Saturday, March 10, 2007

तेजस्विनी-७

या सुनील राव, या" तहसीलदार तुते तोंडभरून हसत म्हणाले."काय तुते, समदं काही ठीकं आहे ना ?" सुनील पाटलाने सलगीने विचारले. सुनील पाटलाची भाषा, काम निघालं की, कधी मग्रुरीची नसे. स्वत:ची कामे तो धुर्तपणे करून घेई."अक्शी गोंधळ झालाय छोटे मालक, पण नाना सांभाळून घेतीलच" तहसीलदारावर नानासाहेबांचे बरेच उपकार होते. ढापलेल्या शेत जमिनींचे उतारे तलाठ्या मार्फत आपल्या नांवावर करताना नानासाहेब सगळ्यांना त्यांचा हिस्सा नियमीतपणे देत."सुहास रावां बद्दल बोलताय व्हय ?" सुनीलने सहज विचारावे तसे विचारले, "त्यान्सी लई घाई होते कामं उरकायची.... तिच्यात तो रमेश भरीला पाडतो, आता हुईल त्ये बगायचं इत्कच हातात हाय न्हवं""विरोधकान्सी आयतं कोलीतच दिलय हातांत, न्हव का ?" तुते शब्द झेलत म्हणाला."दादांची जमानत झाली त्येच नसिब म्हणायच " त्याच्या ह्या वाक्यावर सुनील पाटलाने फक्त मान हालवली.
"आज इकडे कुणीकडे छोटे मालक ?" तुतेने त्याला गप्प बसलेला पाहून विचारले."हेडमास्तर काही बोलले का ?" पाटलाने अंदाज काढायच्या सुरांत विचारले."कस्ल व्हो ?" तुते डांबरट माणूस होता, त्याला सुनील पाटलाच्या तोंडून मोहिनी इंगळेच्या कामाबद्दल ऐकायचे होते."इंगळे बाईंच्या बदलीच काई बोलले न्हाई का हेडमास्तर तुमास्नी ?" सुनील पाटलाने आवाजात करडेपणा आणत विचारले."छोटे मालक, माफी मागतो पण डोस्क्याचा पार भुगा झालाय. मी इसरूनच गेल्तो बगा"तुतेने मखलाशी केली."आता बदाम पाठवतो घरला, म्हंजी चांगलं ध्यानांत राहतील आमची कामं तुमास्नी" पाटील बोलला."तसं काय बी न्हाई मालक, जी आर आलाय जिल्हाधिकारी हापीसातन, सगळ्या बदल्या थांबीवल्यात साहेबांनी" तुतेने वाईट बातमी सांगितली.
"मग कस करायचं ? " सुनील पाटलाला मोहिनीला तालुक्याच्या गांवी आणायचेच होते."झेड पी हापीसातला सचिव हाय, रातच्याला बोलवू का त्याला हायवेवरल्या हाटेलात?" तुतेच्या तोंडातून लाळ टपकायला लागली."तो काय उजेड पाडणार हाय ?" पाटलाला कामाच्या माणसालाच खाऊ/ पिऊ घालायचे होते."बदली अर्ज मागच्या महिन्यात संमत झाला असं दाखवावं लागल मालक " तुतेने खाजगी आवाजात सांगितले."मग घोडं कुठ अडलय ?""आता बाई मानसा कडून त्यो सचिव खाईल काय आन पिईल काय मालक ?" तुतेने खरी अडचण सांगितली."कळलं, रातच्याला बोलवा त्याला पण आदूगरच सांगून ठेवतोय, काम झालं म्हंजी झालंच पाहिजे अन बातमी बाहेर जायला न्हाई पायजेल""बस का मालक ? आजवर कदी केलाय का म्या असला गुना ?" तुतेचा रात्रीचा बकरा कापला गेला होता.
हायवेवरच्या ढाब्याची जमीन नानासाहेबांचीच होती. फक्त दारू बाहेरून न्यावी लागणार होती. मोहिनी साठी काहीही करायला पाटील तयार होता व डांबरट तुतेला सर्व प्रकारांची व्यवस्थित कल्पना होती.
रातच्याला वस्तीला बाहेर असल्याचा निरोप बायकोला सुनील पाटलाने कळवला तेव्हा सायंकाळ उलटत आलेली होती. रात्री झेडपी ऑफिसातला सचिव व तहसीलदार तुते बरोबर ढाब्यावर त्याने अख्खी कोंबडी व बाटली रिचवली.सचिवाने २ हजाराच्या बदल्यात तसा अर्ज दाखल करून घ्यायला मंजुरी दिली. पाटलाने शंभराच्या दहा कोऱ्या नोटा त्याच्या हातावर टिकवल्या."बाकी काम झाल्यावर " सुनील पाटील गुरगुरला."मालक माज काय ?" तुतेने हावरटासारखे विचारले."त्या जयपालच्या केस मंदी मागच्या मैन्यात रतीब वाढिवला न्हाय कारे तुह्या ?" पाटील कावत बोलला."असं काय करता मालक, तुमी फेकलेल्या तुकड्यावर जगतो आमी गरीब मानसं, थोडं अधिक द्यावं की मालकांनी" तुते आधाशीपणाने बोलला."काम जाल्यावर भेट" म्हणतं पाटलाने रजा घेतली.
स्वत:च्या ड्रायव्हरला त्या दोघांबरोबर रिक्शाने पाठवून सुनील पाटील एकटा सुमो घेऊन पाडळस्याला निघाला. आज पाडळस्यालाच वस्तीला राहा असा निरोप त्याने मोहिनी इंगळेला पाठवलेला होताच. मोहिनीच्या आठवणीनेच तो मोहरून गेला.*******************************रावसाहेब गाजरेंसमोर जिल्ह्याचे डीसीपी हेगडे साहेब सोफ्यात आरामात बसले होते. एका पायावर दुसरा पाय टाकून मागे रेलून बसलेल्या हेगडेंनी जिल्ह्यातली पोस्टिंग गेली ४ वर्षे व्यवस्थित मॅनेज केलेली होती. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींकडेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा राबता असतो म्हणून त्यांना नाराज न करणे हेच हेगडे साहेबांचे ईप्सित होते.दुसरीकडे नानासाहेब पाटील व राजेंद्र गाजरे तर एका खुर्चीवर जामिनावर सुटलेला सुहास पाटील होता. विषय अर्थातच अट्रावल प्रकरणाचा होता. आतापर्यंत चर्चा जवळपास संपतच आलेली होती.
"फौजदार बोरसेंना सांगून फाइल आजच मागवतो रावसाहेब" हेगडे बोलले."नुस्ती फाइल नको हेगडे, साक्षीदारांची नांवेबी पायजेल" राजेंद्र बोलला."ती फाइल मध्येच मिळतील" हेगडे आश्वस्त पणे म्हणाले."तो चौधरी गेला होता बोरसेंला घीऊन, त्याने बोरसेला पढवून ठेवलेला असेल" नानासाहेब बोलले."असू द्यात की, बोरसे माझ्या हुकुमाबाहेर नाही..... जास्त काही करायला गेला तर जिल्ह्याच्या ठिकाणी घेतो त्याला"हेगडे उठत उठत बोलले. "आता सांभाळावं पाटील साहेब, हा जामीन सुरू असेपर्यंत कुठली एन.सी ही यायला नको तुमच्या बद्दल" निघता निघता त्यांनी सुहासला सुनावले.
हेगडेचे लहानपण महाराष्ट्रातच गेले होते. तरुण पणी कॉलेजात धिंगाणा घालणारा युवक म्हणून तो प्रसिद्ध होता. अकोल्याहून जेमतेम बीएची पदवी घेऊन एमपीएससीची परीक्षा देऊन त्याने पोलिस दलांत प्रवेश केला तेव्हा 'वाया गेलेलं हे कार्टं त्याच लायकीच होतं' असच त्याला ओळखणाऱ्यांचे मत झाले. सर्व्हिस मध्ये कामाऐवजी मध्यस्थी करवून देणारा अधिकारी म्हणून त्याने नांव कमावले. सोबत बरीच निनावी मिळकत कमावली. स्वत:वर कठिण प्रसंग आल्यास वरिष्ठांकडे सहपत्नी जाण्यास हा गृहस्थ कचरत नसे.
रावसाहेबांनी व राजेंद्राने सुहास पाटलावर आलेला प्रसंग लीलया परतवून लावला. पक्षाच्या बैठकीत हा प्रश्न उभा राहताच त्यांनी इतर पक्षश्रेष्ठींच्या पोरांच्या कुलंगड्यांची यादीच सादर केली व पक्षातल्या विरोधकांची तोंडे आपोआपच बंद झाली. सुहास पाटलाची ग्राम पंचायतीच्या निवडणूकीला उभे राहण्याची शक्यता मात्र मावळली. कारण पक्षश्रेष्ठीच नव्हे, तर स्वत: राजेंद्रही 'यावल' तालुक्यातल्या पंचायतीची मते सुहास पाटलाला मिळणार का ह्या बद्दल साशंक होता. त्याऐवजी सुनीलला निवडणुकींचा उमेदवार म्हणून पुढे ढकलायचे नक्की करण्यात आले तेव्हा सुनील झेडपी सचिव व तहसीलदाराबरोबर सौदा करण्यासाठी ढाब्यावर बसला असल्याचे त्यांना माहीत नव्हते.नानासाहेब पाटलांनी घरी परतेपर्यंत गाडीत सुहास वर चांगलेच तोंडसुख घेऊन त्याला साफ अर्धमेला करून टाकलेला होता. रमेश तर हल्ली नानासाहेबांच्या आजूबाजूनेही फिरकत नसे.**********************"हेगडेंनी स्वत:चे वजन वापरून केस दाबली भाऊ " देसाईंनी संतोषभाऊंना आल्या आल्याच रिपोर्ट दिला."मला माहीत होते हे घडणार, पण सुहासला आता कमीत कमी निवडणुका होईपर्यंत शांत बसणे भाग आहे. " संतोषभाऊ बोलले."सुहास पाटलाच्या ऐवजी सुनीलला उभे करणार असल्याचे ऐकले भाऊ," देसाई बोलले."मग तर प्रॉब्लेम वाढलाय, कारण सुहास पाटलाबद्दल लोकांचे मत खराब आहे पण सुनील पाटलाने कमीत कमी नांव खराब करवून घेतलेले नाही" संतोषभाऊ जरा काळजीने बोलले."मोहिनी इंगळे प्रकरण बाहेर काढलं तर ?""त्याने फारसा फरक पडणार नाही देसाई, आजकाल टीव्ही वरच्या मालिका बघून लोकांची मन:स्थितीही तसलीच होत चालली आहे. उलट काहींना त्यात मोठेपणा वाटतो.""तिची इथल्या शांळेत बदली करवून, तिलाच महिला उमेदवार म्हणून उभी करणार असल्याचे ऐकून आहे." देसाई बोलले."सुनील पाटलांची भानगडीची बाई दिसायला कशी दिसते, ते बघायला गर्दी जमेल पण लोकं तिला मत मात्र देतील की नाही ह्यात शंका आहे. सुरेखा वहिनींना मात्र आपल्या सहकारणी बरोबर लढत द्यावी लागेल.""एकूण १६ जागांवर आरक्षण आहे. त्यापैकी आपल्या तालुक्यात ४ जागा आहेत भाऊ, इतर दोन जागांचे काय करायचे ?""किरण चौधरींची जागा त्यांच्या पत्नीला द्यावी कारण त्यांचे निंभोरा व आसपासच्या भागातले काम उत्कृष्टंच आहे. सावद्याला माळी वहिनींना बरीच मंडळी ओळखतात. आपल्या विभागातल्या राखीव जागांची काळजी नाही असे सध्या तरी वाटतेय"
इतक्यात वासुभाऊ आल्याचा निरोप स्वीय सहाय्यकाने दिला, "त्यांना आंत पाठवा...." म्हणेपर्यंत वासुभाऊ दरवाज्यात उभे असलेले त्यांनी पाहिले."मी कच्ची यादी आणली आहे भाऊ, जरा नजरे खालून घालावी." ते आल्या आल्या म्हणाले."बरं झालं; मी तुम्हाला आजच कच्ची यादी तयार करायला मदत करा म्हणून सांगणार होतो." भाऊ हसतं हसतं बोलले.पहिली चार नावे तालुक्यांतल्या महिला राखीव उमेदवारांची होती.चारही जागांवर संतोषभाऊंच्या मनांतलेच उमेदवार होते...सुरेखाताईंचे नांव पक्षाने पक्के केले होते.......

No comments: