Saturday, March 10, 2007

तेजस्विनी-२

स्वर्गीय राजीव गांधींनी राजकारणात सुरू केलेल्या स्थानीय स्वराज्य संस्थांत महिला आरक्षण पद्धतीचा फायदा ह्या वेळी ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत स्त्रियांना देण्यात येणार असल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा जी.आर. परिषदेच्या सचिव साहेबांच्या टेबलावर पडला आणि परिषदेच्या समितीवर जणू काही वीजच पडली !
"च्यामारी आता बाया समितीच्या अध्यक्षा व्हनार की काय रं गड्या ?" पाटलांच्या पोराच्या, सुहासच्या तोंडातून हे वाक्य पडताच सचिवांच्या कार्यालयातल्या कारकुनाने फक्त मान हालवली.सुहासच्या बथ्थड डोक्यात तो हो बोलतोय की नाही ते शिरलेच नाही."**ला तुझ्या, तोंडानं सांग की रं व्हय म्हनतोय की न्हाय त्ये""साहेबांना विचारून उद्या कळवतो" कारकून मोकाशीने उत्तर दिले."**च्या, मग मुंडी कश्यापायी हालवतूस ?" सुहासचा जळफळाट होत होता.न जाणो हे दिवटं उद्या परिषदेचा अध्यक्ष झालं तर डोक्यावर मिऱ्या वाटेल म्हणून मोकाशी गप्प बसला."नानासाहेबांनीबी ह्यो कसलं लचांड तुमच्या मागे लावलंय, अध्यक्ष बनवायचं ?" सुहासचा मेहुणा, रमेश सावली सारखा त्याच्या बरोबर राही. अगदी तमाशाच्या फडातल्या नायकिणीशी ओळख करायच्या वेळीही तो मागे राहत नसे."त्यांस्नी विधानसभेवर जायच हाय आता, गांवात आपलं राज्य आलं पाहिजे रमेश""जाऊ द्या हो सुहास राव, कश्यापायी नाराज व्हताय, असा रूल आला तरीबी बायकोला पुढं करून आपणच राज्य चालवायचं की त्या लालू प्रसाद सारखं " खुसखुशीत हसत फेगडे म्हणाले. यावल तालुक्यातले फेगडे कुटुंबीय वर्षांपासून नानांना अध्यक्षपदाच्या निवडणुकांत तालुक्यातल्या समितीची मते मिळवून देत."आपल्या समाजातल्या बायका डोईवरचा पदर खाली पडू द्येत न्हाईत तर अध्यक्षीण कश्या बनतील" सुहासला काळजी आपल्या खुर्चीची लागलेली होती. बोलता बोलता तो खुर्चीवरून उठला त्याच्या पाठोपाठ त्याचे दोघे चमचे लगबगीने उठले.मोकाशी ऐकल्या न ऐकल्या सारखे करीत डोकं एका रजिस्टरांत खुपसून बसला होता."मोकाश्या, ते मोरीच्या बांधकामाचे टेंडर कधी पास करतुयस ?""आता आचार संहिता लागू झाली सुहासराव, टेंडर बारगळलं !""**ला ह्या संहितेच्या, ह्या ***च्याला कधीचा बोंबलतोय, टेंडर पास कर म्हणून" सुहासचा चेहरा लालबुंद झालेला होता. "**व्या टेंडर हातातलं गेलं तर तुला दावतो पाटलाचा हिसका" "भ"ची बाराखडी उगाळत सुहास खोलीच्या बाहेर पडायला वळला तोच त्याची नजर दारांत उभ्या असलेल्या संतोषभाऊंवर पडली. एक क्षण काय बोलावे ते त्याला सुचेना. कसंबसं 'कसे आहात' असा प्रश्न टाकत तो चमच्यांसह तेथून सटकला. संतोषभाऊंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य का उमटले त्याचाच त्याला प्रश्न पडला होता.
"राजपुत्राचा आज श्लोक पठणाचा वार होता का मोकाशी ?" सुहास गेल्या दिशेला बघत त्यांनी हसत हसत मोकाशींना विचारले."जाऊ द्या हो संतोषभाऊ आम्हाला हे रोजचेच आहे. कार्यालयात बाई माणूस कर्मचारी असूनही ह्यांची ही असली भाषा ऐकून घ्यावी लागते. आता तुम्हीच काय करता येईल तर पाहा ""अहो, असे नाराज नका होऊ मोकाशी, हे कुत्रं जास्त भुंकू नाही शकणार आता."" काय सांगू संतोष भाऊ.... आता तेहतीस टक्के जागांवर महिलांना आरक्षण द्यायचा निर्णय सरकारचा, मिरची लागली ह्यांना..... त्यात भरडले आम्ही जातोय" मोकाशींच्या तोंडून खरे कारण बाहेर पडले."मरू द्या, मोकाशी आमच्या वसतिगृहाच्या परवानगीचे पत्र पोहचले. त्याबद्दल व्यक्तिशः: धन्यवाद देण्यासाठी आलोय मी खासं" लॉ कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी गाव-तालुक्यातून मुली येत. त्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून संतोषभाऊंनी वसतिगृहाच्या कच्च्या आराखड्यासह परवानगी मागणारे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते. त्यात मोकाशींनी त्यांना खूप मदत केली होती."काय हे संतोषभाऊ, अहो साधा फोन केला असतात तरी चाललं असते, आपण उगीच तसदी घेतलीत" मोकाशीच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव तरळले."असं कसं चालेल, मग आमच्या पुढच्या कामाच्या वेळी तुम्हाला वाटेल 'बघा, संतोषभाऊ मोठी माणसं झालीत, आता भेटायलाही येत न्हाईत." हसत हसत खुर्चीवरून उठत ते म्हणाले."भाऊ, बसा नं, चहा मागवतो" मोकाशी लगबगीने उठले."नको, त्यापेक्षा तुम्हीच कधी बंगल्यावर या सकाळच्याला, चहा नाश्ता जोडीनच घेऊ....." म्हणत ते दाराकडे वळले. "महिला आरक्षणाच काय म्हणालात तुम्ही मोकाशी ?" सहज खडा टाकावा तसे संतोषभाऊ बोलले."ह्या वेळेचे नक्की माहीत नाही" मोकाशी खाजगीत बोलल्यासारखे बोलले. "पण तेहतीस टक्के जागांवर महिला उमेदवार येणार हे नक्कीच, तसा जी आर काढलाय जिल्हाधिकायांनी. अध्यक्षांच्या पदासाठी काय करायचे त्याबद्दल मीटिंग आहे जळगांवला, तेथेच गेलेत आमचे साहेब""बरंय, स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटेल आता, व पाटलांची वाचा त्यांच्या ताब्यात राहील." हसत हसत ते बाहेर पडले तेव्हा 'किती साधा माणूस आहे' हा विचार मोकाशींच्या डोक्यात आला.******************सुरेखाताईंना दारांत उभे असलेले बघून राजाभाऊ जाधवांना आश्चर्य वाटले. स्कूटर स्टॅंडवर लावत त्यांनी विचारले, "काय हो, काय झालं ?""आल्या आल्या बंगल्यावर पाठवा, चहा व रात्रीचे जेवण आम्ही बंगल्यावरच घेऊ असा निरोप धाडलाय संतोषभाऊंनी" "बरं, हात पाय धुऊन जरा फ्रेश होऊन मग जातो... तोवर तुम्ही चहा पाजा घोटभर आम्हाला" राजाभाऊ घरांत शिरत बोलले."अहो, उशीर होईल नं" "आता अंमळ दहा मीनीट उशीरानंच आलो असतो तर?" ह्या राजाभाऊंच्या प्रश्नाला त्यांच्या कडे उत्तर नव्हते.बंगल्यावर वासूभाऊ, इंदूताई भराडे, शेळके गुरुजी, देसाई साहेब, प्रा. फिरके वगैरे मंडळी बघून राजाभाऊ बुचकळ्यांत पडले. वेगळेच काही तरी प्रकरण दिसतेय हा विचार मनांत आणत व सर्वांना यथायोग्य अभिवादन करीत ते एका खुर्चीत बसले.सर्वांच्या नजरा आपल्यावर खिळल्यात हे बघून जरा ओशाळल्यागत होत ते म्हणाले "उशीर झाल्याबद्दल माफी मागतो, सर" "त्यात काय माफी मागता राजाभाऊ, सगळे आत्ताच आलेत." ह्या संतोषभाऊंच्या वाक्याने त्यांचा जीव भांड्यात पडला. घसा खाकरतं त्यांनी राजाभाऊंकडे बघत बैठकीला सुरुवात केली.....
"आज झेड पी च्या कार्यालयातल्या मोकाशीची भेट घेण्यास गेलो होतो......" त्यांनी महिला आरक्षण विधेयकाचा विषय सर्वांसमोर मांडला. राजाभाऊंना महिला आरक्षण विधेयकाबद्दल बरेच काही माहीत होते. लॉ कॉलेजचे प्राध्यापक असल्याने तो त्यांचा शिकवण्याचा विषयही होता. संतोषभाऊंचा आपल्यावर लोभ आहे ह्याची जाण त्यांना होती पण ह्या राजकीय निवडणुकांच्या बैठकीत आपले नेमके स्थान कोणते ह्याबद्दल त्यांना अंदाज येत नव्हता.
"कसला विचार करताय राजाभाऊ ?" सरांच्या बोलण्याने एकदम ते भानावर आले."मला ह्या विधेयका बद्दल पूर्णं माहिती आहे. सध्या सरकारने फक्त सदस्यांसाठी हे विधायक लागू केले आहे परंतू येत्या पाचं वर्षांत समितीच्या कार्यकारणीवरही ते लागू होईल असा आम्हा विश्लेषकांचा अंदाज आहे." राजाभाऊ शांतपणे बोलत होते, संतोषभाऊंची कौतुकाने भरलेली नजर आता त्यांना सवयीची झालेली होती."हो, मोकाशीही तेच बोलत होते. ह्यावेळी तेहतीस टक्के जागा महिलांसाठी राखीव म्हणून ठेवण्यात येणार आहेत. मात्र त्यांना कार्यकारणी सदस्य किंवा अध्यक्षपदाबद्दल काहीही कल्पना नाही.""साहजिक आहे... कारण, सरकारने तसे स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. ह्या वर्षी हे विधेयक कदाचित प्रयोगाखातीर आणण्यात येईल असा आमचा होरा आहे." राजाभाऊंनी नेमकी परिस्थिती सांगितली. "ह्या विधेयकाला मिळणारा प्रतिसाद व त्याचे येणारे रिझर्ल्ट्स ह्यावरच बाकी सर्व अवलंबून आहे. अत्यंत घाईघाईत हे विधेयक सरकारने सभागृहासमोर मांडून गेल्या अधिवेशनात पास करून घेतले आहे." राजाभाऊंना आपल्याला ह्या बैठकीत का बोलावण्यात आले असावे ह्याचा हळूहळू अंदाज येत होता.
"संतोषभाऊ असे घडले तर आपणांस समितीच्या अध्यक्षपदासाठी उभे राहावे की नाही हे ठरवावे लागणार आहे." देसाई साहेब म्हणाले. देसाई हे जिल्ह्यातले प्रथम आय ए एस अधिकारी होते. मराठी आय ए एस बरेच होऊन गेले पण जळगावांतले आय ए एस म्हणून देसाईंचे नांव सर्वप्रथम होते. संतोषभाऊ चौधरींच्या कारकीर्तीद त्यांनी मिळवलेल्या माणसांपैकी देसाईंचा नंबर बराच वरचा होता. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून जळगाव जिल्हा दूध फेडरेशन संघाचे सुकाणू त्यांनी सांभाळले होते."असे कसे म्हणता देसायी साहेब ? आता भाऊंना कोण विरोध करतूय त्येच पाह्याचय मलाबी " इंदूताई भराडे आक्रमकतेबद्दल व शीघ्रकोपी पणाबद्दल तालुक्यात प्रसिद्ध होत्या. पण हाडाची कार्यकर्ती, मेहनती व झोपडपट्टी वासीयांची कैवारी म्हणूनही त्या प्रसिद्ध होत्या. इंदूताई मूळच्या "विकास आघाडी" पक्षातल्या पण सुहासची मर्जी फिरल्याने त्यांना पक्ष बदलावा लागला होता. इंदूताई म्हणत, 'त्या मेल्याची नजर वाईट आहे' तर सुहासचे चमचे म्हणत, 'सुहासचे मन भरले होते' त्यांनी पक्ष सोडल्यानंतर दोघेही एकमेकांसमोर कधीही आले नव्हते म्हणून सत्य गुलदस्त्यातच होते.
"इंदूताई, प्रश्न विरोधाचा न्हाई, सरकारच्या निर्णयाचा हाय" शेळके मास्तर भीत भीत बोलले. "बरोबर आहे मास्तर, सरकारचा निर्णय बंधनकारक तर आहेच पण तो आपण सर्वांनी योग्य वेळी स्वीकारल्यास विरोधकांवर व्यवस्थित बाजी मारता येईल." संतोषभाऊंनी मध्यस्थी केली. "आजचे मरण उद्यावर ढकलण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीचा डोळसपणे स्वीकार करावा म्हणून ही खास समर्थकांची बैठक मी बोलावली आहे. मंडळी, आपण जो विचार कराल तो येथे उस्फुर्तपणे मांडा त्यातून काही उपाय निश्चित निघेल असे मला वाटते." संतोषभाऊंनी त्यांचे मनोगत मांडले.बऱ्याचं चर्चाचर्वणानंतर व जर तर च्या कहाण्यांना अनेक फाटे फोडत जेवणाची वेळ जवळ आल्यावर चर्चा संपुष्टात आली.
मालती वहिनींच्या हातच्या सामिष भोजनाचा व प्रियाशी सध्याच्या कायदेविषयक चर्चेचा आनंद घेत राजाभाऊंनी जेवण उरकले. वहिनींचा व इतर सर्वांचा निरोप घेऊन ते दरवाज्यापर्यंत पोहचलेच होते इतक्यात "राजाभाऊ उद्या कार्यालयात भेटा" असा आग्रहवजा आदेश संतोषभाऊंनी त्यांना दिला. "हो सर नक्की" इतकेच बोलत व जिभेवरची बडीशोपेची चव चाखत त्यांनी सरांचा निरोप घेतला.

No comments: