींची अंघोळ आटपून देवपूजेची तयारी सुरू होती. त्यांची देवपूजा आटोपताच भिजत ठेवलेले पोहे फोडणीला टाकायचे होते. तोवर पटकन आपण अंघोळ करून घ्यायच्या विचारांत असतानाच राजाभाऊंचे फर्मान सुटले होते. आता अजून पंधरा मिनिटांची खोटं ह्या विचारांत असतानाच राजाभाऊ उठून उभे होत म्हणाले,"मग असंच करावं म्हणतो.... " "हो, तेव्हढीच एखादी सिगारेट फुंकायला मिळेल ते सांगा की" त्या परत लटक्या रागाने म्हणाल्या.अधून मधून लहर आली की राजाभाऊ धूम्रपान करीत ते आता सुरेखाताईंच्या चांगले सवयीचे झालेले होते. त्यांच्याकडे मिश्कीलपणे तिरपा कटाक्ष टाकत राजाभाऊंनी पायांत चपला सरकवल्या व घातलेल्या बुशकोटाची बटणे लावत लावत बाहेर पडायची तयारी केली. सुरेखा ताई वळून स्वयंपाक घरापर्यंत पोहचल्या नसतील एव्हढ्यात राजाभाऊंचा " अरे... तू इकडे कुठे ?" असा आवाज आला म्हणून त्या मागे वळल्या. बघतात तर अंगणात प्रियांक मोटरसायकल स्टॅंडवर लावण्याच्या तयारीत होता."बाबांनी आज मीटिंग लावलीय दुपारी, तुम्हा दोघांना बोलवलंय ३ वाजता" लावलेली बाइक स्टॅंडवरून काढत तो बोलला.एक क्षण काय उत्तर द्यावे हे न सुचल्याने त्या तश्याच उभ्या होत्या. "हो, नक्की येऊ म्हणून सांग...." पाठमोऱ्या राजाभाऊंचे शब्द त्यांनी ऐकले.'चला, रविवार सार्थकी लागला' असा मनातल्या मनात विचार करत त्या पटकन न्हाणीघरात शिरल्या.
"मी राहतो घरी, तू जाऊन ये मीटिंगला" राजाभाऊ पोहे खात म्हणाले."अहो, काहीतरीच काय ? मी एकटी कशी जाऊ?" सुरेखाताईंची खरंतर रविवारी घराबाहेर पडायची इच्छा नव्हती."मला जरा आराम करायचा आहे, मी वैशाली बरोबर राहीन तू जाऊन ये " परत राजाभाऊ बोलले.सकाळी सकाळी वाद नको म्हणून त्या तात्पुरत्या गप्प बसल्या. दुपारी जेवण झाल्यावर बोलू असा त्यांनी विचार केला.
जेवणे आटोपल्यावर आळसावल्या शरीराने दोघेही पडले होते. हळूच सुरेखाताईंनी मीटिंगला जाण्याचा विषय काढला...."सुरेखा, अगं तुझे जाणे महत्त्वाचे आहे. मी कॉलेजची कामे आहेत म्हणून येऊ शकत नसल्याचे तू कळव" राजाभाऊ बोलले."पण मी एकटी काय करू जाऊन ?" "आता प्रचारासाठी, बैठकांसाठी व इतर कामांसाठी तुला एकटीलाच फिरावे लागणार" ते म्हणाले."बापरे; कसं जमेल मला हे ? वैशुला सोडून कसं जाता येईल ? आईंना काय वाटेल ?" त्यांनी भरभर सगळे प्रश्न एकदम विचारले."आईची काळजीच नको करूस, मी तिला आज नीट समजावून सांगीन, जोवर जमतंय तोवर वैशुचं आपण तिघं मिळून करू नाहीतर एखादी बाई बघू कामाला" ते विचार पूर्वक बोलत होते."मीही बऱ्याच दिवसांपासून विचार करतेय एखादी बाई वैशुला सांभाळायला ठेवावी, आईंकडून धावपळ होत नाही आताशा" त्या बोलल्या.शेवटी सुरेखाताईंनी एकटे जायचे असे नक्की होईस्तोवर राजाभाऊंचा स्वर जडावला होता. कोपऱ्यांत भातुकलीचा खेळ मांडून आदळ-आपट करणाऱ्या वैशुचाही त्यांना त्रास जाणवत नव्हता. थोड्याच वेळांत ते चक्क घोरायला लागले.....
साडी बदलत असताना वैशुची भुणभूण चालू होती. "आई मी पन येते मीतींगला" असं लाड लाड म्हणत ती साडी खेचत होती. एकुलत्या एका सुटीच्या दिवशी तिला सोडून जायचं त्यांच्या जीवावर येत होत. अखेरीस 'मी पटकन येते' असं तिला कसंबस समजावून त्या बाहेर पडल्या तेव्हा वैशु आजीच्या मांडीवर बसून पुस्तकातली चित्रे बघत होती.शक्य झाल्यास ही निवडणूक लढवायचीच नाही ह्या विचारांसोबत त्यांनी घर सोडले.*********************आजची तेव्हढी एकच गोष्ट सुरेखाताईंच्या मनासारखी होणार नव्हती.....वासुभाऊ व संतोषभाऊंनी तालुक्यातून जिल्हा पंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी त्यांची जागा निश्चित झाल्याचे सांगितले तेव्हा नाही म्हणायचे त्यांना सुचलेच नाही. कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत होता तेव्हा मोहरून जाताना कुठेतरी एक काळजी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यांत दडलेली होती.वासुभाऊ व विचारे साहेबांबरोबर सुरेखा ताईंचे 'तिकीट' पक्के झाले होते. अट्रावलातून अर्थातच भराडे बाई, तर निर्मला चौधरी व माळी वहिनी ह्या दोघी तालुक्यातल्या इतर राखीव जागांवर निश्चित करण्यात आल्या. शेळके मास्तर व फिरके ह्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची जबाबदारी टाकण्यात आलेली होती. त्यांच्या सह अजून ४ जणांना तिकीट वाटप केली गेली. दोघा अपक्षांना पाठिंबा द्यायचे ठरले तर ५ जागांवरील निर्णय नंतर घेण्यात येणार होता. कोणालाच कुठल्याही जागेबद्दल तक्रार नव्हती. नव नवीन सहकारी, त्यांच्या गावांची नावे, त्यांची नावे त्या पटापट आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत होत्या. शाळेत शिक्षिकेला मुलांची नावे लक्षांत ठेवण्याचा अनुभव येथे कामी आला. निवडणुकांना दीड महिना बाकी होता.
संतोषभाऊ, देसाई, विचारे साहेब व वासूभाऊ आजच रात्रीच्या गाडीने मुंबईला जाणार होते. भारतीय जनमोर्च्याशी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत युती झाल्यास बघावी असा पक्षाचा विचार होता. 'जनजागृती' व 'भा.ज.मो' ह्या दोन्ही पक्षांची विचारसरणी साधारण मिळती जुळती होती. राष्ट्रीय व राज्य पातळीवर भा.ज.मो. चे कार्य गेल्या २५ वर्षांपासून सुरू होते. मुख्य म्हणजे त्यांचाही सामना 'विकास आघाडी' शी होता. भा.ज.मो.च्या पक्षश्रेष्ठींकडून संतोषभाऊंना आजच आमंत्रण आलेले होते. ही संधी दवडायची नाही असे ठरवत पक्षाचे धुरंधर उद्याच तेथे जाऊन थडकणार होते. तालुका व राज्य पातळीवर यावलच्या जागा जनजागृतीने लढवायच्या व राष्ट्रीय पातळीवर भा.ज.मो. ला समर्थन द्यायचे असा संतोषभाऊंचा विचार होता. कदाचित काही जागा मित्रपक्षाला द्याव्या लागणार होत्या. झेड.पी. च्या जागा न देता ग्रामपंचायतीच्या जागा वेळ पडल्यास द्याव्या ह्यावर सर्वांचे एकमत झाले. म्हणूनच ५ ग्रामपंचायतीच्या जागा रिकाम्या ठेवल्या गेल्या. संतोषभाऊंच्या मनासारखे घडल्यास तालुक्यातल्या विधानसभेच्या जागेवर निवडून येण्यास नानासाहेब पाटलांना बरेच परिश्रम घ्यावे लागले असते.
'आता प्रचाराला लागा' असा आदेश घेत व पुढचे मनसुबे आखत एक एक कार्यकर्ता दुधमहासंघाचे कार्यालय सोडत होता तेव्हा जीच्याबरोबर आपली लढत आहे ती मोहिनी इंगळे कशी असावी ह्याचाच सुरेखाताई अंदाज बांधत होत्या.*******************मोहिनी इंगळे ची बदली करवून घेण्यात अखेर सुनील पाटलाला यश आलेच. नानासाहेब पाटलांचे तालुक्यातल्या तहसीलदार कचेरी सह जिल्ह्याच्या प्रत्येक सरकारी कचेरीत जबरदस्त वर्चस्व असल्याचे हे एक द्योतक होते. त्यांनीच नव्हे तर त्यांच्या दिवट्या चिरंजीवांनीही मनांत आणलेली सर्व कामे चुटकीसरशी पार पडत होती.ह्या एका महासत्तेविरुद्ध लढा द्यायचा होता तो संतोषभाऊंना आपल्या नवख्या शिपुरड्यांसह.फक्त माणसाशी असलेले माणसाचे नाते हेच काय ते त्यांचे ह्या निवडणुकीतले भांडवल होते.मोहिनी इंगळेचे जोरदार स्वागत शाळेत केले गेले त्या दिवशी वैशुला ताप आलेला असल्याकारणाने सुरेखाताई शाळेत गैरहजर होत्या.अनवधानाने एक वेगळाच संदेह त्यांच्या सहकार्यांना वाटू लागला.
"नमस्कार सुरेखा ताई" अनोळखी स्त्रीच्या आवाजाने पुस्तकातून डोकं वर काढून सुरेखाताईंनी बघितले तर एक नीटनेटकी बाई त्यांच्या समोर सुहास्यवदनाने उभी होती.'कोणाची बरं आई असावी ही' असा ठेवणीतला शिक्षकी विचार करत असतानाच "मी मोहिनी, मोहिनी इंगळे" हे वाक्य तीच्या मंजूळ स्वरांतून उमटले."नमस्कार.... नमस्कार...." असं तोंडातल्या तोंडात पुटपुटताना स्वत:चा स्वर इतका कोरडा कसा ह्याचेच त्यांना आश्चर्य वाटू लागले.स्टाफ रूम मधले सगळे जण हातातली कामे सोडून दोघींकडे बघू लागली...."बसू का तुमच्या सोबत दोन मिनिटे ?" तिने पुढे विचारले तश्या त्या वरमून बोलल्या "अरे सॉरी हं, मीच तुला बस म्हणून सांगायला हवे"ती बसत असतानाच त्या परत अपराधीपणाने बोलल्या, "माफ करा, मी तुम्हाला अग तूग केलं"."त्यात काय मोठं ? आहेच मी तुमच्याहून वयाने लहान, तुमचा हक्कच आहे तो" ती पटकन बोलली.".......""मी तुम्हाला एक खास विनंती करायला आलेय ताई" सुरेखा ताईंकडे ती रोखून बघत बोलली."हम्म बोल ना" आता त्यांच्या स्वरांतला तो कोरडेपणा कमी झालेला होता."आपण दोघी येथे शिक्षिका व बाहेर प्रतिस्पर्धी म्हणून वावरूया का ? म्हणजे मला म्हणायचे होते.... आपल्या निवडणुकांचा विषय बाहेरच ठेवून आपले इथले संबंध आपण सांभाळायचे का ?" ती जरा चाचरत बोलली."हो...आनंदाने, खरं तर मला आशाच नव्हती तुझ्याकडून ह्या प्रस्तावाची, म्हणून माझा प्रतिसाद सुरुवातीला अगदी थंड होता." सुरेखा ताई उत्साहाने म्हणाल्या."मी पण जरा घाबरतच होते, मला वाटलं होतं, सुरेखाताई म्हणजे........""एखादी जाडजूड, पोक्त, चष्मा लावणारी, दोन वेण्या घालणारी खडूस बाई असेल !" हसत हसत सुरेखाताईंनी तिचे वाक्य पूर्ण केले तेव्हा सगळे जण हास्यात बुडले.
दोघींच्यातला तणाव त्या हास्यकल्लोळाने दूर झाला.... एक चांगली सहकारीण मिळाल्याचा आनंद स्टाफ मधल्या प्रत्येकाच्या तोंडावरून दिसत होता.
***************************

No comments: