Saturday, March 10, 2007

तेजस्विनी-१२

मतमोजणी दोन दिवसांनंतर होती. तो दिवस उजाडला.आसपासच्या केंद्रांची मत मोजणी भुसावळच्या तहसीलदार कचेरीत होणार होती. सकाळपासून काही उत्साही कार्यकर्त्यांचा गट भुसावळला जाऊन ठेपला. राजाभाऊ इतर मंडळींबरोबर दुपारच्या सुमारास तेथे पोहचणार होते."काहीही झाले तरी घरा बाहेर पडू नकोस... वैशु व आईला सोडून अंगणाच्या बाहेरही पाय टाकू नकोस" अशी सक्त ताकीद राजाभाऊंनी सुरेखाताईंना दिलेली होती. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर अतिउत्साही कार्यकर्ते हरलेल्या उमेदवारांना कसल्या प्रकारची वागणूक देतात ह्याची त्यांना पूर्ण कल्पना होती.सुरेखाताई अस्वस्थ पणे घरातल्या घरांत फेऱ्या मारू लागल्या. दूरदर्शनाच्या मराठी वाहिनीवर मतदानासंदर्भात कुठल्याही बातम्या प्रदर्शित केल्या जात नव्हत्या. जळगांवच्या आकाशवाणीवरूनही फक्त मोघम बातम्याच दिल्या जात होत्या. मध्येच एखाद्या कार्यकर्त्यांचा गट आरडा ओरडा करीत पाटील वाड्याच्या दिशेने जाताना दिसे पण नेमके काय घडते ते कळायला मार्ग नसल्याने सुरेखाताई अजूनच अस्वस्थ होत होत्या. दुपारी अचानक बातमी थडकली.... शेजारच्या चव्हाणांच्या मुलाने मोहिनी इंगळे अडीच हजार मतांनी पुढे असल्याची बातमी चाचरत सुरेखाताईंना सांगितली.सुरेखाताईंना पायाखालची जमीन थरथरत असल्याचा भास झाला."अशक्य... केवळ अशक्य, जी बाई कधी व्यासपीठावर भाषणासाठी उभी राहिली नाही ती पुढे जाणेच अशक्य आहे." त्या म्हणाल्या."काकू, त्या पाटलांना काहीच अशक्य नाही हो...... त्यांनी उमेदवार म्हणून माणूसच नव्हे तर बैल उभा केला तरी लोक मतं त्यालाच देतील." चव्हाणांचा मुलगा त्यांची समजूत काढण्याच्या सुरांत म्हणाला.इतक्यात पाटील वाड्यासमोर फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली व सुरेखाताईंच्या छातीत धस्स झाले."सुनील पाटलांचा अठराशे मतांनी विजय झाला. विचारे साहेब हरले" कोणीतरी बातमी आणली.सुरेखाताई मटकन खाली बसल्या. त्यानंतर काय होतंय, त्यात त्यांना रस राहिलेलाच नव्हता. घराचा दरवाजा बंद करून त्या माजघरात जाऊन पलंगावर पडल्या. 'मरो.... समाजालाच माझी गरज वाटत नाही तर मी का मारावं ह्या मेंढरांसाठी' नकळत एक निरीच्छा त्यांच्यात निर्माण झाली.
इतक्यात एकाएकी रस्त्यातला गोंधळ त्यांना ऐकू आला.... सुनील पाटलाच्या विजयाने चेकाळलेला एक गट बाहेर रस्त्यावर हुल्लडबाजी करीत होता....."घाला त्या रां*च्या घरावर दगड" कुठूनतरी आवाज आला."चौधरीची र*ल, बाहेर नीघ... हरलीस तर तोंड लपवतेस का ?" कोणीतरी गर्दीतला बोलला.ही वाक्ये ऐकून सुरेखाताईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली. विजेच्या चपळाईने दार उघडून त्या बाहेर आल्या."कोणाला रखेल म्हणतोस रे बेशरमा.... तुझ्या मायन तुला ह्यासाठीच जन्माला घातला का ?" दोन चार टाळक्यांकडे रोखून बघत त्यांनी सरळ प्रश्न केला.त्या रणमर्दानीचा आवेश पाहून पुढे उभे असलेले पाठ फिरवून पळ काढू लागले.... मागचे हळूहळू मागे सरकायला लागले..."कोणाची माय व्याली दगड घालायला त्येच पाह्त्ये मी पण" शेलक्या भाषेत व ओचे पदर खोचून त्या पुढे सरकल्या..... इतक्यात शेजारचे चव्हाण स्वत: बाहेर आले. "जाऊ द्या वैनीताय ह्या माणसांची डोस्की फिरलीत.... जा रे बाबा घरच्याला, तुमची काय दुश्मनी हाय ताईंशी ?" त्यांच्या ह्या वाक्याने थोडी पांगापांग झाली. इतक्यात शाळेत येणारे दोन चार नेहमीचे चेहरे गर्दीत सुरेखाताईंना दिसले."काय सोनावणे ? शाळेत भेटायला लाज वाटत होती का ?" त्यांनी सरळ प्रश्न केला तसा सोनवणे नांवाचा तो गृहस्थ "नाय मास्तरीण बाई म्या तर ह्यान्सी समजवायले आल्तू " असं बोलत मागच्या मागे कटला.
इतक्यात दोघे भाजमो चे कार्यकर्ते मोटर सायकलवर तेथे आले."जनजागृती पक्षाचा विजय असो.... सुरेखाताईंचा विजय असो..... ताई, सातशे मतांनी विजयी झाल्या..." अशी आरोळी ठोकत ते बोलले.... ते बोलत असतानाच एका पाठोपाठ एक पाच सात मोटरसायकलींवरून भाजमो व जनजागृती पक्षाचे कार्यकर्ते तेथे पोहचले.काय चाललंय ते सुरेखा ताईंना कळेचना.... हसावे की रडावे हे कळण्याच्याही मन:स्थितीबाहेर त्या होत्या.जनजागृती पक्षाच्या एका कार्यकर्त्याने आणलेली फटाक्यांची माळ ताईंच्या घरासमोर लावली गेली. लांबलचक फटाक्यांची माळ संपेपर्यंत मघाशी आलेला हुल्लडबाज्यांचा तो गट मागच्या मागे सटकला. फटाक्यांच्या आवाजाने आजूबाजूच्या घरादारांतून शेजारी मंडळी हळूहळू बाहेर पडू लागली. तोवर जनजागृती पक्षाचे भुसावळहून परतलेले बरेचसे कार्यकर्ते तेथे जमा झालेले होते. अभिनंदनाचा वर्षाव सुरेखाताईंवर सुरू झाला.एका शेजारणीने पंचारतीचे ताट करून आणले. अंगणाच्या बाहेरच गल्लीत सुरेखाताईंना ओवाळण्याची स्पर्धा महिलांमध्ये लागली.थोड्याच वेळांपूर्वी धटिंगणांच्या दडपशाही समोर नतमस्तक झालेले आपले शेजारी ते हेच का हा प्रश्न सुरेखाताईंना पडला.कोणीतरी आणलेला पेढ्यांचा बॉक्स उपस्थितांमध्ये वाटला जात होता. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून वैशुचे कोडकौतुक सुरू होते, सासूबाईंच्या डोळ्यांतली एक कौतुकाची झाक सुरेखा ताईंना सुखावून गेली.एका कार्यकर्त्याने त्याचा मोबाईल ताईंच्या हाती दिला. संतोषभाऊ फोनवर अभिनंदन करीत होते. तातडीने दूध महासंघाच्या कार्यालयात पोहचण्याचा आदेश घेत त्यांनी फोन बंद केला तेव्हा आपण राजाभाऊंबद्दल विचारले नाही ह्याची रुखरूख त्यांना लागून गेली. दूध महासंघाच्या कार्यालयातून विजयी उमेदवारांची मिरवणूक निघत असल्याचे त्यांना एकाने सांगितले.******************************************कपडे बदलून व ठेवणीतली साडी नेसून त्या कार्यकर्त्यांसोबत वैशुला घेऊन दूध महासंघाच्या कार्यालयात जायला निघाल्या. तेथे पोहचल्यावर बऱ्याच कार्यकर्त्यांचा घोळका खाली जमा झाला असल्याचे त्यांनी पाहिले. घोळक्यांतून वाट काढत व अभिनंदनाचा वर्षाव स्वीकारत त्या वैशुला कडेवर घेऊन पुढे सरकत होत्या. त्यांच्या मागे त्यांच्या व पक्षाच्या नांवाचा जयजयकार होत होता.सभागृहात विजयी उमेदवारांसह बरेच कार्यकर्ते जमा झालेले दिसत होते. एकच गलबलाट तेथे उडाला होता. देसाई साहेब सगळ्यांना शांत करण्याचा अपयशी प्रयत्न करत होते. बराच वेळ तर काय घडले आहे ते कळायलाच मार्ग नव्हता. थोडी शांतता निर्माण होताच देसाई साहेबांनी जमावाचा ताबा घेतला. माइक वरून सभागृहात व बाहेर उभ्या असलेल्या करकरत्यांशी संपर्क साधून त्यांना निकाल ऐकण्यासाठी शांत राहण्याचे आवाहन केले गेले.तोवर परत एक गलका बाहेर ऐकू आला...... संतोषभाऊ उर्वरित गटासह भुसावळहून परत आलेले होते. ते वर पोहचे पर्यंत त्यांच्या, विजयी उमेदवारांच्या व पक्षाच्या नावाचा अखंड जयघोष सुरू होता.थोड्याच वेळांत शांतता प्रस्थापित करण्यात देसाई साहेबांना यश आले तेव्हा कुठे खरा निकाल हाती लागला.सुनील पाटलाने विचारे साहेबांचा फक्त सत्तर मतांनी पराभव केलेला होता.हा पराजय अगदी काठावर असल्याने सगळ्यांनाच त्याची प्रचंड रुखरुख लागून गेली.वासूभाऊंनी फेगडेंवर दणदणीत साडेसात हजारांनी विजय मिळवला होता.मोहिनी इंगळेचा पराभव सुरेखाताईंनी सहाशे सत्त्याण्णव मतांनी केलेला होता. ह्यांत खरा पराजय सुनील पाटलाचा होता.
अट्रावलातून अपेक्षेप्रमाणे इंदुताई भराडे विजयी झाल्या होत्या. निंभोऱ्याच्या निर्मला वहिनी व इंदुताई दोन हजारांवर मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. माळी वहिनींना निवडणूक जड गेली होती. त्यांचा मोठा पराभव अगदी अनपेक्षित होता. सावद्याला पैसे चरून मते फोडण्याचे प्रकार झालेले होते. संतोषभाऊंनी त्याबद्दल आयोगाकडे रीतसर तक्रार नोंदवली होती व म्हणूनच त्यांना यायला उशीर झालेला होता.सर्वात कमालीचा निकाल लागला तो रावेर मतदार संघातून... भाजमो च्या नवख्या अजय फालकने सुहास पाटलाच्या साडूला चारी मुंड्या चीत केले होते. तरुणांनी राजकारणात अनुभवी माणसाला हरवण्याचा हा लोकशाहीतला पहिला प्रसंग नव्हता.वरणगांव मतदारसंघातून सुनील पाटलाचा उमेदवार जेमतेम काठावर पास झाला होता, तो अवघ्या सव्वाशे मतांनी.चिनावलहून भाजमो चेच राठी नांवाचे सद्गृहस्थ विजयी झाले होते.तर जामनेर मतदारसंघातून दोन्ही पक्षांचा पराजय करीत अपक्ष उमेदवार महेश भिरूड विजयी झालेला होता. त्याचे त्या विभागातले कार्य संतोषभाऊंसारखेच असल्याचे म्हटले जात होते. फैजपूरहून अजून एका अपक्षाने बाजी मारली होती. तेथेही भाजमो व आघाडीच्या दोघा उमेदवारांचा पराभव झालेला होता.
यावल सर्कल मधून निवडणुका भाजमो व जनजागृतीने जिंकलेल्या होत्या. झेड.पी च्या ११ व ग्रामपंचायतीच्या १३ अश्या एकंदर २४ जागांवरून युतीचे ६ व ७ असे तेरा सदस्य निवडून आलेले होते. सभागृह आता युतीच्या ताब्यात राहणार होते. दोघा अपक्षांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकांतून दिलेला पाठिंबा सार्थ ठरला होता. जामनेर व फैजपूरच्या झेड.पी. च्या जागांवरून पूर्ण पाठिंबा मिळाला असता. फक्त ७ जणांचा विरोध सभागृहात होणार होता. सर्कल मधून विकास आघाडी पक्षाची जोरदार पीछेहाट झालेली होती.ह्या बारीक सारीक घटनांना राज्य पातळीवर फार महत्त्व दिले जाई कारण ज्याच्या हाती ग्रामपंचायत व जिल्हा पंचायतींचे राज्य..... त्या पक्षाच्या हाती राज्याची सत्ता असणार होती.ह्या निवडणुकांमधील विजयामुळे संतोषभाऊंची विधानसभेतली जागा जवळपास नक्की झालेली होती......
"मला तर बाई हा तेरा आकडा अशुभ वाटतो" भराडे बाई सुरेखाताईंना म्हणाल्या."काळजी करू नका..... सावद्याला फेरमतदान झाले तर तिथली जागा आपण जिंकूच" ह्या सुरेखाताईंच्या वाक्यावर त्या अचंबित होऊन त्यांच्या तोंडाकडेच पाहत राहिल्या.
यावलची सुनील पाटलाची, वरणगांवातली व सावद्यातली पैसे चरून जिंकलेली एक अश्या एकूण फक्त तीन जागांवर नानासाहेबांचे उमेदवार आलेले होते.बाकी सर्व ठिकाणी युतीने गड जिंकला होता.येत्या विधानसभा निवडणुकांत पारडे कुणीकडे झुकणार त्याचीच ही नांदी होती.ह्यावेळचा झेडपी अध्यक्ष कोण असेल त्यासाठी भल्याभल्यांना संतोषभाऊंच्या दारच्या पायऱ्या घासाव्या लागणार होत्या.
विजयी उमेदवारांची वाजत गाजत मिरवणूक निघाली तेव्हा पाटील वाड्यावर सुतकी अवकळा पसरलेली होती.************************************************

No comments: